Menu Close

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण हे ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी रचलेले षड्यंत्र !

मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणात जामिनावर सुटलेले सुधाकर चतुर्वेदी यांचा वाराणसी येथील पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात योगी आदित्यनाथ यांना गोवण्याचा झाला होता प्रयत्न

श्री. सुधाकर चतुर्वेदी वर्ष २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उत्तरप्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही त्या वेळी मुख्य लक्ष्य होते. भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांना कुणीतरी भगवी वस्त्र धारण करणारी हिंदुत्ववादी व्यक्ती हवी होती. त्यामुळे योगी आदित्यनाथ कुठे रहातात ? प्रवास कसे करतात ? त्यांची संघटना कोणती आहे ? या विषयी आमच्याकडे चौकशी केली जायची. त्यासाठी मारहाणही केली जायची. या प्रकरणात त्यांना गोवण्याची सिद्धता चालू होती; पण तसे होऊ शकले नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात

वाराणसी : जिहादी आतंकवादी कारवायांत अन्वेषण यंत्रणेने मुसलमान आरोपींना अटक केल्यानंतर मुसलमानांमधील वाढती अप्रसन्नता लक्षात घेऊन त्यांना खुश करण्यासाठी देशात ‘हिंदु आतंकवाद अस्तित्वात आहे’, हे सिद्ध करण्याचे षड्यंत्रच तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने रचले होते. त्या षड्यंत्राचा भाग म्हणून मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणात निरपराध हिंदुत्वनिष्ठांना अडकवण्यात आले. मुंबईतील आतंकवादविरोधी पथकाने हिंदुत्वनिष्ठांना बेकायदा अटक करून आणि त्यांच्यावर अत्याचार करून या खटल्यात गोवले, असा आरोप या प्रकरणातील आरोपी श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत केला. वाराणसी येथील पराडभवन येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘इंडिया विथ विसडम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.

या वेळी देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात या प्रकरणाच्या अनुषंगाने पुढील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला.

१. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आठवडाभर कोठडीत बेकायदा डांबल्यानंतर २३.१०.२००८ या दिवशी अधिकृतपणे अटक केल्याचे दाखवण्यात आले.

२. त्याच्या दुसर्‍याच दिवशी सैन्याचा खबर्‍या म्हणून काम पहाणारे श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना देवळाली (नाशिक) येथून आतंकवादविरोधी पथकाने बळजोरीने बेकायदा कह्यात घेतले. त्यांना मुंबईत आणून त्यांचा अमानुष छळ केला आणि नंतर खाजगी विमानाने भोपाळला नेले.

३. श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना बेकायदा कह्यात घेतलेले असल्याने या प्रवासात नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाला प्रवाशांची सूची पुरवतांना त्यांचे ‘संग्राम सिंह’ असे खोटे नाव दाखवण्यात आले.

४. भोपाळमध्ये पोहोचल्यावर श्री. चतुर्वेदी यांच्या भ्रमणभाषवरून श्री. समीर कुलकर्णी यांना संपर्क साधून त्यांनाही बळजोरीने कह्यात घेऊन त्याच विमानाने मुंबईत आणले.

५. श्री. चतुर्वेदी यांच्याकडून त्यांच्या देवळालीच्या घराची चावी आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी काढून घेतल्यानंतर शेखर बागडे या पोलीस अधिकार्‍याने चतुर्वेदी यांच्या घरात आर्.डी.एक्स. टाकले.

६. हे सर्व प्रकार म्हणजे भारतात ‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वात असल्याचे भासवून मुसलमानांना खुश करण्याचा तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांचा प्रयत्न होता. या अन्यायी पोलिसांना त्याची योग्य ती शिक्षा मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही केली असल्याचे श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

सनातन हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग ! – अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडिया विथ विसड्म्

‘इंडिया विथ विसड्म्’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सनातन हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मोठे षड्यंत्र रचले गेले. यामध्ये सत्तेचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *