Menu Close

‘बिलिव्हर्स’वाल्यांकडून सांकवाळ येथे तक्रार करणार्‍या हिंदु युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

प्रमोद मुतालिक यांच्यामुळे कोणतीही हिंसक घटना घडलेली नसतांना त्यांच्यावर गोवा प्रवेशबंदी घालणारे शासन गुंडगिरी करणार्‍या हिंसक ‘बिलिव्हर्स’च्या विरोधात तक्रार करूनही कारवाई का करत नाही ? या असहिष्णुतेविषयी गोवा रक्षक आवाज उठवणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

  • संतप्त नागरिकांनी ‘बिलिव्हर्स’ना चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन

  • सांकवाळ येथील ‘बिलिव्हर्स’ केंद्राबाबत मागील चार वर्षे तक्रार करूनही सांकवाळ पंचायत आणि वेर्णा पोलीस यांचे तक्रारीकडे दुर्लक्ष

वास्को : सांकवाळ येथील ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांकडून येथील बिलिव्हर्स केंद्राच्या विरोधात तक्रार करणार्‍या स्थानिक युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याची घटना २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. बेशुद्ध अवस्थेत हरि नाईक या युवकाला १०८ रुग्णवाहिकेतून जवळच्या चिखली कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. हरि नाईक यांचे मामा मंगलदास नाईक यांनी चार जणांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वेर्णा पोलिसांनी बिलिव्हर्सच्या या चार अनुयायांना कह्यात घेतले आहे.

हरि नाईक आणि मंगलदास नाईक यांनी पत्रकारांना या घटनेसंदर्भात पुढील सविस्तर माहिती दिली.

१. सांकवाळ येथे एका भाड्याच्या खोलीत ‘बिलिव्हर्स’च्या प्रार्थना चालतात. या खोलीच्या जवळच हरि नाईक यांचे घर आहे. रात्री अपरात्री अनोळखी लोक येऊन मोठमोठ्याने संगीत लावून प्रार्थना करून इतरांची झोपमोड करतात. या प्रकरणी हरि नाईक यांनी गेल्या चार वर्षांपासून स्थानिक सांकवाळ पंचायत आणि वेर्णा पोलीस यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. (गेली चार वर्षे अनेक वेळा तक्रार करूनही पोलीस आणि प्रशासन यांनी का दखल घेतली नाही. युवकाचा जीव जायची प्रशासन वाट पहात होते का ? कि पोलीस आणि पंचायत यांचे बिलिव्हर्सवाल्यांशी साटेलोटे आहे ? पोलीस आणि प्रशासन यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला, तर नवल नाही ? त्यापूर्वीच पोलिसांनी संवेदनशील व्हावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. ‘बिलिव्हर्स’च्या या केंद्रात येणार्‍या व्यक्तींची माहिती पोलिसांकडे आहे का? पंचायतीने त्यांना अनुज्ञप्ती दिलेली नसतांना या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अनोळखी व्यक्ती का येतात ?, अशा स्वरूपातील तक्रारी हरि नाईक यांनी अनेक वेळा केलेल्या आहेत; मात्र सांकवाळ पंचायत आणि वेर्णा पोलीस यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केले.

३. २८ जूनला रात्री उशिरा हरि नाईक एकटेच त्यांच्या घराच्या दिशेने निघाले असता, दबा धरून बसलेल्या ‘बिलिव्हर्स’च्या चार अनुयायांनी हरि नाईक यांना पकडून ते प्रार्थना करत असलेल्या ठिकाणी ओढत नेले. (सरकारच्या दुर्लक्षामुळे बिलिव्हर्सवाले किती उद्दाम झाले आहेत, ते यातून दिसून येते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. तेथे त्यांनी हरि नाईक यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. मारहाण होत असतांना हरि नाईक यांनी आरडाओरड केली.

५. आरडाओरड ऐकून हरि नाईक यांचे मामा मंगलदास नाईक यांनी केंद्राकडे धाव घेतली. तेव्हा हरि नाईक यांना चौघे जण मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले.

६. मंगलदास नाईक यांनी लगेच भ्रमणभाषद्वारे आजूबाजूच्या ग्रामस्थांना साहाय्यासाठी बोलावले. ग्रामस्थांनी धाव घेऊन हरि नाईक यांची सुटका केली आणि ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांना यथेच्छ चोप दिला.

७. सांकवाळ येथे धार्मिक तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन चारही ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांना कह्यात घेतले. (हरि नाईक यांच्या तक्रारीची आधीच दखल घेऊन बिलिव्हर्सवाल्यांना समज दिली असती, तर पोलिसांना मोठ्या फौजफाट्यासह यावे लागले नसते; पण ‘काहीतरी विपरीत घडेपर्यंत कारवाई करायचीच नाही’, असे प्रशिक्षणच देण्यात आल्याप्रमाणे पोलीस वागतात. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

‘बिलिव्हर्स’ संघटनेवर कारवाई करण्याची मागणी

‘बिलिव्हर्स’ राज्यात हिंदूंना आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत आहे. रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या आजाराचा लाभ घेऊन त्यांचे धर्मांतर करणे, शासकीय कार्यालयात बिलिव्हर्सचा प्रचार करणे, गावागावात बिलिव्हर्सची केंद्रे उभारून हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांना त्या ठिकाणी प्रार्थनांना बोलावून त्यांचे धर्मांतर करणे आदी प्रकार बिलिव्हर्स पंथीयांकडून सर्रासपणे घडत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी धार्मिक सलोखा बिघडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न अनेक वेळा उद्भवला आहे. (असे असूनही त्यांच्या विरोधात खासदार शांताराम नाईक, ऑल फॉर गोवा, आदी पुरोगामी आणि स्वतःला ‘गोवा रक्षक’ म्हणवणारे चकार शब्दही काढत नाहीत. हिंदू अधिवेशनामुळे मात्र कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येणार असल्याचा यांना भास होतो. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) शिवोली येथे फोर पिलर चर्चमध्येही धार्मिक सलोखा आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला आहे. या संदर्भात पोलीस तक्रारीही झाल्या आहेत. आता सांकवाळ भागातही बिलिव्हर्सनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. धार्मिक सलोखा बिघडवणार्‍या बिलिव्हर्स संघटनेवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. (हिंदूंनी संघटितपणे याविरोधात आवाज उठवून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *