Menu Close

ओवैसींचा रंग !

रंगांमुळे रंगत येते, असे म्हणतात; मात्र काही वेळा रंगच सार्‍याचा बेरंग करतात. आपल्याकडे सध्या रंगांचे राजकारण चालू आहे. साम्यवाद्यांचा लाल, हिंदूंचा भगवा, तर मुसलमानांचा हिरवा रंग, अशी सरळ विभागणी आहे. हिंदूंना भगवा रंग अगदी घट्ट चिकटवला गेला आहे; मात्र मुसलमानांना हिरवा रंग दिला की, आपल्याकडील समस्त पुरोगामी, सर्वधर्मसमभाववाले विचारवंत आणि अभिजन इत्यादींचे पित्त खवळते. भाजप सत्तेवर आल्यामुळे राजकारणाचे भगवेकरण, शाळांतून गीतेचे श्‍लोक शिकवणार, असे काही निर्णय झाले की, शिक्षणक्षेत्राचे भगवेकरण, असे लेबल लावले जाते. अगदी गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक हिंदूंना विविध प्रकरणांत गुंतवून भगवा आतंकवाद निर्मिला गेला. असे असले, तरी आतंकवादाचा खराखुरा हिरवा रंग आजपर्यंत सहजतेने स्वीकारला जात नव्हता. सामान्य व्यक्ती प्रतिदिन वास्तवाचे चटके सोसत असल्यामुळे तिला निराळे तत्त्वज्ञान सांगावे लागत नाही; अथवा फुकटच्या मोठेपणासाठी ती ते नाकारतही नाही. स्वीकारणे-नाकारणे हा प्रश्‍न रहातो केवळ पांढरपेशी पुरोगामी, विचारवंत आणि अभिजनवर्ग म्हणवणार्‍या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाल्यांचा ! हिरवा आतंकवाद म्हटले की, आतंकवादाला रंग नसतो, असे सांगत ही मंडळी चवताळून उठतात. सगळ्यांचे रक्त लालच असते, इत्यादी हास्यास्पद युक्तीवाद चालू होतात. वास्तविक हिंदूही कधी त्यांचा भगवा रंग नाकारत नाहीत आणि मुसलमानांनीही हिरवा आतंकवाद नाकारलेला नाही. मुसलमानांचे कट्टर नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आमच्या हिरव्या रंगासमोर कोणीही तग धरू शकत नाही, असे उद्गार काढले आहेत. त्यामुळे मुसलमानांचा रंग नाकारणार्‍या कंपूचा बेरंग झाला आहे. आम्ही जेव्हा हिरवा रंग परिधान करू, त्या वेळी सगळीकडे केवळ हिरवा आणि हिरवाच रंग दिसेल, असे विखारी उद्गार त्यांनी काढले आहेत.

लांगूलचालनासाठी दबाव !

गेली अनेक वर्षे भारताला दार-उल-इस्लाम (म्हणजे संपूर्ण इस्लाममय) बनवण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे, हेच हिंदुत्वनिष्ठ सांगत आहेत. त्या वेळी हिंदूंनाच कट्टरतावादी ठरवले गेले. आता जेव्हा मुसलमानांच्या नेत्यानेच सगळीकडे हिरवा रंग पसरवण्याची चेतावणी दिली आहे, तेव्हा बाकी जग मूग गिळून गप्प बसले आहे. राहुल गांधी यांच्या मंदिरदर्शनामुळे ओवैसी दुखावले गेले आहेत. एवढी वर्षे निवडणुकीपूर्वी गोल टोप्या घालून इफ्तार पार्ट्या देणारी काँग्रेस आता राजकीय अपरिहार्यतेपोटी मंदिरांमध्ये जाऊ लागली आहे, यामुळे मुसलमानांना असुरक्षित वाटू लागले आहे. ज्या व्होट बँकेच्या आधारे आतापर्यंत राजाश्रय मिळवला, ती गुजरात निवडणुकीत दुर्लक्षिली गेली आहे. प्रचंड गुन्हेगारी, अवैध गोहत्या आणि गोतस्करी, बांगलादेशी घुसखोरांचे देशातील वास्तव्य, आतंकवादी-फुटीरतावादी कारवाया आदी सगळे आतापर्यंत क्षम्य होण्याचे एकमेव कारण एकगठ्ठा मते हेच आहे. हा मार्ग आता आपल्याला सत्तेपर्यंत नेऊ शकत नाही, हे अनुभवातून शिकल्यावर भाजपसह काँग्रेसही मंदिर डिप्लोमसीचा वापर करत आहे. आता ओवैसी यांना लोकशाही आठवत आहे. तरीही ते अलोकशाही मार्गाने सगळीकडे हिरवा रंग दाखवण्याची चेतावणी देत आहेत. एकप्रकारे पूर्वीप्रमाणे लांगूलचालन करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हिंदूंनी सावध होणे आवश्यक !

काँग्रेसला आता तिची हिंदुविरोधी प्रतिमा पालटायची असल्यामुळे तिने गुजरातेत मुसलमानांचा हात सोडला असला, तरी आवश्यकता भासेल, तेव्हा पुन्हा मुसलमानांसमोर गुडघे टेकण्यास ती मागेपुढे पहाणार नाही. राजकारण असेच चालत असते. भारतात यालाच लोकशाही म्हणतात. यातून हिंदूंनी सतर्क व्हायचे आहे. आतापर्यंत जे छुप्या पद्धतीने चालत होते, ते आता त्यांनी उघडपणे व्यक्त केले आहे. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, आतंकवादी कारवाया, घुसखोरी, रोहिंग्यांविषयीचा कैवार हे त्याचेच टप्पे आहेत. भारतभरात ठिकठिकाणी निर्माण होणारे छोटे पाकिस्तान हा त्या हिरवेकरणाचा आरंभ आहे. सर्वाधिक भयावह हे आहे की, एकीकडे धर्मांधांकडून या सार्‍याचा अतिशय आक्रमकपणे प्रसार चालू असतांना तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले असे काही नाहीच, हे हिंदूंना पटवून देण्यासाठी कंठशोष करत आहेत. जाणीवपूर्वक हिंदूंना सर्व बाजूंनी घेरले जात आहे. अन्य देशात कुठेही पुरोगामी नावाचा राष्ट्रघातकी वर्ग पहायला मिळत नाही. आपल्याकडे असे अर्धवट ज्ञानाने पांडित्य करणारे भरभरून असल्यामुळे आणि त्यांना राजाश्रयासह प्रसिद्धीमाध्यमांचाही आश्रय असल्यामुळे संकटाच्या वेळी हिंदूंना गाफील ठेवले जात आहे. हीच खरी धोक्याची घंटा आहे. राहुल गांधी मंदिरात गेले अथवा जानवेधारी झाले, तरी या परिस्थितीत पालट होणार नाही. त्यामुळे हिंदूंनीच आता हे वास्तव स्वीकारून अस्तित्वरक्षणासाठी धडपडले पाहिजे. एकीकडे मुसलमानांमध्ये प्रचंड धार्मिक कट्टरता आणि संघटन असतांना हिंदू कमालीचे असंघटित आहेत. ते धर्मशिक्षणाच्या अभावापुढे पुरोगाम्यांच्या प्रभावाखाली वहावत जात आहेत. त्यामुळे अधर्म्यांच्या विचारधारेचा प्रतिकार करणे, राजकीय स्तरावर हिंदूंना दखलपात्र बनवणे आणि हिरवेकरणापासून अखिल हिंदु समाजाचे रक्षण करणे, हेच खरे राष्ट्रप्रेमी हिंदूंचे दायित्व आहे. बाकी लोकशाही असेपर्यंत रंगांचे राजकारण चालूच रहाणार आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Tags : लेख

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *