डॉ. भारत पाटणकर यांच्याकडून वृत्तपत्र स्वातंत्र्याची पुन्हा गळचेपी !
सातारा : श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांची ११ ऑक्टोबरला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने उपस्थित न रहाण्याविषयीचा संदेश श्रमिक मुक्ती दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत पन्हाळकर यांनी व्हॉट्सअॅपवरून पाठवला आहे आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याची पुन्हा एकदा गळचेपी केली आहे.
यापूर्वी १२ सप्टेंबरला पत्रकार परिषदेचे अधिकृत निमंत्रण असतांनाही डॉ. पाटणकर यांनी सनातन प्रभातच्या पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्यास सांगितले होते आणि आम्ही सनातन प्रभातच्या पत्रकाराला बोलावले नव्हते, असे धादांत खोटे सांगितले होते. याविषयीचे वृत्त साम या मराठी वृत्तवाहिनीवरही डॉ. पाटणकर यांच्या प्रतिक्रीयेसह प्रसारित झाले होते. (सनातन प्रभातच्या पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर काढल्याचे वृत्त प्रसारित करून सनातन प्रभातची अपकीर्ती करणारी साम वृत्तवाहिनी डॉ. पाटणकर यांच्याकडून वारंवार होणार्या वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या गळचेपीविषयी कोणतेही वृत्त दाखवत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
विचारस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे डॉ. पाटणकर यांचे अलोकशाही रूप पुन्हा उघड झाले ! – श्री. शशिकांत राणे, समूह संपादक, सनातन प्रभात
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी ११ ऑक्टोबर या दिवशीच्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण व्हॉट्सअॅपवरून पत्रकारांना देतांनाच सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने येऊ नये, असे म्हटले आहे. एरव्ही लोकशाही आणि विचारस्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्या डॉ. पाटणकरांनीच अशा प्रकारे सनातन प्रभातच्या वृत्तपत्रस्वातंत्र्याची गळचेपी केली आहे. पत्रकारांवरील ही दंडेलशाही हे डॉ. पाटणकर यांचे अलोकशाही कृत्य आहे. गेल्या मासातही सनातन प्रभातच्या प्रतिनिधीला डॉ. पाटणकर यांनी निमंत्रण देऊन त्याला पत्रकार परिषदेतून बाहेर जाणास सांगून अपमानास्पद वागणूक दिली होती. डॉ. पाटणकर यांनी अशा कोणत्या गोष्टीचा धसका घेतला आहे की, ते सत्यनिष्ठ सनातन प्रभातला टाळत आहेत ?
आज एका वर्तमानपत्राशी असा दुर्व्यवहार करणारे डॉ. पाटणकर उद्या अन्य पत्रकारांनाही असेच अवमानित करतील. त्यामुळेच पत्रकारांचे विचारस्वातंत्र्य नाकारणार्या अशा प्रवृत्तीच्या विरोधात सर्व पत्रकारांनी एकजुटीने आवाज उठवणे आवश्यक आहे. एरव्ही पत्रकारांवर अन्याय झाल्यावर विरोध करणारे पुरोगामी आता बोलतील का ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात