आतापर्यंत भ्रष्टाचार करणार्यांना कठोरात कठोर शासनही होणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सातारा : भारताची युवा पिढी भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालय यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचे धडे विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित जिल्ह्यातील विभागप्रमुखांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री. सुहास नाडगौडा हेही उपस्थित होते.
भ्रष्टाचार जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा असे कार्यक्रम राबविण्यात यावेत. भ्रष्टाचार निर्मूलनाचे फलक जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयाने लावावेत. सर्व कर्मचारी, अधिकारी, नागरिक यांनी प्रलोभनापासून दूर रहावे. प्रत्येक विभागाने सप्ताहामध्ये किमान दोन कार्यक्रम राबवावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकार्यांनी दिल्या. या वेळी जिल्हाधिकार्यांसमवेत अधिकारी आणि कर्मचारी यांनी ‘मी भ्रष्टाचार करणार नाही आणि करू देणार नाही’, अशी प्रतिज्ञा घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात