उरण येथे हिंदु धर्मजागृती सभा
![](https://sanatanprabhat.org/marathi/wp-content/uploads/sites/3/2017/01/IMG-20170105-WA0027.jpg)
उरण जिल्हा (रायगड) : इंग्रजांविरुद्ध जी क्रांतीची ठिणगी पडली, त्या ठिणगीचे साक्षीदार म्हणजे चिरनेर गाव आहे. चिरनेर हे शूरवीरांचे गाव आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार हिंदूंची लोकसंख्या अल्प आणि मुसलमानांची लोकसंख्या वाढतच आहे. गावकर्यांनो, धर्म टिकला, तरच गाव टिकेल. जगात एकही हिंदु राष्ट्र नाही; म्हणून आपल्याला भारताला हिंदु राष्ट्र बनवायचे आहे. हिंदु राष्ट्रात प्रत्येक जिवाला संरक्षण असेल. समाज राष्ट्रहिताचा विचार करणारा असेल. न्याययंत्रणाही वेळीच न्याय देणारी असेल. सुरक्षा यंत्रणा सक्षम असेल. प्रशासन कर्तव्यदक्ष असेल. देश भ्रष्टाचारमुक्त असेल. सर्व सण-उत्सव आनंदाने साजरे होतील. धर्माविषयी धर्मबांधव जागृत असतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. ते सत्यनारायण समाजमंदिर चिरनेर, उरण येथे ५ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेत बोलत होते. सभेला २०० जणांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचा प्रारंभ शंखनाद आणि वेदपठण यांनी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश ठाकूर यांनी केले. हिंदु राष्ट्रासाठी आता युवकांनी क्रिकेटची बॅट खाली ठेवा आणि भगवा ध्वज हाती घ्या, असे आवाहन सभेत करण्यात आले.
हिंदूंना सण-उत्सव आनंदाने साजरे करता न येणे याला त्यांचा असंघटितपणाच कारणीभूत ! – सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था
आपला देश हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रथम हिंदु धर्माचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. त्याप्रमाणे धर्माचरण केले पाहिजे. आपण आपला धर्म आणि संस्कृती, तसेच गौरवशाली इतिहास विसरत आहोत. देशात हिंदुबहुल असूनही आपण आपले सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकत नाहीत; कारण आपण संघटित नाही. पाश्चात्यांनी आपल्यावर आक्रमण केले आहे. पूर्वी घराघरातील वातावरण धार्मिक होते; पण आता गोजिरवाण्या घरात लाजिरवाण्या मालिका पाहिल्या जातात, असे सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात