Menu Close

न्यायालयाची दिशाभूल करून मंदिर पाडण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा डाव भाविकांनी हाणून पाडला

अशा भाविकांचा आदर्श घेऊन अन्यत्रच्या हिंदूंनी मंदिरांच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणे अपेक्षित !

मुंबई : मालाड (पश्‍चिम) येथे रेल्वे स्थानकाजवळ ७० वर्षे जुने असलेल्या श्री सोन्या मारुति मंदिराविषयी न्यायालयाची दिशाभूल करून हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केला. प्रशासन आणि पोलीस यांच्या या दंडेलशाहीच्या विरोधात येथील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाविकांनी यशस्वी लढा दिला. खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंदिराविषयीची सत्य कागदपत्रे सादर केली. यावर मुख्यमंत्री यांनी माहितीची पडताळणी करून मंदिराविषयीचा अहवाल तात्काळ राज्य समितीकडे पाठवण्याचा आदेश दिला. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मनमानी कारभाराला चाप बसला. (फसवणूक करून न्यायालयाचा अवमान करणार्‍या मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

हे मंदिर वर्ष १९४८ या वर्षी बांधण्यात आले आहे. याविषयीची कागदपत्रे भाविकांनी महानगरपालिकेकडे सादर केली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून महानगरपालिकेने मंदिराविषयीची केवळ वर्ष १९६० पासूनचीच कागदपत्रे न्यायालयात सादर केली. (मुंबई महानगरपालिकेचा हिंदुद्वेष ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) खासदार गोपाळ शेट्टी यांनी याविषयी मुख्यमंत्र्यांकडे कागदपत्रे सादर केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे पालिका प्रशासनाला मंदिर पाडण्याची कारवाई थांबवावी लागली.

याविषयी महानगरपालिकेने राज्य सरकारला अहवाल सादर केल्यानंतर मंदिर त्याच ठिकाणी राहू द्यायचे कि, त्याचे स्थलांतर करायचे, याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे. (सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही भोंग्यांवर कारवाई करायला घाबरणारे पोलीस आणि प्रशासन हिंदूंची मंदिरे मात्र बिनधिक्तपणे पाडतात, हे लक्षात घ्या ! कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व असलेले पोलीस आणि प्रशासन जर अशा प्रकारे हिंदूंशी जाणूनबुजून दुजाभावाने वागत असतील, तर भविष्यात हिंदूंच्या संतापाचा उद्रेक झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *