![](https://sanatanprabhat.org/marathi/wp-content/uploads/sites/3/2017/02/Indoor_1.jpg)
इंदूर : महर्षी दयानंद सरस्वती यांनी पाखंडी आणि धर्मांध यांचे खंडण करून धर्मरक्षणाचे कार्य केले. आजही पाखंडी आणि धर्मांध यांचे हिंदु धर्मावरील आक्रमण वाढत आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्या सर्वांना संघटितपणे काम करायला हवे. आज हिंदु धर्मीय म्हणून जन्माला येणार्यांना ‘हिंदु धर्म म्हणजे काय ?’, याचे ज्ञान त्यांना नाही. त्यामुळे प्रथम समाजाला हिंदु म्हणजे काय, याचे ज्ञान देऊन जागृत करायला हवे. जागृतीतूनच सर्व भिंती तोडून हिंदू हे धर्मरक्षणासाठी एकत्र येतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय हिंदू महासभेचे मध्यप्रदेश महामंत्री श्री. जीतेंद्रसिंह ठाकूर यांनी केले. ते येथे आयोजित युग प्रवर्तक महर्षी दयानंद सरस्वती बोधोत्सवामध्ये उपस्थितांना संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर आचार्य श्री. प्रभामित्र, माजी न्यायमूर्ती पं. श्री. वीरेंद्रदत्त ज्ञानी आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे उपस्थित होते. येथील महर्षी दयानंद गंज भागातील आर्य समाज मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला १०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अखिलेशचंद्र शर्मा यांनी केले, तर आर्य समाजाचे प्रधानसेवक डॉ. दक्षदेव गौड यांनी आभारप्रदर्शन केले.
महर्षी दयानंद सरस्वती क्रांतीकारकांना प्रेरणा देणारे योद्धा संन्यासी ! – माजी न्यायमूर्ती पं. वीरेंद्रदत्त ज्ञानी
महर्षि दयानंद सरस्वती यांनी राष्ट्र आणि धर्म रक्षण यांसाठी भारतभ्रमण करून जागृती केली. श्यामजीकृष्ण वर्मा, लाला लाजपत राय, मदनलाल धींग्रा, वीर सावरकर यांच्यासारखे अनेक क्रांतीकारक त्यांच्या विचारांनी प्रेरित होते. एक योद्धा संन्यासी राष्ट्र आणि धर्म यांसाठी किती मोठे कार्य उभे करू शकतो, हे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या चरित्रातून लक्षात येते. आद्य शंकराचार्य यांच्यानंतर जर कोणी पाखंडाचे खंडन करून सनातन धर्माची पुनर्स्थापना केली असेल, तर ते महर्षी दयानंदच होते.
महर्षि दयानंद सरस्वती यांच्यासारखे कार्य करणे, हीच त्यांना खरी कृतज्ञता ! – श्री. योगेश व्हनमारे
वर्ष १९५७ च्या उठावाचे कर्णधार नानासाहेब पेशवे, अजीमुल्ला खाँ, तात्या टोपे आणि बाबू कुंवर सिंह यांना महर्षी दयानंद यांचीच प्रेरणा होती. या उठावाच्या पूर्वी वर्ष १८५५ मध्ये हरिद्वारच्या कुंभमेळ्यात त्यांनी या कर्णधारांशी चर्चा केली होती. व्यक्तीगत साधनेसह राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी कार्य करणारे स्वामीजी योद्धा संन्यासी होते. पूर्वीसारखीच आजही स्थिती आहे. त्यामुळे आपण अंर्तमुख होऊन विचार केला पाहिजे की, महर्षी दयानंद सरस्वती यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन कोणता भाग आपण आचरणात आणत आहोत ? महर्षी दयानंदांसारखे कार्य करणे, हीच त्यांना खरी कृतज्ञता आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य श्री. प्रभामित्र यांनी महर्षी दयानंद सरस्वती बालपणापासून कसे घडले, याविषयी विस्ताराने माहिती दिली. ते म्हणाले की, महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर कथा सांगितल्या जाणे आवश्यक आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला, तरच त्यातून येणारी पिढी बोध घेऊ शकेल.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या प्रारंभी यज्ञ संपन्न झाला. त्यानंतर कु. सिद्धि सूद यांनी भजने म्हटली.
२. कार्यक्रमाचे संचालक डॉ. अखिलेशचंद्र शर्मा म्हणाले की, अखिल भारतीय हिंदू महासभा आणि हिंदु जनजागृती समिती तळागाळात जाऊन जागृतीचे कार्य करत आहे. या कार्यात सर्वांनी सहकार्य
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात