पुणे : योग आणि आत्मज्ञान यांनी प्रेरित होऊनच आपण विश्वशांती स्थापित करू शकतो. भारतीय परंपरांमध्ये योगाचा पहिला प्रयोग ऋग्वेदात झाला. त्या माध्यमातूनच विश्वात परिवर्तन घडू शकेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या आयकर विभागाचे मुख्य आयुक्त डॉ.ए.सी. शुक्ला यांनी केले. विश्वशांती केंद्र (आळंदी) आणि माईर्स एम्आयटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी प्रख्यात संगणकतज्ञ आणि नालंदा विद्यापिठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचे माजी उपकुलगुरु आणि हिंदु विश्वकोशाच्या दुसर्या खंडाचे प्रमुख संपादक डॉ. कपिल कपूर उपस्थित होते. भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर तक्षशीला, नालंदा, काशी विद्यापीठ यांसारखी विद्याकेंद्रे निर्माण व्हायला हवीत, असे मत डॉ. भटकर यांनी व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात