भोपाळ येथे धर्मरक्षण संघटनेच्या बैठकीत जनजागृती !
![bhopal_baithak](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2016/11/bhopal_baithak.jpg)
भोपाळ : पूर्वी पूर्ण विद्या प्राप्त केल्यानंतर शिष्य गुरूंना कृतज्ञता म्हणून दक्षिणा द्यायचा, आताच्या विज्ञानाच्या युगात मात्र ‘आधी डोनेशन आणि नंतर एज्युकेशन’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षणात देश आणि धर्म, यांविषयी शिकवले जात नसल्याने आपण स्वाभिमान गमावून बसलो आहोत. त्यामुळेच हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षण देऊन तरुणांमध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य करत आहे. प्रत्येकाने हे धर्मशिक्षण घेऊन त्यानुसार धर्माचरण करायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते येथील वाजपेयीनगरमध्ये ‘धर्मरक्षण संघटने’ने आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. या वेळी व्यासपिठावर समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे, धर्मरक्षण संघटनेचे अध्यक्ष श्री. विनोद यादव आणि भारतीय सैन्यदलातील सैनिक श्री. केदार सिंह उपस्थित होते. या कार्यक्रमाला ४० हून अधिक युवक उपस्थित होते.
श्री. शिंदे पुढे म्हणाले की, पूर्वी सर्व रोगांसाठी एकच डॉक्टर असे; पण आता प्रत्येक अवयवांचे वेगळे डॉक्टर झाल्यावर आपण ‘विज्ञानाने प्रगती केली’, असे म्हणतो. हेच सूत्र हिंदु धर्माला लागू केले, तर हिंदूंमध्ये पूर्वीपासूनच ३३ कोटी अर्थात ३३ प्रकारच्या देवता आहेत. या प्रत्येक देवतेचे कार्य वेगळे आहे. यातून हिंदु धर्माची व्यवस्था किती शास्त्रीय आहे, हे लक्षात येते.
धर्मरक्षण संघटनेचे अध्यक्ष श्री. विनोद यादव म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीशी आम्ही संकेतस्थळ आणि सामाजिक माध्यमांद्वारे जोडले गेलो. समितीचे कार्यकर्ते धर्मशिक्षण देण्यासाठी भोपाळमध्ये आले, यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. येथून पुढेही वेळोवेळी आम्ही समितीकडून मार्गदर्शन घेत राहू.
क्षणचित्रे
१. समितीचे श्री. योगेश व्हनमारे यांनी उपस्थितांना समितीच्या कार्याचा परिचय करून दिला.
२. कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातनच्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
३. कार्यक्रमानंतर धर्मरक्षण संघटनेच्या वतीने समितीच्या सर्व सदस्यांचा भगवे वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.
४. कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेत प्रारंभ झाला. सर्व कार्यकर्त्यांमध्येही शिस्त होती. सर्वांनी आपली पादत्राणे एका रांगेत काढली होती. बसतांनाही सर्वजण एका रांगेत बसले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात