कमी लोकसंख्या असलेल्या तुजारपूर येथे हिंदु धर्मजागृती सभेत ३०० हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![](https://sanatanprabhat.org/marathi/wp-content/uploads/sites/3/2017/03/Tmon01a.jpg)
तुजारपूर-ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : देव, देश आणि धर्म यांच्याप्रती शौर्य गाजवण्यासाठी भारतीय सक्षम आहेत. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा प्रत्येक भारतियाला अभिमान आहे. आतंकवादासह अनेक समस्या आज हिंदूंसमोर आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे अशा स्थितीत भारतीय समाजालाही तो ‘सिंह’ असल्याची, त्याचे शौर्य दाखवून देण्याची जाणीव करून द्यावी लागेल, असे मार्गदर्शन रणरागिणी शाखेच्या सौ. गौरी खिलारे यांनी केले. त्या तुजारपूर येथे ग्रामपंचायतीच्या समोरील पटांगणात झालेल्या सभेत बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मधुरा तोफखाने यांनीही मार्गदर्शन केले. सौ. गौरी खिलारे आणि सौ. मधुरा तोफखाने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सभेला ३०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उस्थित होते.
सौ. मधुरा तोफखाने यांनी सध्याच्या चालू असलेल्या घडामोडी, त्यावर हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हेच कसे उत्तर आहे यांसह अन्य प्रश्नांचा उहापोह केला. सभा लोकांना पुष्कळ आवडल्याने सभेच्या शेवटपर्यंत सर्वजण शांतपणे सभा ऐकत होते. यातील अनेक जिज्ञासूंनी प्रदर्शनाला भेट दिली, तर अनेकांनी धर्मशिक्षणाचे फलक आवर्जून वाचले. सभेसाठी काही वयस्कर लोक उपस्थित होते. कु. उज्ज्वला खेराडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कु. प्रतिभा तावरे यांनी समितीच्या कार्याचा परिचय करून दिला. सभेसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
![](https://sanatanprabhat.org/marathi/wp-content/uploads/sites/3/2017/03/Tmon01.jpg)
क्षणचित्रे
१. सभेनंतर वक्त्यांशी चर्चा करण्यासाठी ४० हून अधिक जण उपस्थित होते. त्यांनी शंकानिरसन करून घेतले. या वेळी मालेवाडी आणि बोरगाव येथे सभेची मागणी करण्यात आली.
२. ‘राजकीय पक्षाच्या सभेसाठीही येथे एवढी उपस्थिती नसते’, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
३. गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी सभेमुळे प्रभावित होऊन ‘यापुढील कोणत्याही उपक्रमांसाठी आमचा तुम्हाला पाठिंबा असेल’, असे सांगितले.
४. सभेसाठी विद्युतजनित्र, व्यासपिठासाठी लागणारे साहित्य, बसण्यासाठी तळवट (सतरंजीचा एक प्रकार), तसेच अन्य सर्व साहित्य गावातीलच हिंदु धर्माभिमान्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिले. सभेसाठी गणेशमंडळे, श्रीशिवप्रतिष्ठान आणि वारकरी यांचे सहकार्य मिळाले.
५. धर्मसभेनंतर ईश्वरपूर येथील महिलांना पोचवण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली.
विशेष
१. गावात शाळूची (पिकाचा प्रकार) काढणी असूनही अनेकजण ती थांबवून सभेसाठी उपस्थित होते. (शाळूची काढणी असतांना हिंदु धर्मजागृती सभेसाठी उपस्थित रहाणार्या सर्वच हिंदु धर्माभिमान्यांनी इतरांसमोर हा आदर्श ठेवला आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. आजची सभा अभूतपूर्व झाली. सभेच्या ठिकाणी पुष्कळ चैतन्य जाणवत होते, असे उपस्थितांनी आवर्जून सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात