Menu Close

वक्फ बोर्ड : इस्लामी राष्ट्र निर्मितीचे प्रवेशद्वार

आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी इस्लामची मानसिकता ओळखली आहे, असे म्हणता येत नाही. आजही आपल्या देशातील पुरोगामी, समाजवादी, उदारमतवादी, निधर्मीवादी विचारवंतांना वाटते की, मुसलमानांचा प्रश्न हा हिंदूंनी जातीयवाद जोपासल्यामुळे निर्माण झाला आहे. अशी विचारसरणी असलेल्या विरोधकांनी हिंदुत्वाला अपकीर्त केले आहे. त्यांच्या दृष्टीने ‘हिंदुत्व म्हणजे जातीयवाद’ आहे. या जातीयवादाचा उगम धार्मिक प्रवृत्तीतून झाला; म्हणून हिंदूंची असहिष्णु वृत्ती वाढत आहे. हिंदुत्वाची विचारधारा निधर्मी शासनाच्या विचारप्रणालीच्या विपरीत आहे. आपल्या देशात विविध धर्मांचे लोक रहातात, हे जरी आपण मान्य केले, तरीसुद्धा या देशात हिंदूंची संख्या अधिक आहे. हिंदुस्थान ही हिंदूंची मूळ भूमी आहे. हिंदूंना ऐतिहासिक आणि राजकीय परंपरेचा यथार्थ अभिमान आहे अन् त्यांनी तो जतन केला, तर त्यात गैर काहीही नाही. जगातील प्रत्येक राष्ट्र स्वतःची राजकीय आणि ऐतिहासिक परंपरा जोपासत आहे. तशी परंपरा हिंदूंनी जोपासली, तर तो अपराध ठरत नाही; म्हणून ‘हिंदुस्थानचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ ठरते.

१. काँग्रेसने वक्फ बोर्डाला दिलेले अमर्यादित अधिकार म्हणजे राज्यघटना, न्याय आणि नैतिकता यांची हत्या !

दुर्दैवाने आपल्या देशात हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणून स्वीकारण्यास आपल्या देशातील प्रमुख असलेल्या काँग्रेस पक्षाने नकार दिला. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला धक्का लागेल, अशी हिंदु-मुसलमान ऐक्याची भूमिका काँग्रेसने घेतली. काँग्रेसला देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांपेक्षा हिंदु-मुसलमान ऐक्य श्रेष्ठ दर्जाचे वाटले. काँग्रेसची ही चूक आज आपल्याला भोवते आहे.

हिंदु-मुसलमान ऐक्याच्या पोटी काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन करण्याकडे अधिक भर दिला. त्यातूनच मुसलमान समाजाला संतुष्ट करण्यासाठी ‘वक्फ बोर्ड कायदा’ अस्तित्वात आणला. या निर्बंधाद्वारे मुसलमान समाजाला हिंदुस्थानातील भूमी बळकावण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला. कोणत्याही भूखंडाकडे अंगुली निर्देश करून ‘वक्फ बोर्ड’ त्यावर स्वतःचा अधिकार सांगू लागला. अनेक वेळा या ‘वक्फ बोर्ड कायद्या’मध्ये सुधारणा करत या बोर्डाला अमर्यादित अधिकार दिले गेले. परिणामी अत्यंत अल्पकाळात या निर्बंधाचा आधार घेऊन वक्फ बोर्डाने आपल्या देशातील ८ लाख एकर भूमी स्वतःच्या नावावर करून घेतली. दुसर्‍याचा मालकी हक्क असलेला भूखंड बळाने स्वतःच्या नावावर करून घेण्याचा अधिकार एखाद्या संस्थेला बहाल करणे, हेच मुळे अन्यायकारक आहे. दुसर्‍यावर अन्याय करण्याचा अधिकार निर्बंधाने एखाद्या समाजाला देणे, हेच मुळी अवैध आहे. काँग्रेसने अवैधतेला वैध ठरवण्याचा घातलेला घाट म्हणजे राज्यघटना, न्याय आणि नैतिकता यांची हत्या आहे.

२. देशाच्या फाळणीनंतर उर्वरित हिंदुस्थानचे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करणे, हा मुसलमानांचा हेतू !

श्री. दुर्गेश परुळकर

मुळातच हिंदूंनी संघर्ष करून ब्रिटिशांची सत्ता या देशातून नष्ट केली आणि स्वतःचे स्वातंत्र्य प्रस्थापित केले. मुसलमानांची पृथक वृत्ती राष्ट्रीय प्रवाहात कधीही सहभागी झाली नाही. त्यांना संपूर्ण हिंदुस्थानचे इस्लामी राष्ट्रात परिवर्तन घडवून आणायचे होते. ते त्यांचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. त्यामुळे मुसलमान समाजाने मुसलमानांसाठी याच भूमीचा एक भाग वेगळा करून मागितला. मुसलमानांच्या या फुटीरतेला खतपाणी घालून त्यांच्या इच्छेप्रमाणे या देशाचे विभाजन होऊ दिले. तेवढ्याने मुसलमानांचे समाधान झाले नाही. त्यांना संपूर्ण हिंदुस्थानचे इस्लामीकरण करायचे असल्याने विभाजनानंतर विभाजनाला पाठिंबा देणार्‍या मुसलमानांनी पाकिस्तानात जाण्याचे नाकारत ते हिंदुस्थानातच राहिले. त्यामागचा त्यांचा हेतू उर्वरित हिंदुस्थानचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करणे, हा होता.

हा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले पडू लागली. त्यातून घुसखोरी, जिहाद या मार्गांचा अवलंब केला गेला. त्यांनी हिंदूंवर अत्याचार करून त्यांना त्या भागातून पळून जाण्यास भाग पाडले. मोपल्याचे बंड हे त्याचे उदाहरण आहे, तसेच काश्मीरमधील हिंदूंना त्याच कारणासाठी तेथून पळवून लावले. हा प्रकार वेगाने वाढत गेला आणि आता तर अनेक ठिकाणी त्यांनी स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करतांना सर्व निर्बंध धाब्यावर बसवले.

३. हिंदुस्थानात अराजक माजवण्यासाठी पाकचे छुपे युद्ध

पाकिस्तानसारख्या देशाने हिंदुस्थानमध्ये अराजकता निर्माण व्हावी; म्हणून छुपे युद्ध आरंभले. बाँबस्फोट, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद करून हिंदुस्थानचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करण्याचा आणि स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न उजळ माथ्याने मुसलमान समाज करू लागला. ‘सर तन से जुदा (शिरच्छेद)’ करणे, हिंदु स्त्रियांवर बलात्कार करणे या घटना दिवसेंदिवस वाढत गेल्या. ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे, ‘भारत तेरे तुकडे होंगे’ (भारताचे तुकडे होतील) या आणि अशा प्रकारच्या घोषणा मुसलमान समाजाकडून दिल्या गेल्या. हिंदूंवर आक्रमण करण्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केली की, ‘राज्यघटना धोक्यात’, ‘इस्लाम धोक्यात’, ‘लोकशाही धोक्यात’, ‘हिंदु असहिष्णू आहेत’, ‘हिंदु आतंकवादी आहेत’, अशी आरडाओरड करायला मुसलमान समाज आणि त्यांचे पाठीराखे मोकळे राहिले. स्वतःच स्वतःला चिमटा काढायचा आणि तो दुसर्‍याने काढला; म्हणून गळा काढायचा ही वृत्ती मुसलमानांची आहे.

४. वक्फ बोर्डच्या माध्यमातून हिंदुस्थानच्या पोटात इस्लामी राष्ट्राची निर्मिती करण्याचे षड्यंत्र !

वरील गोष्टी घडत असतांनाच ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या आधारे हिंदुस्थानची भूमी अधिकाधिक प्रमाणात हडप करण्याच्या मार्गावरून मुसलमान समाज धावत राहिला. मुसलमानांच्या या राष्ट्रघातकी कृत्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. एखादे राष्ट्र अस्तित्वात येण्यासाठी लोकसंख्या, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा, समान राजकीय उद्दिष्ट, समान श्रद्धास्थाने, हे आणि असे अन्य घटक महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे भूमी हा घटकही महत्त्वाचा आहे. मुसलमानांचे तुष्टीकरण करतांना मुसलमान समाजाला आपल्याच देशातील अमर्यादित भूमी हडप करण्याचा अधिकार दिला गेला. आज या वक्फ बोर्डाला दिल्या गेलेल्या अधिकाराला नियंत्रित करण्यासाठी जी धडपड वा जो प्रयत्न चालू आहे, त्याला विरोध करण्यामागचे कारण आपण जाणून घेतले पाहिजे.

वक्फ बोर्डाची अधिकाधिक भूमी स्वतःची झाल्यावर अनुकूल काळ प्राप्त होताच त्या भूमीच्या आधारे हिंदुस्थानात स्वतःचे इस्लामी राष्ट्र प्रस्थापित झाल्याची घोषणा वक्फ बोर्डाला करता येणार आहे. याचाच अर्थ हिंदुस्थानच्या पोटात इस्लामी राष्ट्राची निर्मिती करून संपूर्ण हिंदुस्थानचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करण्यासाठी वक्फ बोर्डाचा उपयोग करण्यासाठी मुसलमानांना अधिकृतपणे उघडून दिलेले प्रवेशद्वार आहे. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी अधिकृतपणे उघडून दिलेल्या या प्रवेशद्वाराला कायमचे बंद करणे, हाच उपाय आहे. जगातील कोणत्याही राष्ट्रात वक्फ बोर्ड अस्तित्वात नाही, याचे कारणच मुळी तिथे अशा प्रकारच्या कोणत्याही संस्थेची आवश्यकता नाही. ही गोष्ट आपण दुर्लक्षित करून चालणार नाही.

५. शासनसंस्था आणि राष्ट्र या भिन्न संकल्पनांविषयी…

मुसलमान समाज हा जेव्हा ‘अल्पसंख्य’ म्हणून घोषित केला जातो, त्याच वेळी देशात बहुसंख्य हिंदु समाज अस्तित्वात आहे, असाच अर्थ त्यातून निघतो. ‘राष्ट्रीयत्व’ आणि ‘नागरिकत्व’ या २ भिन्न राजकीय कल्पना आहेत. असे असूनही ‘समान नागरी’ आणि ‘नागरिकत्व नोंदणी’ यांना मुसलमान विरोध करत आहेत तो त्यासाठीच ! ‘नॅशनॅलिटी अँड इट्स प्रॉब्लेम्स’, या पुस्तकात सिडनी हर्बर्ट यांनी ‘राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व’ या २ भिन्न कल्पना स्पष्ट करतांना लिहिले, ‘प्रस्थापित सरकारशी एकनिष्ठा हा किती प्रमाणात राष्ट्र निर्माण करणारा घटक असतो, याविषयी याच ठिकाणी पूर्वनिर्णय न करताही आपल्याला जी.के. बीर यांच्या मताशी सहमत होण्यास काहीच प्रत्यवाय नाही. त्यांच्या मते शासनसंस्था आणि राष्ट्र या मूलभूत भिन्न कल्पना आहेत. त्यापैकी शासनसंस्था ही पूर्णपणे राज्यनैर्बंधिक कल्पना आहे. स्थूलमानाने सांगायचे, तर शासनसंस्था म्हणजे एका अधिराज्याखाली असलेला विशिष्ट मानवी गट होय. त्याच्या उलट राष्ट्रही कल्पना मूळ अर्थाने वांशिक आहे. अधिक शास्त्रीय भाषेत सांगायचे, तर ही कल्पना सांस्कृतिक आहे. शासनसंस्थेच्या बंधनाच्या व्यतिरिक्त इतर अनेक रज्जूंनी निबद्ध झालेला मानवी गट म्हणजे राष्ट्र !’

६. डॉ. आंबेडकर यांनी हिंदुत्वाविषयी खोडलेले चुकीचे आरोप

‘हिंदुत्ववाद हा उच्चवर्णीय लोकांचे तत्त्वज्ञान आहे’, असा जो आरोप केला जातो, तो चुकीचा कसा आहे, हे सांगतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘स्पृश्य हिंदु एवढेच अस्पृश्य हिंदूंचे हिंदुत्वावर स्वामीत्व आहे. हिंदुत्वाच्या विकासाला आणि गौरवाला वाल्मीकि, चोखामेळा, रोहिदास या अस्पृश्यांनी वसिष्ठासारखा ब्राह्मण, कृष्णासारखा क्षत्रिय, हर्षासारखा वैश्य आणि तुकारामासारखा शूद्र यांच्याप्रमाणेच हातभार लावला आहे.’ (संदर्भ : ‘हिंदुत्व आणि इतर विचारधारा’, लेखक : ज.द.जोगळेकर)

७. वक्फ बोर्डला विसर्जित करणे हाच पर्याय !

‘द मिथ ऑफ द महात्मा’ या नावाचे पुस्तक मायकेल एडवर्ड यांनी लिहिले आहे. या ग्रंथात गांधीजींचे पुढील वाक्य त्यांनी उद्धृत केले आहे, ‘३२ वर्षांचा संघर्षमय लज्जास्पद अंत झाला आहे.’ ‘स्वदेशी आणि परदेशी गांधीवादी लोकांनी गांधीवादाविषयी अजूनही चर्चा करावी अन् सेमिनार घ्यावेत; पण सत्य, अहिंसा, हिंदु-मुसलमान ऐक्य इत्यादी गोष्टी हिंदुस्थानच्या राजकारणात अयशस्वी ठरल्या’, हे गांधीजींच्या वरील उद्गाराने स्पष्ट होते.

म्हणून मुसलमानांच्या या पृथक वृत्तीला, अरेरावीला आणि आतंकवादाला आळा घालण्याचा एकमात्र उपाय, म्हणजे हिंदूंनी स्वतःचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी, तसेच देशाचे स्वातंत्र्य अन् सार्वभौमत्व जोपासण्यासाठी हिंदुत्वाची कास धरणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठी वक्फ बोर्डला विसर्जित करण्याविना अन्य उपाय नाही.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१५.८.२०२४)

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News