Menu Close

प्रसिद्धीमाध्यमांचा हिंदूविरोधी अजेंडा !

१. ख्रिस्ती किंवा मुसलमानांच्या धर्मांतरावर आक्रमक होणार्‍या माध्यमांची हिंदूंच्या धर्मांतराकडे मात्र डोळेझाक !

‘भारतातील प्रसिद्धीमाध्यमांविषयी (लेखात ‘मीडिया’चा अर्थ केवळ ‘इलेक्ट्रॉनिक मिडिया’ अर्थात् वृत्तवाहिन्या आणि वृत्त संकेतस्थळे असा घेतला आहे.) काही वर्षांपासून घडणार्‍या घटनांवर दृष्टी टाकली, तर हे उघड उघड लक्षात येते की, भारतीय प्रसारमाध्यमे हिंदूविरोधी ‘अजेंड्या’वर काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी आग्रा येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अनेक मुसलमानांना हिंदु धर्माची दीक्षा देऊन त्यांची घरवापसी केल्याची घटना घडली होती.  प्रसारमाध्यमांनी याविषयी आक्रमक भूमिका घेत त्याच्याशी संबंधित हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या विधानांना ‘धोकादायक’ म्हणून प्रसारित केले. दुसर्‍याला प्रश्‍न विचारणार्‍या माध्यमांनी कधी त्यांच्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्‍नांना उत्तर दिले, असे कधीही झालेले नाही. आग्रा किंवा गुजरातच्या बलसाडमध्ये झालेली घरवापसीची घटना भारतातील पहिली धर्मांतराची घटना होती का ? ज्यावर माध्यमांनी एवढा आरडाओरडा करावा. तीच माध्यमे एलापूर आणि भागलपूरमधील घटनेविषयी मूग गिळून गप्प का बसली आहे ? येथे अनेक हिंदूंना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करण्यात आले होते. आग्य्रामध्ये प्रलोभन दाखवून धर्मांतर करण्यात आले, असे म्हणतात. मग असा आरोप एलापूरच्या प्रकरणाविषयीही करता येऊ शकतो. याचा अर्थ माध्यमे एलापूर आणि भागलपूर येथील प्रकरणांविषयीही एवढ्यासाठी चूप होती; कारण तेथील धर्मांतर हे हिंदूंचे झाले होते. आग्रा आणि बलसाडचे धर्मांतर हे ख्रिस्ती आणि मुसलमानांचे झाल्याने माध्यमे आक्रमक झाली होती.

ख्रिस्ती मिशनरी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून धर्मांतराचे कार्य करत आहेत आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांचे धर्मांतराचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. त्यावर व्यय (खर्च) करण्यासाठी परदेशातून त्यांना पुष्कळ मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य मिळत असते. याविषयी गुप्तहेर संघटनांनीही सरकारला माहिती कळवली आहे. माध्यमे मात्र याकडे डोळेझाक करत आहे. पूर्वांचलमधील वनवासी जनजातींमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले. हे धर्मांतर प्रलोभन दाखूवन किंवा बळजोरीने करण्यात आले. याविषयी माध्यमांची आक्रमकता दिसणे दूरच; पण साधी चर्चासुद्धा घडवून आणायला ती सिद्ध नसतात.

२. माध्यमांना केवळ हिंदु धर्माला लक्ष्य बनवायचे असणे !

काही तुरळक अपवाद सोडले, तर धर्मांतर हे ‘प्रलोभन’ दाखवूनच घडवले जाते. जेव्हा व्यक्ती दुसर्‍या धर्माचा अभ्यास करते, तो धर्म समजून घेते, तेव्हा तिला त्या धर्मातील चांगल्या गोष्टी दृष्टीस पडल्यास ती व्यक्ती तो धर्म स्वीकारण्यास सिद्ध होते. याला स्वेच्छेने धर्मांतर म्हणता येईल; परंतु आपल्याकडे होणार्‍या धर्मांतराविषयी खरी गोष्ट ही आहे की, ज्यांना धर्मांतरित केले जाते, त्यांना त्या धर्माचे प्राथमिक ज्ञानसुद्धा नसते. याला स्वेच्छेने धर्मांतर कसे मानायचे ? जगासमोर खरे येत नसले, तरी या धर्मांतरामागे प्रलोभन किंवा दबाव हेच मुख्य कारण असते. ज्या वेळी हिंदु संतांवर आरोप केले जातात, त्या वेळी माध्यमे अगदी मीठ-मिरची लावून त्या घटनेचा दुष्प्रचार करतात. तीच माध्यमे ‘जयपूर साई मर्सी होमवाली’ घटनेवर किंवा जम्मू-काश्मीरच्या बडगामवामधील घटनेवर चर्चा करणे सोडाच; पण साधी बातमी द्यायलाही सिद्ध नसतात. कारण ती घटना हिंदु धर्माच्या विरोधातील नसून अन्य धर्मांच्या विरोधातील आहे. माध्यमांना केवळ हिंदु धर्माला लक्ष्य बनवायचे आहे.

३. हिंदु संतांच्या कथित प्रक्षोभक विधानांचा बागुलबुवा करणारी पक्षपाती माध्यमे !

योगऋषी रामदेवबाबा यांनी एकदा एका प्रसंगावरून स्वतःचे सैन्य उभारण्यासंबंधीचे विधान केले. लगेच माध्यमांनी भुवया उंचावल्या आणि ते इतके आक्रमक झाले की, शेवटी रामदेवबाबांना त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. तीच माध्यमे मुसलमान धर्मगुरू सलीम अहमद यांच्या विधानावर गप्प बसली होती. साधी बातमीसुद्धा दाखवायला ते सिद्ध नसतात. सलीम अहमद हे धर्मांतराच्या सूत्रावर बोलतांना केवळ मुसलमान सेना संघटित करण्याविषयीच बोलून थांबले नाहीत, तर संसदेवर आक्रमण करणे, खासदारांना मारहाण करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी जाहीरपणे व्यासपिठावरून देतात.

४. अन्य धर्मांतील चुकांवर बोलण्याचे धाडस माध्यमे दाखवू शकत नाहीत !

हिंदूंमधील बालविवाहावर तोंडसुख घेणार्‍या माध्यमांना मुसलमान मुलींचे १५ व्या वर्षी लग्न ठरवण्याच्या निर्णयावर चर्चा करणे योग्य वाटत नाही. भारतात ‘न्यूज चॅनेल’च्या नावावर २४ घंटे बातम्या देणार्‍या चॅनलचा खरा तोंडवळा (चेहरा) म्हणजे स्वत:च्या गुप्त अजेंड्याला मूर्तस्वरूप देणे हा होय. त्यांचा गुप्त अजेंडा एकमेव हाच आहे की, हिंदु धर्माच्या (कथित) त्रुटी वाढवून-चढवून सांगायच्या आणि हिंदुत्वासाठी काम करणार्‍या व्यक्ती अन् संघटना यांची अपकीर्ती करायची. खरे म्हणजे चुकीला चूक म्हणायचे धाडस असायले हवे; पण भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये ते दिसत नाही. हिंदू सर्वांत सोपे लक्ष्य असल्याने ते साधून माध्यमे स्वतःची पाठ थोपटून घेतात. अन्य धर्मातील चुकांवर बोलण्याचे धाडस माध्यमे दाखवू शकत नाहीत. या मागेही एखादे गुप्त कारण असणार, कारण ‘कारणाशिवाय काहीएक घडत नाही !’

– श्री. मिलिंद शेटे (संदर्भ : ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *