Menu Close

काश्मिरी हिंदूंच्या रक्षणासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत ! – हिंदुत्वनिष्ठाची मागणी

भुवनेश्‍वर (ओडिशा) : भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि पनून कश्मीर या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथे ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी एक भारत अभियान – कश्मिरकी ओर या मोहिमेच्याअंतर्गत दोन दिवसीय परिषदेस प्रारंभ झाला आहे. या परिषदेस श्रीराम सेना, शिवसेना, हिंदू मक्कल कत्छी (हिंदू जनता पक्ष), हिंदू संहति आणि १० राज्यांतील हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू हे तीन सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असून त्यांनी परिषदेला संबोधित करतांना सांगितले, पनून कश्मीर ही संघटना गेली २५ वर्षे काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी लढा देत आहे. आतापर्यंतच्या सरकारांनी काश्मिरी हिंदूंच्या संरक्षणासाठी काहीच पावले उचलली नाहीत. भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सह-संयोजक श्री. मुरली मनोहर शर्मा म्हणाले की, या संयुक्त परिषदेच्या वतीने भारत शासनाकडे याविषयी तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात येईल अन्यथा काश्मीर आणि भारतही काही काळाने पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया, इराक या देशांसारखा इस्लामी राष्ट्र्राचाच एक भाग बनून राहील. काश्मीरमध्ये व्यापक होत चाललेला इस्लामी कट्टरतावाद संपूर्ण देशात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आद्य शंकराचार्यांनी केलेल्या केरळ ते काश्मीरच्या प्रयाणाचा इतिहास आम्ही पुन्हा रचणार ! – श्री. रमेश शिंदे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले, बहुसंख्यांकांच्या हिताचा विचार व्हावा; म्हणूनच एक भारत अभियान – कश्मीर की ओर ही मोहीम आरंभण्यात आली आहे. आम्ही सर्व एका भारताचे हिंदू आहोत, जे आपल्या बंधूंच्या समवेत आहेत आणि त्यांच्या अधिकारांची मागणी करत आहेत, असा याचा अर्थ आहे. आद्य शंकराचार्यांनी केरळपासून आरंभ करून काश्मीरपर्यंत पिठांची स्थापना केली आणि तेथे तपश्‍चर्या केली. शंकराचार्यांनी केलेल्या केरळ ते काश्मीरपर्यंतच्या प्रयाणाचा इतिहास आता आपल्याला पुन्हा लिहायचा आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना पुन्हा वसवण्याचा अर्थ आहे, भारतमाता की जय, वन्दे मातरम् म्हणण्याची वापसी ! वन्दे मातरम्चा जयजयकार केल्यामुळेे श्रीनगर येथील एन्आयटीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्याच वन्दे मातरम्च्या जयघोषाने आम्ही काश्मिरी हिंदु विस्थापनदिनाच्या दिवशी अर्थात १९ जानेवारी २०१७ ला जम्मूहून काश्मीरकडे प्रयाण करण्यास आरंभ करणार आहोत. देशातील १०० कोटी हिंदु जनता काश्मिरी हिंदूंच्या पाठीशी आहे.

२६ जानेवारीला श्रीनगरमध्ये आम्ही तिरंगा फडकवून दाखवू ! कलम ३७० मुळे काश्मीरमध्ये अराजक ! – श्री. सूर्यकांत केळकर, अध्यक्ष, भारत रक्षा मंच

कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीर भारताचा भाग असूनही या राज्याचा एक ध्वज वेगळा आहे. तेथील सरकारी भवनांवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवू शकत नाही. काश्मीरमधील नगरिकांना दोन नागरिकत्व आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे कायदे काश्मीरला लागू आहेत, अशी व्यवस्था नाही, लोकसभेने पारीत केलेले कायदे काश्मीरला लागू नाहीत, तसेच भारतातील कोणताही नागरिक तेथील भूमी खरेदी करू शकत नाही. कलम ३७० च्या या अनेक परिणामांमुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली असून तेथे अराजक निर्माण झाले आहे. बुरहाण वानीसारख्या आतंवाद्याच्या अंतयात्रेला तेथील मुसलमान सहस्रोच्या संख्येने उपस्थित रहातात. ही सर्व परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारत रक्षा मंचाचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत केळकर यांनी चर्चासत्रात बोलतांना केले.
या परिषदेस डॉ. विमालेंदू मोहंती, अधिवक्ता विष्णु जैन, ए.बी. त्रिपाठी आणि संजीब होता यांनी मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *