Menu Close

निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्याचे कार्य सनातन आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना, संस्थापक अध्यक्ष

हुब्बळ्ळी येथे दुमदुमला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या रणभेरीचा नाद !

डावीकडून कु. नागमणी आचार्य, सौ. विदुला हळदीपूर, श्री. विजय कुमार आणि श्री. प्रमोद मुतालिक (दीपप्रज्वलन करतांना)

हुब्बळ्ळी (कर्नाटक) : देशात काही बुद्धीप्रामाण्यवादी साहित्यिकांची हत्या झाल्यावर सनातन संस्थेवर खोटा आरोप करून तिची चौकशी करण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात काडी इतकाही पुरावा मिळालेला नाही आणि मिळणारही नाही. सनातनधर्मीय खून करणारे नाहीत. हिंदूंमध्ये शक्ती असूनही ते निद्रिस्त आहेत. त्यांना जागृत करण्याचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असून त्यांनी अनेक त्रास झेलले आहेत, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे केले. येथील चव्हाण ग्रीनगार्डन येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे शिवमोग्गा जिल्हा समन्वयक श्री. विजय कुमार, सनातन संस्थेच्या कु. नागमणी आचार्य, रणरागिणी शाखेच्या सौ. विदुला हळदीपूर यांनीही मार्गदर्शन केले. सभेला २६५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

श्री. मुतालिक पुढे म्हणाले की, गेल्या एक मासापासून सनातनचे साधक घरोघरी जाऊन प्रसार करून समाजाला जागृत करण्याचे कार्य करत आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी घर, संसार यांचा त्याग केला आहे. आपण सनातन संस्थेच्या साधकांचा आदर्श घेतला पाहिजे.

क्षणचित्रे

१. श्री. प्रमोद मुतालिक सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी सांगत असतांना धर्माभिमान्यांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता.

२. धर्मजागृती सभेत अधूनमधून पाऊस येत होता आणि साधकांनी प्रार्थना केल्यावर तो थांबत होता.

३. सभास्थळाच्या मागे नारळाच्या झाडावर बसून एका गरुडाने ध्वनीच्या माध्यमातून शुभसंकेत दिला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना १०० वर्षे आयुष्य प्राप्त होऊ दे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना १०० वर्षे आयुष्य प्राप्त होऊ दे; कारण आमच्यासारख्या साधकांना, समाजाला हिंदु राष्ट्र स्थापनेत त्यांचा आशीर्वाद हवा आहे. आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आमची एकजूट होऊन संघटना निर्माण होण्यासाठी, आम्हाला आध्यात्मिक बळ प्राप्त होण्यासाठी प.पू. गुरुदेवांच्या अमूल्य मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. हिंदूंसाठी भारत हे एकच घर आहे. आम्हाला पर्यायी घर नाही. तिकीट हरवल्यावर व्यक्तीची जशी स्थिती होते, तशी भारतियांची स्वातंत्र्य गमावल्यावर व्हावी, तशी स्थिती झाली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणे आवश्यक झाले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *