Menu Close

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

पणजी (गोवा) – बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनातून आतापर्यंत २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे आणि आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत. तेथे १ हिंदु नगरसेवक आणि १ हिंदु पत्रकार यांची हत्या झाली आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भारत सरकारने तेथील हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पणजी येथील आझाद मैदानात १० ऑगस्ट या दिवशी सायंकाळी या आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनात ‘हिंदू रक्षा महाआघाडी’, ‘आंतरराष्ट्रीय बजरंग दल’, ‘इस्कॉन’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, ‘विश्व हिंदु परिषद’, ‘भारत माता की जय’, ‘सनातन रक्षा दल’, ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘सनातन संस्था’ आदी संघटनांनी सहभाग घेतला.

बांगलादेश येथील अराजक परिस्थितीत हिंदूंचे रक्षण व्हावे, यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या करण्यात आल्या.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे, घरांची लूट, मंदिरांवरील आक्रमणे, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात. बांगलादेशातील हिंदूंवरील वाढती आक्रमणे लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हालवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी. आतापर्यंत तेथील हिंदूंची जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने भरपाई करावी. भारत सरकारने हा विषय तातडीने ‘संयुक्त राष्ट्र संघा’त मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’द्वारे (सीएए) भारत सरकारने आश्रय द्यावा. यापूर्वी जवळपास ५ कोटी बांगलादेशी मुसलमान घुसखोर भारतात शिरले आहेत. आताच्या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पहाता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा. या प्रकरणी भारत सरकारने वेळीच लक्ष घातले नाही, तर बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे. या वेळी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई, ‘इस्कॉन’चे प्रचारक श्री. मिलिंद सावंत आणि श्री. प्रवीणचंद्र, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे श्री. जयेश थळी, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे गोवा प्रमुख श्री. राजेंद्र भोबे, ‘विश्व हिंदु परिषद’चे मंत्री श्री. संजीव कोरगावकर, ‘भारत माता की जय’चे श्री. राजेंद्र वेलिंगकर, ‘सनातन रक्षा दल’चे उत्तर गोवा अध्यक्ष श्री. संजय गावडे, ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे प्रा. सुभाष वेलिंगकर आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी संबोधित केले.

त्यातील महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. गोव्यातील ५० सहस्र बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांना हाकला ! – श्री. नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल

२. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात लोकांना जेवू घालणार्‍या इस्कॉन मंदिराला त्यांनी तोडले. हिंदूंनी आज घरात बसून चालणार
नाही ! – मिलिंद सावंत, ‘इस्कॉन’चे प्रचारक

३. गोव्यात वर्ष २०२२ मध्ये मुसलमान मतदारांची संख्या ८५ सहस्र होती आणि ती वर्ष २०२७ मध्ये १० ते १२ टक्क्यांपर्यंत पोचेल. गोव्यात मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे येत आहेत. हे रोखले पाहिजे ! – श्री. राजेंद्र भोबे, विभाग संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

४. श्रावणात मंदिरांतून बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीविषयी जागृती करूया ! – श्री. जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ

५. हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना ही काळाची आवश्यकता ! -श्री. संजीव कोरगावकर, विश्व हिंदु परिषदचे मंत्री

६. बांगलादेशातील लोण गोव्यात पसरू नये, याची काळजी घ्यावी ! – राजेंद्र वेलिंगकर, भारत माता की जय

७. हिंदु राष्ट्र समन्वय समितीला आमचा पाठिंबा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, हिंदू रक्षा महाआघाडी

Related News