हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ओडिशामधील राऊरकेला, हाथीवाडी, कलुंगा, संबलेश्वर येथे हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन
![odisha_col](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2016/02/odisha_col.jpg)
राऊरकेला (ओडिशा) : अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मेघालय, आसाम आणि मिझोराम या ईशान्यपूर्वेकडील राज्यांमधील हिंदूंची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी संबलपूर येथील हिंदूसंघटन बैठकीत सांगितले. श्री. शिंदे यांनी ईशान्यपूर्व भागातील राज्यांना भेटी दिल्यानंतर ओडिशामध्ये आले होते. या वेळी ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर उपस्थित होते.
१. या बैठकीत देशातील हिंदूंच्या चिंताजनक स्थितीविषयी ते म्हणाले, आज अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतांना परदेशात जाण्यासाठी पारपत्र काढण्यासारखेच कागदपत्र सादर करावे लागतात आणि त्यात दिलेल्या समयमर्यादेपर्यंतच राज्यात रहाता येते. आपण भारतातील एका राज्यात जात आहोत कि विदेशात ? असा प्रश्न पडतो.
२. काश्मीरच्या साडेसात लाख हिंदूंना काश्मीर सोडावे लागले. काश्मीरचे आता पूर्ण इस्लामीकरण झाले आहे.
३. मिझोरामच्या शासकीय संकेतस्थळावर भारतातील पहिले ख्रिस्ती राज्य असा परिचय दिला जातो. अरुणाचल प्रदेशमध्ये ९२ टक्के, मिझोराममध्ये ९७ टक्के आणि नागालॅण्डचे जवळ जवळ ८७ टक्के ख्रिस्तीकरण झाले आहे.
४. आसाममधील २६ जिल्ह्यांतील ७ जिल्ह्यांमध्ये मुसलमानांची संख्या ६० टक्क्यांहून अधिक आहे.
५. बंगालमधील १० जिल्ह्यांमध्ये मुसलमान ४० टक्के झाले आहेत. हिंदुबहुल राज्यातील तिसर्या क्रमांकाचे राज्य म्हणून ओडिशा ओळखले जात होते. आता येथेही बांगलादेशी मुसलमान घुसखोरांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे, तसेच आदिवासी क्षेत्रातील हिंदु आदिवासींचेही मोठ्या प्रमाणावर ख्रिस्तीकरण होत आहे.
६. तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमधील हिंदूंचे दिवसेंदिवस घटणारे प्रमाणही अत्यंत चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत हिंदूंनी सतर्क होणे आणि संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
क्षणचित्रे
१. श्री. शिंदे यांनी प्रोजेक्टरच्या साहाय्याने ध्वनीचित्रफिती, वृत्तपत्रीय कात्रणे इत्यादींच्या माध्यमातून या वेळी मार्गदर्शन केले.
२. हिंदु जनजागृती समितीने सुंदरगढ जिल्ह्यातील राऊरकेला, हाथीवाडी, बिरमित्रपूर, कलुंगा या ठिकाणी अशाच प्रकारे हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन केले.
३. स्थानिक हिंदु धर्माभिमान्यांनी या बैठकांना उपस्थित राहून धर्म, संघटन, धर्माचरण आदींसंदर्भात त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात