![](https://www.hindujagruti.org/wp-content/uploads/2024/06/Hindu_Adhiveshan_2024_D04_S03_01-scaled.jpg)
हिंदुत्वनिष्ठांनी ‘डिजिटल’ योद्धे बनले पाहिजे ! – स्वप्नील सावरकर, संपादक, हिंदुस्थान पोस्ट (डिजिटल मीडिया हाऊस), मुंबई, महाराष्ट्र
![स्वप्नील सावरकर, संपादक, हिंदुस्थान पोस्ट (डिजिटल मीडिया हाऊस), मुंबई, महाराष्ट्र](https://www.hindujagruti.org/wp-content/uploads/2024/06/Hindu_Adhiveshan_2024_D04_S03_02-scaled.jpg)
(डिजिटल योद्धा म्हणजे सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे होणारे वैचारिक आक्रमण रोखणारी व्यक्ती)
माध्यमांमध्ये हिंदुत्वाविषयी नकारात्मकता आहे. आज ‘डिजिटल’ युग आहे. आपण या ‘डिजिटल’ युगाच्या नव्या क्रांतीत सहभागी होण्यासाठी सिद्ध आहोत का ? वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासारख्या मोठ्या कार्यक्रमाला मुख्य प्रवाहातील माध्यमे प्रसिद्धी देत नाहीत. प्रसारमाध्यमांना कसे ‘मॅनेज’ केले जाते, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठांनी ‘डिजिटल’ योद्धे बनले पाहिजे. भ्रमणभाष हे आपले आजच्या काळातील दुहेरी शस्त्र आहे. ते कसे वापरायचे ? हे शिकून घेतले पाहिजे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनी हेच सांगितले असते. हिंदु राष्ट्र आपली पुढची पिढी आणू शकेल, त्यामुळे तिला तिच्या भाषेत समजेल, अशी सामुग्री आपण निर्माण केली पाहिजे. ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार घेऊन काम करणारे ३० सेकंदाचे ‘रील्स’ (लहान व्हिडिओ) बनवावे लागतील. माध्यमांना अशा प्रकारे सिद्ध केलेली बातमी द्यायला हवी, अशी उपायोजनात्मक सूत्रे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे श्री. स्वप्नील सावरकर यांनी मांडली. वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या चौथ्या म्हणजे २७ जून या दिवशीच्या ‘राष्ट्र, धर्म, संस्कृती रक्षणाचे प्रयत्न कसे करावेत ?’ या सत्रात ‘हिंदु संघटनांना प्रभावी मीडिया व्यवस्थापनाची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते.
सावरकर पुढे म्हणाले की, हिंदुत्वनिष्ठ पाठ्यक्रम असलेले पत्रकारितेचे शिक्षण सिद्ध करायला हवे. हिंदुत्वनिष्ठ शिक्षण देणार्या संस्था काढायला हव्यात. १० ते १५ वर्षे आपण आपल्या राष्ट्रासाठी माध्यमांवर कष्ट घेतले, तर पुढे हिंदुत्वाला पूरक माध्यमे असतील. आज हिंदू वाघ आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत; परंतु त्यांनी एकत्र आले पाहिजे. सध्याची साम्यवादी विचारसरणी असलेली माध्यमे पालटण्यासाठी सत्तेत असणार्यांनी दबाव टाकला पाहिजे आणि तसा दबाव टाकला जाण्यासाठी आपण आपली माध्यमे शक्तीशाली बनवली पाहिजेत.
