![ganesh_mandal](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2016/09/Ganesh_Mandal.jpg)
पुणे : येथील हडपसर, आंबेगाव पठार, बावधन, पाषाण, तसेच जिल्ह्यातील मंचर येथील नवलेमळा भावडी, कुदळेवाडी भावडी आणि सवाईमळा येथे आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, गणेशोत्सवाचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आणि श्री गणेशाविषयीचे शास्त्र आणि राष्ट्र-धर्म यांची सद्यस्थिती या विषयांवर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनानंतर अनेक जिज्ञासूंनी आम्ही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीच्या वहात्या पाण्यातच करू !, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.
हडपसर
येथील सातववाडीमधील श्री गणेश मित्र मंडळ येथे समितीचे श्री. अभिजीत देशमुख यांनी १० सप्टेंबर या दिवशी आदर्श गणेशोत्सव, राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी ५० हून अधिक जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. हे मार्गदर्शन संपल्यानंतर २० हून अधिक युवकांनी आपल्या शंकांचे निरसन करून राष्ट्र आणि धर्म या कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.
बावधन
येथील ड्रिम्स बेली या सोसायटीमध्ये समितीचे श्री. सम्राट देशपांडे यांनी तणावमुक्तीसाठी साधना आणि नामस्मरणाचे महत्त्व या विषयावर ११ सप्टेंबर या दिवशी मार्गदर्शन केले. या वेळी सोसायटीमधील ६० हून अधिक जण उपस्थित होते. हे मार्गदर्शन ऐकल्यानंतर अनेकांनी सोसायटीमध्ये धर्मशिक्षण वर्ग घेण्याची मागणी केली आहे.
पाषाण
येथील सुतारवाडीमधील विघ्नहर्ता गणेश मंडळामध्ये समितीचे श्री. सम्राट देशपांडे यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता या विषयावर १० सप्टेंबर या दिवशी मार्गदर्शन केले. या वेळी ४० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी अनेकांनी दैनिक सनातन प्रभातचा पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव हा विशेषांक उत्स्फूर्तपणे मागून घेतला.
आंबेगाव पठार
येथील श्रीराम मित्र मंडळामध्ये १२ सप्टेंबर या दिवशी समितीचे श्री. पराग गोखले यांनी श्री गणेशाविषयीचे शास्त्र आणि राष्ट्र-धर्म यांची सद्यस्थिती या विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी २० हून अधिक जणांची उपस्थिती होती. या मार्गदर्शनानंतर उपस्थितांनी पुढच्या चतुर्थीला पितृपक्ष हा विषय मांडणे आणि सनातन पंचांगाचे वितरण करणे, यांसाठी बोलावले आहे. तसेच प्रत्येक चतुर्थीला तुम्ही विषय मांडायला या असेही त्यांनी सांगितले. याचसमवेत धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ पाहून अनेकांनी सांगितले की, गावातल्या प्रत्येक मंदिरात आम्ही हे फलक लावू. या वेळी उपस्थितांनी आम्ही श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन नदीच्या वहात्या पाण्यातच करू, असेही उत्स्फूर्तपणे सांगितले.
मंचर आणि पेठ
येथील नवलेमळा भावडी, कुदळेवाडी भावडी आणि सवाईमळा येथे आदर्श गणेशोत्सव कसा असावा ? या विषयावर श्री. विकास थोरात आणि श्री. दिलीप शेटे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी धर्मशिक्षणाची आवश्यकता, मूर्ती विसर्जन आणि स्वसंरक्षणाची आवश्यकता याविषयीची ध्वनिचित्रचकती दाखवण्यात आली. या मार्गदर्शनाचा लाभ एकूण १६० हून अधिक ग्रामस्थ आणि गणेशभक्त यांनी घेतला.
क्षणचित्र : आंबेगाव पठार, नवलेमळा भावडी, कुदळेवाडी भावडी आणि सवाईमळा येथे मार्गदर्शनंतर सर्वांनी उस्फूर्तपणे हिंदु राष्ट्राची (सनातन धर्मराज्याची) शपथ घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात