Menu Close

धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, तेलंगण राज्य

भाग्यनगर (तेलंगण) येथे तृतीय राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन

डावीकडून श्री. चेतन राजहंस, दीपप्रज्वलन करताना श्री श्री त्रिदंडी वृतधर रामानुज जीयार स्वामीजी, श्री. राजासिंह ठाकूर आणि श्री. चेतन जनार्दन

भाग्यनगर : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. त्यासाठी समितीचे मी अभिनंदन करतो. भगतसिंह यांनी सर्व संघटनांना एकत्रित केले. समिती त्यांच्याप्रमाणेच कार्य करत आहे. अशा संघटनेशी सर्वांनी स्वत:ला जोडले पाहिजे. येणार्‍या काळात धर्मांध रक्तपात घडवून आणण्यासाठी सर्वप्रकारे सिद्ध आहेत. भाग्यनगरच्या जुन्या शहरांतील काही धर्मांध येथेच राहून देशाचे तुकडे करण्यासाठी इसिसमध्ये सहभागी होत आहेत. त्यांची मानसिकता तशीच बनलेली आहे, असे प्रतिपादन तेलंगणचे भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेनेचे संस्थापक श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले.

येथील कचेगुडा श्याम बाबा मंदिराच्या सभागृहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांसाठी राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन १ आणि २ एप्रिल या दिवशी पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. मी एक राजकीय नेता असूनही हिंदु धर्माच्या रक्षणासाठी काही करू शकत नाही, अशी खंतही श्री. राजासिंह ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केली.

अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद, वेदमंत्रपठण करण्यात आले. संतांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर धर्माभिमान्यांना अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. या अधिवेशनात तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांच्या १४ जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ता, चिंतक आणि लेखक त्याचप्रमाणे शिवसेना, श्रीराम युवा सेना, शिवशक्ती, नेताजी स्फूर्ती केंद्र, हिंदु धर्म रक्षा समिती, हिंदु युवा सेना आणि सनातन संस्था या संघटना सहभागी झाल्या होत्या.

क्षणचित्रे

१. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी हिंदुत्वनिष्ठांच्या मनामध्ये आलेल्या शंकांचे निरसन, सप्तर्षि जीवनाडी आणि इतर नाडी शास्त्रांमध्ये हिंदु राष्ट्राविषयी केलेल्या उल्लेखाविषयीची चित्रफीत दाखवण्यात आली.

२. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या गटचर्चेत, सर्व अधिवक्त्यांनी प्रत्येक आठवड्यात त्यांच्या परिचयातील २ अधिवक्त्यांना समितीच्या कार्याशी जोडून मासातून एकदा एकत्र येण्याचे निश्‍चित केले.

३. कांची कामकोटी पीठम्, भाग्यनगरचे धर्माधिकारी श्री. बालगोपाल जयकृष्णजी यांनी अधिवेशनासाठी सभागृह आणि भोजनव्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली.

४. येथील ६ प्रमुख वृत्तपत्रे आणि २ वाहिन्या यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेली मार्गदर्शने आणि ४ प्रमुख वृत्तपत्रे अन् १ वाहिनी यांनी दुसर्‍या दिवशी झालेली मार्गदर्शने यांना प्रसिद्धी दिली.

 

राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनात उपस्थितांनी व्यक्त केलेले विचार

भारतात हिंदु धर्म सोडून निधर्मीवादाचे धडे शिकवले जातात ! – श्री श्री त्रिदंडी वृतधर रामानुज जीयार स्वामीजी, पिठाधीपती, जगन्नाथ मठ, सीतारामबाग (भाग्यनगर)

प्रत्येक देशात त्यांच्या धर्माविषयी शिक्षण दिले जाते; परंतु भारतात हिंदु धर्म सोडून निधर्मीवादाचे धडे शिकवले जातात. श्रीरामाचे नाव जेव्हा विसरले जाते, तेव्हा हिंदूंची स्थिती संकटात येते. सध्याच्या काळात जन्मदाती माता, भारतमाता आणि गोमाता यांचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. हे सर्व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच साध्य होणार आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने संकल्प केला पाहिजे.

सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हा एकमेव पर्याय ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

हिंदूंना संघटित करणे जेवढे आवश्यक आहे, त्याहीपेक्षा हिंदु संघटनांना संघटित करणे अधिक आवश्यक आहे. जगात एकही हिंदु राष्ट्र नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे निधर्मीवादाची शिकवण ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर सबका साथ सबका विकास, असे सांगितले होते. आजच्या शासनकर्त्यांमध्ये धर्माविषयी जागरूकता नाही. धर्माविषयी जागरूकता नसेल, तर विकास कसा साध्य होईल. केवळ मेट्रो रेल्वे बनवणे किंवा शॉपिंग मॉल बनवणे याला विकास म्हणायचे का ? बलात्कार, भ्रष्टाचार थांबून संरक्षण व्यवस्था, न्याय व्यवस्था, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र यांचा विकास कधी होणार ? श्रीराम, कृष्णदेवराय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे एकही राजा स्वातंत्र्यानंतर अजूनही मिळालेला नाही. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हा एकच पर्याय आहे.

हिंदु जनजागृती समिती ईश्‍वराचे आशीर्वाद मिळण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देत आहे ! – श्री. टी.एन्. मुरारी, अध्यक्ष, शिवसेना, तेलंगण राज्य

श्री. टी.एन्. मुरारी यांनी सनातनच्या साधकांविषयी काढलेले गौरवोद्गार

सनातनच्या साधकांना पाहिल्यानेही आनंद मिळतो. ते साधना करत असल्याने त्यांचा आदर करावा, असे वाटते, असे गौरवोद्गार शिवसेनेचे तेलंगण राज्याचे अध्यक्ष श्री. टी. एन्. मुरारी यांनी सनातनच्या साधकांविषयी काढले.

जनतेमध्ये समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक ! – श्री. चेतन जनार्दन, हिंदु जनजागृती समिती, तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्य समन्वयक

सध्या सर्वसामान्य लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये होणारा भ्रष्टाचार आणि अनैतिकता यांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण, वैद्यकीय, न्यायव्यवस्था आणि पोलीस व्यवस्था ही क्षेत्रे भ्रष्टाचाराने भरलेली आहे. भ्रष्टाचार मुळासकट नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सामान्य नागरिक ज्या समस्यांनी पीडित आहे, त्याविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण केली पाहिजे. एक दिवस ही जनता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये सक्रीय भाग घेईल.

अधिवेशनात झालेली महत्त्वाची सूत्रे

१. हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी स्वत:त ब्राह्मतेज निर्माण होणे आवश्यक असते, त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी साधना करणे का आवश्यक आहे, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

२. अधिवेशनात झालेल्या गटचर्चांमध्ये हिंदूसंघटनासाठी विविध माध्यमांचा वापर करणेे, समान कृती कार्यक्रम हे विषय हाताळण्यात आले.

३. अधिवेशनात अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या यशस्वी कार्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे अधिवक्त्यांचे शंकानिरसनही केले, तसेच अधिवक्त्यांनी धर्मरक्षणाचे कार्य करतांना येणार्‍या न्यायालयीन अडचणींविषयी माहिती दिली.

४. हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा या विषयावर श्री. चेतन राजहंस यांनी मार्गदर्शन केले.

५. मुक्ता तेलगु टीव्ही आणि हिंदवा संस्कृती मॅगझिन यांचे मुख्य संपादक श्री. भरतकुमार शर्मा यांनी प्रसारमाध्यमांद्वारे हिंदू धर्माचा प्रसार करताना येणाऱ्या अडचणींविषयी उपस्थितांना अवगत केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *