![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2017/08/mumbai_mahapaur.jpg)
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2017/08/mumkbai_upmhapaur_2.jpg)
मुंबई : राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांची होणारी विक्री हा अपराध असून उच्च न्यायालयाने त्यावर निर्बंध घातले आहेत. महापालिकेनेही त्यासाठी प्रबोधन करावे या मागणीसाठी, तसेच आगामी श्री गणेशोत्सवाविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईचे महापौर श्री. विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदने देण्यात आली. श्री गणेशोत्सवाविषयीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पर्यावरण रक्षणाचे कारण पुढे करत श्री गणेशमूर्ती कागदी लगद्याची बनवून तिचे विसर्जन पाण्यात करण्यात यावे असा विचार काही पर्यावरण प्रेमींकडून पुढे आणला जात आहे; मात्र कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणे हे केवळ शास्त्रविसंगतच नसून ते पर्यावरणासाठीसुद्धा अत्यंत घातक आहे. कागदी लगदा पाण्यात विरघळल्यावर त्यातील विषारी घटक पाण्यात मिसळून पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित करतात. त्यामुळे कागदी लगद्यापासून श्री गणेशमूर्ती बनवण्यात येऊ नयेत, असे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश आहेत. त्यामुळे महापौरांनी याकडे लक्ष द्यावे तसेच कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणे धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे असल्याने महापालिकेने कृत्रिम हौदास प्रोत्साहन देऊ नये. मुंबईच्या उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांनाही या वेळी निवेदन देण्यात आले. समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी, श्री. सतीश सोनार आणि अन्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात