![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2017/12/t-rajasingh.jpg)
शिवनितापूर (सिल्लोड), जिल्हा संभाजीनगर : अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर देश आणि धर्म यांविषयी असलेली उदासीनता सोडून छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्याग करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह यांनी केले. २४ डिसेंबर या दिवशी हिंदू एकता महासभेच्या वतीने आयोजित शिवनितापूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले. सभेला १० सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते.
श्री. ठाकूर पुढे म्हणाले की,
१. जिल्ह्याचे नाव ‘औरंगाबाद’ ऐवजी ते पालटून ‘संभाजीनगर’ करण्यात यावे. यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे.
२. देशासाठी बलीदान दिले, त्यांचीच जयंती या देशात साजरी करावी. जाती-पातीचे राजकारण करणार्यांना धडा शिकवून अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा सर्वांनी संकल्प करावा.
३. गोमाता आणि गोवंश यांच्या रक्षणासाठी तरुणांनी पुढे येण्याची आवश्यकता असून त्यासाठी वेळप्रसंगी हातात दांडा घेण्याची आवश्यकता आहे. मला हिंदूंसाठी लढणारी एक युवकांची सेना हवी आहे.
४. उपस्थित सर्व हिंदूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरद्वारे संदेश पाठवून लोकसंख्या नियंत्रित करणारा कायदा लवकरात लवकर संमत करण्यास भाग पाडावे. एका धर्माला ‘हम दो हमारे दो’चा निकष आणि इतर धर्मियांना मात्र हा निकष का नाही ?
या वेळी टी. राजासिंह यांनी गोहत्या, पशूवधगृहे, काश्मिरी पंडितांचे बळजोरीने करण्यात आलेले धर्मांतर, लव्ह जिहाद, टिपू सुलतान जयंती, देवतांची विटंबना या विषयांवर परखड मत मांडले.
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2017/12/Dhule-Dharmajagruti-Sabha-upastithi.jpg)
शौर्य सामर्थ्याची उपासना करणे ही काळाची आवश्यकता ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
सभेच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी ‘शौर्य जागरण’ या विषयावर विचार मांडले.
श्री. जुवेकर म्हणाले की,
१. अवतारांनी धर्मविरोधी दृष्ट प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी शौर्य दाखवले आहे.
२. शिवतानपूर (सिल्लोड) आणि परिसरातील अनेक धर्मांध ‘आयएस्आयएस्’ या आतंकवादी संघटनेत सहभागी होत आहेत. पोलीस आणि प्रशासन मात्र त्यांचे समुपदेशन करून त्यांना सोडून देतात, हे धोकादायक आहे.
३. १४ प्रकारचे जिहाद सध्या देशभरात चालू आहेत. नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ५ सहस्र ८०० महिला बेपत्ता आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १२०० महिला आहेत. देहलीतील निर्भया प्रकरणानंतर मोर्चे निघाले, कायदे कठोर केले, तरीही आज महिला असुरक्षित का ?
४. काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद, केरळ, तमिळनाडू या राज्यांत सातत्याने होणार्या हिंदूंच्या हत्या थांबवायच्या असतील, तर शौर्य सामर्थ्याची उपासना करणे ही काळाची आवश्यकता आहे.
क्षणचित्रे
१. सभेच्या प्रारंभी हनुमानचालिसाचे पठण करण्यात आले.
२. सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष आणि ‘शौर्य जागरण’ विषयक फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात