Menu Close

निळ्या ध्वजाला वाहनाची धडक बसल्याने समाजकंटकांकडून ५ वारकरी संतांना अमानुष मारहाण करून तोंडाला काळे फासले !

जिंतूर (जिल्हा परभणी) येथील हिंदूंसाठी आपत्काळसूचक घटना !

  • संतांना मारहाण होत असतांना बघ्याची भूमिका घेणारे पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांचे स्थानांतर
  • मारहाणीचे आळंदी (पुणे) येथे पडसाद
  • वारकरी संप्रदायाकडून मूकमोर्चा
  • १६ समाजकंटकांना अटक
मूकमोर्च्यामध्ये सहभागी वारकरी

जिंतूर (जिल्हा परभणी) : तालुक्यातील येलदरी येथे वाहनांच्या धडकेत निळा ध्वजाचा ओटा तुटून ध्वज खाली पडल्याने वाहनातून प्रवास करत असलेल्या पाच वारकरी संतांना समाजकंटकांनी अमानुष मारहाण करून त्यांच्या तोंडाला काळे फासले. तसेच उठाबशा काढण्यास भाग पाडले. ६ जानेवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली. संतांना मारहाणीच्या निषेधार्थ दुपारी ४ नंतर हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ग्रामस्थ यांच्याकडून जिंतूर बंद करण्यात आले, तर दुसर्‍या दिवशी जमावाकडून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.

या वेळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आल्यावर त्यांचे स्थानांतर (बदली) करण्यात आले.  (स्थानांतर करणे म्हणजे अन्य ठिकाणी त्यांना पुन्हा तशीच अयोग्य कृती करण्यास मोकळीक देण्यासारखे आहे. कर्तव्य योग्य प्रकारे न बजावणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना कायमचे बडतर्फ करून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! हिंदु राष्ट्रात कर्तव्यदक्ष पोलीस असतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी अद्यापपर्यंत १६ समाजकंटकांना अटक करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सांगितले.

१. आळंदी येथील ह.भ.प. संजय बाबा पाचपोरकर यांच्या मठातील काही संत परभणी जिल्ह्यातील गोशाळेची पाहणी करण्यासाठी आले होते.

२. जिंतूर तालुक्यातील इटोली येथील संदीप महाराज इटोलीकर यांची गोशाळा पाहून ह.भ.प. शिवाजी महाराज हत्तेकर, ह.भ.प. रघु महाराज जळगावकर, ह.भ.प. संतोष महाराज, ह.भ.प. बद्रीनाथ नवले महाराज आणि ह.भ.प. प्रभाकर महाराज सुरासे हे सर्वजण त्यांच्या गाडीतून येलदरीमार्गे सेनगावकडे जात होते.

३. येलदरी येथील चौकातील अतिक्रमित रस्त्यावरील निळ्या ध्वजाला त्यांच्या गाडीचा धक्का लागल्याने तो खाली पडला.

४. या वेळी तेथील काही समाजकंटकांनी गाडीत बसलेल्या सर्व संतांसह चालकाला बेदम मारहाण केली. या सर्वांना मारहाण होत असतांना पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. (संतांना मारहाण होत असतांना त्यांचे रक्षण न करणारे पोलीस सर्वसामान्य जनतेचे रक्षण काय करणार ? असे पोलीस हवेच कशाला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

५. या घटनेची माहिती येलदरी गावात पसरताच अन्य समाजाचे तरुण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा झाले.

६. पोलीस अधिकार्‍यांसमक्ष मारहाण होऊनही अधिकारी निष्क्रीय राहिल्याने तेथील नागरिकांनी राज्यमार्गावर ठाण मांडून रस्ता बंद आंदोलन केले.

७. ही वार्ता शहरात पसरताच ४ वाजल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिंतूर बंद करून पोलीस ठाण्यासमोर या घटनेचा आणि निष्क्रीय पोलीस कर्मचारी अन् अधिकारी यांचा निषेध करत कारवाईसाठी रस्त्यावरच ठाण मांडले.

८. दुसर्‍या दिवशी संतप्त जमावाने साठे चौकात पोलिसांच्या २ वाहनांवर दगडफेक करून आणि रस्त्यावर टायर जाळून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला.

९. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांचे निलंबन करावे आणि मारहाण करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला.

१०. आळंदी, जालना, हिंगोली, परभणी येथून मठातील संत-महंत शहरात आले.

११. आदल्या दिवशी रात्री १० च्या सुमारास खासदार संजय उर्फ बंडू जाधव शहरात आले. त्यांनी जमावाला शांत रहाण्याचे आवाहन केले.

१२. दुसर्‍या दिवशी दुपारी १२ च्या सुमारास पोलीस अधीक्षक नियती ठाकर या शहरात येताच जमावाने त्यांच्या वाहनाला घेराव घातला. त्यानंतर खासदार संजय जाधव यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. तेव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांच्या स्थानांतराचा आदेश काढून येलदरी येथील १६ जणांना अटक केल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले, तेव्हा जमाव शांत झाला.

१३. या घटनेविषयी शिवाजी गडदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गाडीत बसलेल्या ५ संतांकडून ६३ सहस्र रुपये रोख आणि ५ भ्रमणभाष आरोपींनी हिसकावून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी येलदरी येथील किरण खंदारे, प्रीतम वाकळे, आकाश खंदारे, दिलीप वाकळे, अनिल आणि किरण खिलारे यांच्यासह १६ जणांना कह्यात घेतले आहे.

(संदर्भ : तेजन्यूज हेडलाईन्स संकेतस्थळ)

राष्ट्रीय वारकरी सेनेकडून घटनेचा निषेध

या प्रकरणी राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी सांगितले की, या घटनेचा आम्ही निषेध करतो. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अ‍ॅट्रोसिटी कायद्यामुळे काही लोकांना खूप बळ मिळाले आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. त्यातून ही अमानुष मारहाण झाली आहे. संबंधित पोलीस अधिकार्‍यांचे केवळ स्थानांतर न करता त्यांना बडतर्फ करण्यात यावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *