Menu Close

संतांवर जातीयवादी टीका करणार्‍या श्याम मानव यांची ‘जादूटोणा कायद्याच्या समिती’तून हकालपट्टी करा

हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी

श्याम मानव

मुंबई – तत्कालीन काँग्रेस शासनाने जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव हे आजही त्या समितीवर कार्यरत आहेत. खरे तर त्यांनी खोटे लिखाण केले; म्हणून त्यांना न्यायालयाने शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला होता. ते वारकरी संप्रदायातील साधू-संतांवर सातत्याने जातीयवादी भाषेत टीका करून धार्मिक भावना दुखावत असतात. त्यामुळे जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीतून श्याम मानव यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. पुणे येथील सुप्रसिद्ध डॉ.प.वि. वर्तक यांच्याविषयी खोटे लिखाण प्रसिद्ध केल्याविषयी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पाध्ये यांच्या न्यायालयाने प्रा. श्याम मानव यांना एक दिवसाची कैद आणि आर्थिक दंड ठोठावला होता. ‘मुंबई सार्वजनिक विश्‍वस्त संस्था अधिनियम १९५०’च्या कलम ५६ अन्वये फौजदारी गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीला कुठलीही सार्वजनिक समिती किंवा न्यास यांच्या सदस्यपदी रहाता येत नाही. तसे असल्यास ते पद आपोआप रहित होते. त्यामुळे शासनाने कायद्याच्या समितीत मानव यांना घेणे अवैध आहे.

२. हिंदु धर्म, संत परंपरा यांविषयी द्वेष बाळगणारे मानव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणा कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात ‘ज्ञानेश्‍वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, हे धादांत खोटे सांगितले जात आहे’, अशा प्रकारची अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. यापूर्वीही ‘कुलकर्ण्यांचं १२ वर्षांचं पोरं (संत ज्ञानेश्‍वर महाराज) भिंत काय चालवणार?’, ‘संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून झाला आहे’, अशा प्रकारची वारकर्‍यांसह महाराष्ट्रातील भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणारी अनेक आक्षेपार्ह आणि जातीयवादी विधाने ते करत असतात.

३. हा नेमका कोणत्या जादूटोणा कायद्याचा प्रचार आहे ? हा कायद्याचा प्रचार नसून हे वारकर्‍यांचे जाणीवपूर्वक श्रद्धाभंजन करण्याचा अघोरी प्रकार आहे. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून हिंदु संतांची अपकीर्ती करणार्‍या श्याम मानव यांची वरील शासकीय समितीतून तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे.

४. अशाच प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली समाजसेवेचा मुखवटा घातलेल्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने (‘अंनिस’ने) त्यांच्या ट्रस्टमध्ये अनेक आर्थिक घोटाळे केले आहेत. त्याविरुद्ध रितसर तक्रारीही झालेल्या आहेत.

५. ‘अंनिस’ने तर शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचे अंशदान बुडवले आहे. विदेशांतून लाखो रुपये घेऊन त्याचा हिशेब न दिल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने अंनिसची विदेशी मुद्रा नोंदणी (एफ्.सी.आर्.ए.)रहित केली आहे.

६. ‘अंनिस’च्या ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची शिफारस साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी केली आहे. या सर्व प्रकारांची शासकीय स्तरावर सखोल चौकशी चालू आहे.

७. नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटकही झाली आहे. अशा भ्रष्ट, घोटाळेबाज, शहरी नक्षली संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांना शासकीय समित्यांमध्ये स्थान मिळणे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे श्याम मानव यांच्याप्रमाणे या संघटनेतील पदाधिकार्‍यांनाही शासकीय समितीतून तात्काळ बाहेर काढावे आणि ही समितीच बरखास्त करावी.

Related News