सोलापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2017/03/solapur_rha.jpg)
सोलापूर : देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी प्रभु श्रीरामाचा अवमान केला आहे. अशांवर कोणतीही कारवाई होत नाही, असे प्रतिपादन भारुड आणि प्रबोधनकार सौ. गार्गी काळे यांनी केले. येथे २२ मार्च या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात त्या बोलत होत्या.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानचे सदस्य सत्यनारायण गुर्रम, रवी गोणे, लक्ष्मण साळुंखे, श्रीनिवास एकलदेवी, सत्यनारायण कनकी, जीवन सरवदे, संदीप ढगे, गोरक्षक सुधीर बहिरवडेकर, विरुपाक्ष बिराजदार, मल्लिनाथ बिराजदार, बलराज दंतूल यांसह सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती कार्यकर्ते आंदोलनासाठी उपस्थित होते.
आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या
१. धर्मांतर रोखण्यासाठी शासनाने ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा.
२. धार्मिक तेढ निर्माण करणार्या मौलाना देहलवी यांच्यावर कठोर कारवाई करावी.
३. मतदान प्रक्रिया पारदर्शी करावी.
मान्यवरांचे विचार
मंदिरातील नारळबंदी रहित न केल्यास आंदोलन करणार ! – माजी नगरसेवक श्री. बापू ढगे
मंदिरातील नारळावरील बंदी रहित न केल्यास प्रत्यक्ष मंदिराजवळ जाऊन आंदोलन करण्यात येईल. हिंदु धर्मावरील अशा अन्यायकारक गोष्टी आता सहन केल्या जाणार नाहीत. हिंदुत्व विचारसरणीचे शासन असल्याने हिंदूंना न्याय मिळावा.
आपण कोणाला मतदान केले, ते पहाता येण्याची यंत्रणा असणे आवश्यक ! – सौ. दुर्गा कुलकर्णी, सनातन संस्था
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांत वापरण्यात आलेल्या यंत्राच्या विश्वासार्हतेविषयी शंका उत्पन्न होत आहेत. त्यामुळे मतदान पारदर्शी असणे आवश्यक आहे. मतदान यंत्रात आपण कुणाला मतदान केले, हे पहाता यावे, अशी यंत्रणा असायला हवी.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि विनोद रसाळ यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. स्थानिक वृत्तवेध, स्वरांजली, बी.आर्. न्यूज या केबल वाहिन्यांनी समितीचे श्री. विनोद रसाळ आणि रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे यांची ‘बाईट’ घेतली.
२. १४७ नागरिकांनी स्वाक्षर्या करून स्वाक्षरी अभियानाद्वारे आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात