Menu Close

महाराष्ट्र : चांगेफळ पैसाळी (अकोला) येथे हिंदूंच्या घरांवर १५० हून अधिक बौद्धांचे सशस्त्र आक्रमण !

  • प्राणघातक आक्रमणामुळे अनेक हिंदू घायाळ

  • घरे आणि वाहने यांची नासधूस

  • दागिने आणि पैसे चोरले

अकोला : चांगेफळ पैसाळी या गावातील हिंदूंच्या घरांवर १४ ऑक्टोबरला पहाटे ६ वाजता गावातील सर्व जण झोपेत बेसावध असतांना १५० हून अधिक बौद्ध पुरुष आणि महिला यांनी हातात शस्त्रे घेऊन आक्रमण केले. या वेळी आक्रमणकर्त्या बौद्धांचा मोठा जमाव पुष्कळ प्रक्षुब्ध झाला होता. यात अनेक हिंदू घायाळ झाले असून हिंदूंची सर्व स्तरांवरची प्रचंड हानी झाली आहे. लहान मुले आणि महिला यांना घेऊन अक्षरशः घरातून पळून गेले म्हणून संभाव्य अनर्थ टळला. या संदर्भात ध्वनीक्षेपकावर सूचना देऊन त्यांना भडकवण्यात आले होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दंगलखोरांची संख्या आणि मोठ्या प्रमाणात झालेली दगडफेक यावरून ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे सिद्ध होत आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.

चांगेफळ पैसाळी आणि सुकळी पैसाळी या दोन गावांच्या मधील रस्त्यावर ग्रामस्थ धार्मिक कार्यक्रम साजरा करतात. सुकळी पैसाळी येथील एका युवकाच्या याच रस्त्यावर असलेल्या मांस विक्रीच्या दुकानातून मद्यविक्री होत असल्याने तिथे महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढल्याने चांगेफळ पैसाळी येथील महिलांनी नवरात्रोत्सवात ते दुकान बंद करण्यास भाग पाडले होते. या कारणावरून वाद चालू झाल्याच्या निमित्ताने, तसेच सुकळी पैसाळी येथील शुभेच्छा फलकावरील महापुरुषाच्या प्रतिमेची शाई फेकून विटंबना झाल्याचे निमित्त करून हिंदूंवर हे आक्रमण करण्यात आले.

या मार्गावरील स्वागत कमानीवरूनही दोन गावांत पूर्वी वाद निर्माण झाला होता. ही दंगल होत असतांना पोलीस या ठिकाणी आले होते; मात्र दंगलखोरांनी पोलिसांवर कुरघोडी करून दंगल चालूच ठेवली. दंगलखोरांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केली. (दंगलीत मार खाणारे आणि दंगल रोखू न शकणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर राज्य राखीव दलाची तुकडी बोलावण्यात आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. दोन दिवसांसाठी येथे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी ४५ आरोपींना अटक केली आहे. ७० हून अधिक बौद्धांवर बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. अकोल्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, तसेच विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. २२ घरांची हानी झाल्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दंगलग्रस्तांना शासनाकडून आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.

बौद्धांनी केलेली प्रचंड हानी

बौद्धांनी चांगेफळ पैसाळी गावातील हिंदु पुरुष, महिला, वृद्ध इतकेच काय, लहान मुलांनाही सोडले नाही. आक्रमणकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. हिंदूंवर प्राणघातक आक्रमणे करून त्यांना घायाळ केले. १० जणांना गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांना मारहाण करत असतांना त्यांनी अश्‍लील शिवीगाळही केली. त्यांनी जनावरांनाही मारहाण केली. येथील घरांची मोठ्या प्रमाणावर नासधुस केली.

दंगलखोरांनी घरातील वस्तूंची, तसेच वाहनांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करून हानी केली. छत, आवार, भिंती, दरवाजे, खिडक्या तोडून दंगलखोरांनी थैमान घातले. घरातील वस्तू आणि सामान बाहेर काढले. विजेचे मीटर तोडले. आक्रमकांनी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले, तसेच घरातील दागिने, तसेच रोख रक्कम यांची चोरी केली. दंगलखोरांंच्या आक्रमणापासून स्वतःचा आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी एक महिला कुंपण तोडून तिच्या बाळाला घेऊन अक्षरशः पळून गेली. एका शेतकर्‍याने २० पोती सोयाबीन अंगणात ठेवले होते. त्यावर दंगलखोरांनी पाणी ओतले. या सर्व घटनेनंतर गावकर्‍यांमध्ये एवढी भीती बसली की, रात्री उशिरानेही ते घरी परतण्यास सिद्ध नव्हते. शुक्रवारी या गावातील कोणी लोक जेवलेच नाहीत. या दंगलीचे चित्रीकरण करणार्‍या युवकाला दंगलखोरांनी मारहाण करून त्याचा भ्रमणभाष तोडला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *