रात्री लवकर निजून सकाळी लवकर उठावे !

‘धर्मशास्त्रात सांगितले आहे की, प्रत्येकाने सकाळी लवकर म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठायला हवे; परंतु आजकाल मुलांना अभ्यास किंवा अन्य कारणास्तव रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची आणि सकाळी ८-९ वाजता उठण्याची अयोग्य सवय लागली आहे. जागरण करणे, हे आरोग्यदृष्ट्या हानीकारक आहे. याउलट ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे’, असे म्हटले आहे. याचा अर्थ जो लवकर झोपून लवकर उठतो, त्याला दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य मिळून तो धनवान होतो.

१. जागरण करण्‍याचे तोटे

जागरणामुळे उष्‍णतेचे विकार होतात, तसेच डोळ्‍यांचे आरोग्‍यही बिघडू शकते.

२. सकाळी उशिरा उठल्यामुळे होणारी हानी

‘जो सकाळी उशिरा उठतो त्याला नरकाची प्राप्ती होते’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. तसेच –

अ. उशिरा उठल्याने शरिरात आळस वाढतो.

आ. उशिरा उठणारी मुले अनेकदा काळजीत आणि निराश असतात; कारण सकाळी वेळेत न उठल्याने त्यांचे वैयक्तिक आवरणे, तसेच गृहपाठ वेळेत पूर्ण होत नाही.

३. सकाळी लवकर उठण्याचे लाभ

पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत. रात्री वातावरणात रज-तम गुणांचे, म्हणजे त्रासदायक वाटण्याचे प्रमाण अधिक असते, तर पहाटे वातावरण सात्त्विक, म्हणजे आनंददायक असते. सकाळचे वातावरणही शुद्ध आणि पवित्र, तसेच शांत आणि उत्‍साहवधक असते. या काळात केलेला नामजप भावपूर्ण होतो, तसेच अभ्यासही चांगला होतो.

नियमितपणे सकाळी लवकर उठणारी मुले आनंदी असतात. मुलांनो, सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावून घ्या, तसेच भावंडांनाही सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी