Menu Close

देहूप्रमाणे आळंदी आणि पंढरपूर येथे मद्य-मांस विक्री का बंद होऊ शकत नाही ? – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी परिषद !

वारकऱ्यांच्या संदर्भात पसरवण्यात येणाऱ्या खोट्या वृत्तांना विरोध करत धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी संघटन हवे ! -संपादक 

वारकरी परिषदेला उपस्थित विविध ह.भ.प., कीर्तनकार आणि पदाधिकारी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र) – श्रीक्षेत्र देहू येथे तेथील देवस्थानाने त्यांच्या १ किलोमीटर परिसरामध्ये ‘मद्य आणि मांस यांची विक्री करायची नाही’, असे सर्व जनतेला आवाहन केल्यावर त्या परिसरातील सर्वच दुकाने इतरत्र हालवली गेली. जर देहूला होते, तर श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूर येथे तसे का होऊ शकत नाही ?, असे प्रतिपादन वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले. १८ जुलै या दिवशी येथील ब्रह्मीभूत श्री बालयोगी महाराज यांच्या मठामध्ये हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. या परिषदेस महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. मारुति महाराज तुनतुणे, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’चे श्री. गणेश लंके, ह.भ.प. अधिवक्ता अशुतोष महाराज बडवे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह महाराष्ट्रातील ३९ ह.भ.प., कीर्तनकार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

१. ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर म्हणाले, ‘‘हिंदु समाज आळशी आहे. तो अधर्माला विरोध करत नाही. धर्माच्या रक्षणाचे कार्य करत नाही. धर्मासाठी कार्य करतांना एकट्याने न करता संघटनेच्या माध्यमातून करावे.’’

२. ह.भ.प. अधिवक्ता आशुतोष महाराज बडवे म्हणाले, ‘‘अन्य धर्मात गेलेल्या हिंदूंना ‘घरवापसी’ करून परत धर्मात घ्यायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांनीही याचा आदर्श ठेवला आहे. वारकर्‍यांनी एकमेकांशी संपर्क आणि समन्वय ठेवावा.

३. ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे महाराज म्हणाले, ‘‘आता एकटे नाही, तर सर्वांनी संघटित होऊन लढायला हवे, तरच हिंदू अन् वारकरी परंपरा, धर्मपरंपरा यांचे रक्षण होऊ शकते. यासाठी हिंदु राष्ट्र हवे. हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत संघटित प्रयत्न करायचे आहेत.’’

४. ह.भ.प. रामचंद्र पेनोरे महाराज म्हणाले, ‘‘कुटुंब नियोजनासाठीचा कायदा केवळ  हिंदूंसाठी केला आहे. तेव्हापासूनच हिंदु अल्पसंख्यांक व्हायला प्रारंभ झाला.’’

५. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘वारीच्या कालावधीत दिंड्यांमध्ये घुसून वेगवेगळ्या प्रकारचे ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) स्थापित केले जाते आणि हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जातो. यात ‘वारकरी विरुद्ध हिंदू’, असे फितवले जात आहे. असे करून हिंदूंविरुद्ध हिंदू कसे होतील ? असे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी काही कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारक येऊन बायबल वाटत आहेत, पुरोगामी विचारसरणीचे लोक येऊन दिशाभूल करत आहेत.

वारकरी म्हणजे शांत, संयमी ! हनुमान जयंती, श्रीराम नवमीच्या मिरवणुकांच्या काळात हिंदू दंगली घडवत आहेत, असे खोटे पसरवण्यात येत आहे. याविरुद्ध लढा देण्यासाठी वारकर्‍यांची ‘इकोसिस्टीम’ (इकोसिस्टीम म्हणजे धर्मांधांनी विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवलेली कार्यप्रणाली) सिद्ध व्हावी.’’

कीर्तन हे मौज आणि करमणुकीसाठी नाही, तर भगवत्प्राप्तीसाठी ! – ह.भ.प. नरहरी चौधरी महाराज

कीर्तन हे अलीकडे मौज आणि करमणुकीसाठी केले जाते; परंतु सप्ताहाची रूपरेषाही अशा पद्धतीने केली आहे की, त्यातून भगवत्प्राप्ती व्हावी. संत जनाबाई, संत मुक्ताबाई या साधना करून संत झाल्या. त्यामुळे ‘साधनेतून संतत्व प्राप्त होते’ हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. कीर्तन हे मनोरंजनाचे साधन व्हायला नको. मनोरंजनासाठी कीर्तन करणार्‍यांना समाजाने बोलावू नये, अन्यथा समाज योग्य दिशा मिळण्यापासून वंचित राहील.

वारकरी परिषदेत पारित करण्यात आलेले ठराव !

१. सर्व तीर्थ क्षेत्र मद्य-मांसमुक्त व्हावीत, तसेच तीर्थक्षेत्रांच्या परिसरात ५०० मीटर अंतरापर्यंत मद्य-मांस विक्रीमुक्त असावीत.

२. संत, संत वांङमय, हिंदु धर्मग्रंथ, हिंदु देवता यांवर होत असलेल्या विडंबनाच्या विरोधात विशेष कायदा करावा.

३. मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथील संत कान्होपात्रा यांच्या जन्मस्थानावर करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ दूर करण्यात यावे आणि ते पवित्र भूमी म्हणून आरक्षित करून वारकर्‍यांच्या नियंत्रणात द्यावे.

४. केंद्रशासनाने देश आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा, गोहत्या बंदी कायदा, तसेच धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा.

५. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री बालाजी देवस्थानाच्या धर्तीवर सशुल्क दर्शनाचे ‘टोकन’ देण्याच्या संदर्भात घेण्यात येणारा निर्णय तात्काळ रहित करण्यात यावा.

Related News