सर्व पक्ष अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत असल्याने प्रखर हिंदुत्ववादी पक्षाची आवश्यकता ! – श्री. अनुप सरदेसाई
![](https://3.bp.blogspot.com/-jQMEo5SZSTo/VtG_aOC2QpI/AAAAAAAB654/lfmVNhztu58/s320/hindu_mahsabha.jpg)
मडगाव : हिंदुत्वाविषयीच्या समस्यांवर लढा देण्यासाठी गोव्यात अखिल भारत हिंदू महासभा पक्ष कृतीशील होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त या पक्षाची गोव्यात शाखा उघडण्याची घोषणा पक्षाचे गोवा अध्यक्ष आणि हिंदुत्वादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी केली. या वेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. सिद्धार्थ याजी, तसेच सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी उपस्थित होते. पक्षाच्या शाखेच्या स्थापनेची घोषणा केल्यानंतर श्री. अनुप सरदेसाई म्हणाले, हिंदू महासभा हा पक्ष भारतातील सर्वांत जुना पक्ष आहे. लाला लजपत राय आणि मदन मोहन मालवीय यांनी वर्ष १९१५ मध्ये हा पक्ष स्थापन केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वर्ष १९३७ मध्ये या पक्षात प्रवेश केल्यामुळे या पक्षाला वेगळी उंची प्राप्त झाली. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर या काँग्रेसने हिंदूंना लक्ष्य केल्यामुळे त्याचे कार्य थांबले. आता २१ व्या शतकात या पक्षाचे कार्य वाढत आहे. पक्षाच्या मतसंख्येतही वाढत होत आहे. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत हे दिसून आले आहे.
गोंधळाच्या काळात गांधीवादाला झिडकारणे महत्त्वाचे
श्री. अनुप सरदेसाई म्हणाले,
१. गोरक्षा, धर्मांतर विरोधी कायदा, अयोध्येतील राममंदिर, शरिया कायद्याचे निर्मूलन या विषयांवर भाजपने हिंदूंचा विश्वासघात केला असल्यामुळे हिंदू महासभेने राजकीय क्षेत्रात सक्रीय होण्याचे ठरवले.
२. गोव्यात काँग्रेसच्या काळात सनातन संस्था, श्रीराम सेना आदी संघटनांना देण्यात येत असलेली अयोग्य वागणूक भाजपच्या सत्ताकाळातही दिली जात आहे. हिंदु देवतांच्या विडंबनाकडे भाजपने दुर्लक्ष केले आहे.
३. हिंदू महासभा अहिंसा आणि सत्याग्रह या गांधींच्या फसव्या भूलथापांऐवजी नीती आणि अनुशासन या तत्त्वांचा पुरस्कार करते.
अखिल भारत हिंदू महासभा येत्या काळात करणार असलेली आंदोलने
१. भारतीय चलनावरून गांधीची प्रतिमा हटवून त्या जागी अशोकस्तंभाची प्रतिमा छापण्याची मागणी करणे
२. धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करणे
३. सर्व शिक्षणसंस्था शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे
४. भारतीय भाषांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी चळवळ राबवणे
५. गोमांस विक्रीवर बंदी घालणे, तसेच गोमांस आणि गायीचे अवशेष वापरून बनवण्यात आलेल्या सर्व पदार्थांवर बंदी घालणे
६. मुसलमानांकडून हलाल पद्धतीने होत असलेल्या प्राणीहत्येवर बंदी घालणे
७. एन्.डी.टी.व्ही, एबीपी, इंडिया टुडे यांसारख्या अराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांविरोधात चळवळ राबवणे
८. राष्ट्रविरोधी आणि धर्मविरोधी चित्रपट, कलाकार यांच्यावर बहिष्कार घालणे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात