![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2023/08/2023_Ramesh_Shinde_1_Clr.jpg)
मुंबई – अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध, ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे; परंतु आज त्यांच्या पक्षाची स्थिती पाहिली, तर ‘वयोवृद्ध’ म्हणून त्यांना कोण मान देत आहे ? त्यांच्या पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडले आहेत. मनुस्मृतीमधील हा श्लोक त्यांनी वेळेत शिकवला असता, तर त्यांच्या पक्षावर आजची वेळ आली नसती, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
या वेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकाचा उल्लेख आल्यामुळे समस्त पुरोगाम्यांना पोटशुळ उठला आहे. जणू काही आता मनूचे राज्य आणि चातुर्वन्य व्यवस्था येणार आहे ? मूळात देशात राज्यघटनात्मक व्यवस्था, सर्वाेच्च न्यायालय असतांना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का ? धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशरस्मृतीचा उपयोग केला पाहिजे. यातील एका श्लोकात म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक, पालक, तपोवृद्ध, वयोवृद्ध यांचा आदर केला, तर कीर्ती, बळ आणि यश वाढेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृती जाळल्याचा उल्लेख सातत्याने केला जातो; परंतु ११ जानेवारी १९५० या दिवशी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात भाषण करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये वारसा हक्क आणि स्त्रियांसाठी दायभाग यांच्यासाठी मी मनस्मृतीचा उपयोग केला असल्याचे त्यांनी म्हटले. ‘जेथे स्त्रियांचे पूजन होते, तेथे देवता वास करतात’ ही मनुस्मृतीची शिकवण आहे. जगात मनुस्मृती हा एकमेव धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये संपत्तीमध्ये महिलांचा सहभाग दिला आहे. हा अधिकार केवळ भारतामध्ये होता. अशा मनुस्मृतीचा चांगला श्लोक अभ्यासक्रमातून रहित करण्याची भूमिका मांडणे हा बौद्धीक आतंकवाद आहे.’’ जर हे पुरोगामी मनुस्मृतीला इतका विरोध करतात, तर कोलकाता कुराण पेटिशन मध्ये त्या ग्रंथातील समाजात विद्वेष पसरवणाऱ्या आयतींना विरोध करण्याचे धाडस ते दाखवतील का ?