Menu Close

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाकडून प्रारंभ : दुकाने आणि आस्थापने हटवली !

गडप्रेमींचा आक्रमक पवित्रा आणि पाठपुरावा यांना यश !

कोल्हापूर (महाराष्ट्र) – माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर अखेर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला. दुपारी ३ वाजेपर्यंत ३० दुकाने आणि आस्थापने हटवण्यात आली आहेत, अशी माहिती मिळत आहे.

प्रशासनातील अनेक प्रमुख अधिकारी पोलीस बंदोबस्तात विशाळगडावर उपस्थित होते. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे. विशाळगडावर दर्गा परिसरात काही लोकांनी दुकाने, घरे यांचे अतिक्रमण केले आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विषयाला वाचा फोडण्यात ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चा पुढाकार !

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी १४ मार्च २०२१ या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीच्या साक्षीने आणि ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. यात प्रथम १६ मार्च या दिवशी कृती समितीने पहिल्यांदा कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन या विषयाला वाचा फोडली. या वेळी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी विशाळगडावर झालेली अतिक्रमणे, तसेच मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, यांकडे पुरातत्व विभागाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष पत्रकारांसमोर मांडून ‘पुरातत्व विभाग जाणीवपूर्वक कशा प्रकारे धर्मांधांच्या अतिक्रमणांकडे डोळेझाक करत आहे ?’, हे पुराव्यांसह मांडले. यानंतर हा विषय सर्व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी १८ मार्च २०२१ या दिवशी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुरातत्व विभागाविरुद्ध ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात आले. यानंतर गेली ३ वर्षे समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देणे, विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात आंदोलन करणे, वनमंत्र्यांना निवेदन देणे, विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणे, स्थानिक ठिकाणी निवेदन देणे आदी माध्यमांतून हा लढा चालूच ठेवला होता. गडावर होत असलेल्या पशूबळीमुळे तेथील पावित्र्य नष्ट होत असून त्याविषयीही नुकतेच समितीने आंदोलन केल्याने तेथे ईदच्या दिवशी एकही पशूहत्या झाली नव्हती.

Related News