लायगाव (जिल्हा संभाजीनगर) येथे हिंदूसंघटन मेळावा
![priyanka_lone-1](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2016/08/priyanka_lone-1.jpg)
संभाजीनगर : सध्या देशामध्ये प्रशासन, आरोग्य, शिक्षण, पोलीस अशा कोणत्याही यंत्रणेत सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. त्यातून सामाजिक दुष्प्रवृत्तीच वाढतेे. या प्रवृत्तींच्या विरोधात संघटितपणे प्रतिकार करता येईल; पण राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी देशातील स्वार्थी लोकशाही व्यवस्था हटवणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे राज्यकर्ते असणारे हिंदु राष्ट्र्र स्थापन करावे लागेल. इसिसचे आतंकवादी वैजापूर आणि परभणी येथे सापडत आहेत. आतंकवाद नष्ट करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श घ्यायला हवा ! देशातील सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले. येथील लायगाव गावातील श्री मारुति मंदिर येथे ७ ऑगस्ट या दिवशी गावातील धर्माभिमानी युवक आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात त्या बोलत होत्या.
मेळाव्याचा प्रारंभी कु. प्रियांका लोणे यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सौ. गौरी देशमुख यांनी केले, तर समितीच्या कार्याची माहिती कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थितांना अवगत करून दिली. या वेळी कु. प्रियांका लोणे यांचा सत्कार धर्माभिमानी सौ. सावित्रा निवृत्ती खुरमुटे यांनी केला. या मेळाव्याला १७० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. मेळावा पार पडण्यासाठी भगवानबाबा मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
उपस्थित मान्यवर – लायगावच्या सरपंच सौ. चंद्रकला गायकवाड, माजी सरपंच श्री. निवृत्ती खुरमुटे, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. उत्तमराव घोंगाणे
क्षणचित्रे
१. कु. प्रियांका लोणे यांच्या मार्गदर्शनानंतर सरपंच सौ. चंद्रकला गायकवाड यांनी पुन्हा त्यांचा समस्त गावकर्यांच्या वतीने सत्कार केला.
२. ७ ऑगस्ट या दिवशी नागपंचमी असूनही मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके महिलांनी पाहिल्यानंतर त्यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाची मागणी केली.
३. मंदिरामधील जागा पूर्ण भरल्यानंतरही अनेक ग्रामस्थ मंदिराच्या बाहेर बसून मार्गदर्शन ऐकत होते.
असे धर्माभिमानी हिंदू हीच हिंदु धर्माची शक्ती !
१. पिंप्री राजा, चितेगाव आणि आडगाव येथील धर्मशिक्षण वर्गातील युवकांनी मेळावा होण्यासाठी पुढाकार घेतला.
२. गावातील अनेक धर्माभिमानी युवकांनी मेळाव्याचा घरोघरी प्रसार केला.
हिंदु जनजागृती समितीविषयी काढलेले गौरवोद्गार !
मेळाव्याच्या समारोपाप्रसंगी आभारप्रदर्शन करतांना माजी सरपंच श्री. निवृत्ती खुरमुटे म्हणाले, चंद्रगुप्त मौर्य याने जशी चाणक्य नीती वापरून धर्माची स्थापना केली, तीच नीती वापरून हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्राची स्थापना करणार, याची निश्चिती वाटते. तुम्ही चांगले कार्य करत असून गावामध्ये घेतलेला हा कार्यक्रमही चांगला झाला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात