मुलांना शिस्त कशी लावावी ?

१. मुलांना शिस्त लावणे (कशी लावावी ?)

शिस्त आणि शिक्षा हे दोन्ही शब्द शिक्षण या शब्दापासून निर्माण झाले आहेत. शिक्षणाद्वारे चांगली वागणूक अमलात आणणे म्हणजेच शिस्त होय. यासाठी शिक्षा कशाबद्दल व कोणत्या चुकीबद्दल व गैरवर्तणुकीबद्दल आहे, हे समजून देऊनच शिक्षा करावी.

२. शिस्त लावण्याबद्दल महत्त्वाच्या सूचना

अ. चांगल्या वर्तणुकीचे कौतुक व गैरवर्तणुकीबद्दल शिक्षा

मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळाले किंवा बक्षीस मिळाल्यास त्याची स्तुती करावी. त्यांना शाबासकी द्यावी म्हणजे त्याला आणखी चांगले वागण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करावी व जरूर तर शिक्षाही करावी.

आ. आज्ञा न करता विनंती करावी

‘पाणी आण’, असे न सांगता ‘राजा मला एक ग्लास पाणी आणून देशील का ?’, अशी विनंती करावी.

इ. घरातील मंडळींची एकवाक्यता

मुलाला शिस्त लावण्यापूर्वी मुलाकडून नेमक्या कशा वागणुकीची अपेक्षा आहे, याचा विचार करून आपली भूमिका निश्चित करावी व दुमत होऊ देऊ नये.आई-वडिलांची व घरातील इतर मंडळींची एकवाक्यता मुलाला शिस्त लावण्याच्या कामी अत्यंत आवश्यक असते. खिडकीचे गज दरून खिडकीवर उंच चढत जाण्याबद्दल वडिलांनी शाबासकी व त्याच कृत्याबद्दल आईचे रागावणे, असे होता कामा नये. शिक्षा केव्हा करावी यासंदर्भातील मतभेद आईवडिलांनी अगोदरच सोडवून ठेवावेत. मुलासमोर सोडवू नये.

ई. चूक झाल्यास लगेच शिक्षा करावी

‘थांब संध्याकाळी बाबांना येऊ दे, मग बघते’ ही चुकीची शिक्षा आहे. त्यामुळे बाबा येईपर्यंत मुलगा शिक्षेच्या काळजीत रहातो.मुलाने केलेल्या चुकीच्या तुलनेशी मिळते-जुळते असावे. आमच्या शाळेचे प्राचार्य व गुरुवर्य हे अतिशय सात्त्विक व शांत गृहस्थ. त्यांच्याकडे कोणताही विद्यार्थी भीतीने न जाता आदराने व प्रेमाने जायचा. एके दिवशी मी त्यांना भेटावयास गेलो असता एका १० वीतल्या मुलाला ते छडीने बेदम मारीत होते. काळे गुरुजींचा रौद्रावतार बघून मीच थक्क होऊन गेलो. नंतर त्यांना भेटल्यावर ते म्हणाले, `काल हा विद्यार्थी आईच्या मर्तिकासाठी माझ्याकडून ५० रुपये घेऊन गेला. मी ते आनंदाने दिले. आज सकाळी मला देवळात त्याची आई भेटली. या मुलाला जन्मभर लक्षात राहील अशीच शिक्षा योग्य. नाहीतर तो अट्टल फसवणारा झाला असता.

३. योग्य व अयोग्य शिक्षा

मुलाशी न बोलणे किंवा मुलाला दिवसभर उपाशी ठेवणे या शिक्षा योग्य नव्हेत. कारण संध्याकाळी तीच आई जेवण्यासाठी मुलाची मनधरणी करील. संध्याकाळी मुलाला खेळायला घराबाहेर न पाठवणे किंवा त्याला दूरचित्रवाणी बघू न देणे ही योग्य शिक्षा होय.

४. बालमनावर शिस्तीचा संस्कार करा !

`साधनेचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर अध्यात्मातील प्रगती जलद होते. त्यासाठी लहानपणीच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत.’

५. शारीरिक स्तरावर

अ. मुलांना स्वावलंबी बनवणे : ‘लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे. झोपून उठल्यावर स्वत:च्या पांघरुणाची घडी घालायला शिकवावे. सुरुवातीला नीट येणार नाही; पण हळूहळू मूल जसे मोठे होईल, तसा व्यवस्थितपणा त्याच्या अंगी आल्याशिवाय रहाणार नाही. सकाळचे आन्हीक उरकल्यावर शाळेचा अभ्यास, शाळेची तयारी त्यांची त्यांनाच करायला शिकवावी. अभ्यासाची पुस्तके, वह्या नीटनेटक्या व जागच्याजागी ठेवायचे वळण लावावे. शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल-बूट, दफ्तर वगैरे ठराविक जागीच ठेवायला शिकवावे. तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून ठेवण्यास शिकवावे. कपड्याचे बटण अथवा हुक तुटले असल्यास किंवा कपडे थोडेसे उसवले असल्यास त्यांचे त्यांनाच शिवायला शिकवावे. स्वत:चे स्वत: करण्यात मुलांनाही आनंद वाटतो. वयानुसार स्वत:चे कपडे धुवायलापण शिकवावे. सकाळ-दुपारचा नाश्ता झाल्यावर कपबशी व ताटली घासायला शिकवावी. थोडक्यात म्हणजे मुलांना स्वावलंबी करावे. त्यात मुलगा-मुलगी असा फरक नको. प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले, तर मूल घरी असो वा इतर ठिकाणी, ते नेटकेपणानेच वागेल.’

आ. लवकर निजणे व लवकर उठणे : ‘लहानपणापासूनच मुलांना लवकर उठण्याची सवय लावावी. पुष्कळ घरांतून बघायला मिळते की, मुले अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी ८-९ वाजता उठतात. याउलट रात्री लवकर झोपून पहाटे अभ्यास केला असता तो जास्त चांगला लक्षात रहातो. `लवकर निजे व लवकर उठे, त्यास आरोग्य व धन-संपत्ती मिळे ।’, असा श्लोक आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत. रात्री रज-तमाचे प्राबल्य असते. याउलट पहाटे सात्त्विकता असल्यामुळे त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो.’

६. मानसिक स्तरावर

अ. प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे

मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात; म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे, हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरिराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे.

आ. स्वच्छता व नीटनेटकेपणाचा संस्कार मनावर करणे

पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले, तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवावे.

इ. मुलांचे अती लाड करणे टाळणे

आजकाल घरांतून एखाद-दुसरेच मूल असल्याने त्यांची आवड-नावड जपली जाते. जेवण, कपडे सर्वच बाबतींत ‘मुले म्हणतील ती पूर्व दिशा’, असे आढळून येते. लहानपणापासून त्यांचे ऐकत गेले की, मुले पुढे ऐकेनाशी होतात. त्यामुळे त्यांचे अती लाड करू नयेत.’

७. आध्यात्मिक स्तरावर

अ. मुलांवर सुसंस्कार होण्यासाठी साधनेचे पाठबळ देणे

मुले सदवर्तनी होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे पालकांनी स्वत: सद्वर्तनी असायला हवे आणि दुसरे म्हणजे त्यांना शिस्त लावण्याच्या जोडीला त्यांना भक्ती करण्यास शिकवायला हवी. साधनेचे किंवा उपासनेचे पाठबळ असेल, तर मुलांमध्ये सद्गुण चटकन अंगी बाणतात. हट्टी किंवा न ऐकणाऱ्या मुलांना बदलण्याची शक्ती ही भगवंताच्या नामात आहे आणि याचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे.

आ. भक्तीचे बीज स्वत:च्या हृदयकमलात पेरल्याने ते बीज मुलात निर्माण होणार असणे

ही सर्व स्थिती बदलण्यासाठी आपल्याला जीवनात अध्यात्माची, भक्तीची गरज आहे. प्रथम पालकांनी भक्तीचे बीज स्वत:च्या हृदयकमलात पेरायला हवे. मगच ते बीज त्यांच्या मुलात निर्माण होईल. ‘वाल्याचा वाल्मिकी झाला’, अशा गोष्टी आपण सांगतो; पण स्वत: मात्र साधना करत नाही. ‘भगवंताच्या नामातच मुलांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची क्षमता असल्याची जाणीव सर्व पालकांना होवो व सर्व पालकांच्या माध्यमातून सुसंस्कारित सद्गुणी पिढी राष्ट्र्राला मिळून ईश्वरी राज्य लवकर येवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

इ. वेळोवेळी प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे

सकाळी झोपून उठल्याबरोबर मुलांना अंथरुणातच प्रार्थना करायला व आजचा दिवस ईश्वराने दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवावे. तोंड धुतल्यावर देवाला नमस्कार करायला सांगावे. कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी त्यांच्याकडून प्रार्थना म्हणवून घ्यावी. तसेच ‘प्रत्येक गोष्ट ईश्वरकृपेनेच झाली’, हे त्यांच्या मनावर बिंबवावे.

ई. मुलांपुढे स्वत:चा आदर्श ठेवण्याचे लाभ

घराचे ‘सत्यं शिवं सुंदरम्’ करायचे असेल, तर शिस्त, आज्ञापालन, मोठ्यांचा आदर करणे, हे सर्व करता आले पाहिजे. मोठ्यांनी आपला आदर्शच असा निर्माण केला पाहिजे की, आपले वळण, शिस्त बघून आपले मूलही आपले अनुकरण करील. असे झाले, तर आदर्श कुटुंब व्हायला वेळ लागणार नाही.