संस्कृतीवरील आक्रमकांचे मुखवटे ओळखून त्यांच्या विरोधात लढले पाहिजे ! – अभिजीत जोग, व्यवस्थापकीय संचालक , ‘प्रतिसाद’ कम्युनिकेशन
![अभिजीत जोग, व्यवस्थापकीय संचालक , ‘प्रतिसाद’ कम्युनिकेशन](https://www.hindujagruti.org/wp-content/uploads/2024/06/Hindu_Adhiveshan_2024_D04_S03_03-scaled.jpg)
स्वातंत्र्यानंतर इतिहास आणि शिक्षण यांवर साम्यवाद्यांचे प्रभुत्व राहिले आहे. भारताचे तुकडे करणे, हे साम्यवाद्यांचे धोरण राहिले आहे. त्यांनी भारताचे तुकडे करण्यासाठी इतिहास आणि शिक्षण यांची मोडतोड केली. वर्ष २०१४ मध्ये हे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी हिंदु संस्कृतीला लक्ष्य करणे चालू केले. धर्मसंस्था, राष्ट्रवाद आणि शिक्षणव्यवस्था हे संस्कृतीचा आधार आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपली संस्कृती नष्ट झाली, तर आपले अस्तित्व संपून जाईल. त्यामुळे हे आक्रमण समजून घेतले पाहिजे. यासाठी त्यांचे मुखवटे समजून घेऊन त्यांच्या विरोधात लढले पाहिजे. शेवटी विजय आपलाच होणार आहे, असे प्रतिपादन ‘प्रतिसाद’ कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत जोग यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चौथ्या म्हणजे २७ जून या दिवशी केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करण्यासाठी त्यांनी येथील संस्कृती नष्ट करून भारतियांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान घालवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी शिक्षण आणि इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पूर्वीपासून चालू असलेले गुरुकुल बंद केले आणि इंग्रजी शिक्षण व्यवस्था चालू केली. त्यामुळे भारतातील बहुतांश लोक निरक्षर बनले. यासमवेत त्यांनी भारताच्या मूळ इतिहासात खोट्या गोष्टी घुसडल्या, तसेच भारतात पूर्वी मनुष्याच्या कर्मावर आधारित असलेल्या वर्णव्यवस्थेला त्यांनी जन्मावर आधारित म्हणजे जातीव्यवस्था असे नाव दिले. अशा प्रकारे इंग्रजांनी आपली ओळख काढून त्यांना हवी असलेली ओळख आपल्यावर थोपवली. अशा प्रकारे मेकॉले पुत्र आणि मार्क्सवादी यांनी एकत्रितपणे भारताचा आत्मसन्मान नष्ट करण्याचे प्रयत्न केला.’’
काश्मीरमधील धर्मांधांनी तोडलेली काही मंदिरे सैन्याकडून पुन्हा उभारणी होत आहे ! – मेजर सरस त्रिपाठी
![मेजर सरस त्रिपाठी](https://www.hindujagruti.org/wp-content/uploads/2024/06/Hindu_Adhiveshan_2024_D04_S03_04-scaled.jpg)
एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाकिस्तानचा एक अधिकारी आला आणि काश्मीरचा नकाशा पाहून त्यांना म्हणाला, ‘ही टोपी तुम्ही काढून द्या.’ त्या वेळी ते त्याला म्हणाले, ‘‘ही टोपी नाही, हे आमचे शीर आहे आणि शीर कुणी काढून देत नाही.’’ काश्मीरला ८ सहस्र ५०० वर्षांपेक्षाही पूर्वीपासूनचा इतिहास आहे. ऋषि कश्यप यांची ही नगरी काही शेकडो वर्षांपूर्वी भारतातील शिक्षणाचे माहेरघर होती. येथील आजची झेलम म्हणजे वितस्ता नदी म्हणजे साक्षात् पार्वतीदेवीचे रूप आहे. शिवाने पार्वतीला आज्ञा करून तिला तिथे पाठवले आहे.
५०० वर्षे काश्मीरवर आक्रमणे झाली. मुसलमान शासकांनी अत्यंत क्रूर अशी बंधने येथील हिंदूंवर लादली. त्यामुळे हिंदू वंश नष्ट झाला. आतापर्यंत ७ वेळा कश्मिरी लोकांना काश्मीरमधून पूर्णतः पलायन करावे लागले आहे. मुसलमान शासकांनी येथील मार्तंड मंदिर या सूर्यमंदिरासह शेकडो मंदिरे नष्ट केली. गेल्या काही दिवसांत सैन्याने येथील काही छोटी मंदिरे पुन्हा उभारण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती उत्तरप्रदेश येथील प्रज्ञा मठ पब्लिकेशचे लेखक आणि प्रकाशक मेजर सरस त्रिपाठी यांनी दिली. २७ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या ‘राष्ट्र, धर्म, संस्कृती संरक्षण’ या सत्रात ‘सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणात सैन्याची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.