Menu Close

‘कोरेगाव भीमा दंगल हा शासनपुरस्कृत आतंकवाद !’ – आमदार शरद रणपिसे

  • काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांचा कांगावा

  • विरोधकांकडून पू. भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी

इस्लामी आतंकवादाविषयी गप्प राहून कोरेगाव भीमा दंगलीचा संबंध हिंदुत्वाशी जोडणे, हीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची धर्मनिरपेक्षता आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : राज्यघटना पालटण्याचा भाजपचा अजेंडा आहे. कोरेगाव भीमा दंगलीच्या माध्यमातून जातीजातींमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. कोरेगाव भीमा दंगल म्हणजे शासनपुरस्कृत आतंकवाद आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळ सभागृहात केला. तारांकित प्रश्‍नांमध्ये कोरेगाव भीमा दंगलीचा पहिलाच प्रश्‍न असूनही यावर सविस्तर चर्चा होण्यासाठी विरोधकांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला; मात्र सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांचा प्रस्ताव फेटाळून या विषयावर अडीच घंटे चर्चा करण्याला संमती दिली. विरोधकांनी मात्र स्थगन प्रस्तावावर ठाम राहून सभापतींच्या समोरील जागेत येऊन पू. भिडेगुरुजी आणि श्री. एकबोटे यांच्या अटकेची मागणी करत गोंधळ घातला. या गोंधळामुळे सभापतींनी २० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. (विधीमंडळ सभागृहात गोंधळ घालणे, हा जणू राजकारण्यांचा पोरखेळच बनला आहे. अशा लोकप्रतिनिधींना जनतेने आगामी निवडणुकीच्या वेळी लक्षात ठेवावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या वेळी शासनावर टीका करतांना शरद रणपिसे म्हणाले, ‘‘कोरेगाव भीमा दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि आता भाजप सत्तेत आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटे आणि भिडे यांना पाठिशी घातले जात आहे.’’

(म्हणे) ‘भिडे आणि एकबोटे यांच्यापुढे सर्व सरकार झुकले आहे !’ – धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद

कोरेगाव भीमा दंगलीविषयी शासन आणि पोलीस यंत्रणा यांना पूर्वकल्पना होती. सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही दंगल घडली. काही संघटनांनी कोरेगाव भीमा प्रकरणी वातावरण तापवण्याचे काम केले. ज्यांच्यामुळे हे घडले, त्यांना शासन अटक करत नाही. भिडे आणि एकबोटे यांच्यापुढे सर्व सरकार झुकले आहे. दंगलीच्या घटनेला प्रतिक्रिया म्हणून लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. त्या वेळी राज्यभर ‘कोंम्बिंग ऑपरेशन’ करण्यात आले, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

(म्हणे) ‘शासनाच्या पाठिंब्यामुळेच भिडे, एकबोटे यांच्यासारख्या समाज आणि राष्ट्र विघातक प्रवृत्ती फोफावत आहेत !’ – आमदार राजेंद्र कवाडे

पेशव्यांनी दलितांच्या गळ्यात मडकी आणि कमरेला खराटा बांधण्याचा फतवा काढला होता. (असे बिनबुडाचे आरोप करणार्‍यांनी त्याचे पुरावेही द्यावेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्याप्रमाणे आजही दलितांवर अन्याय चालू आहे. हे आक्रमण शासनपुरस्कृत आणि पूर्वनियोजित होते. पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी कारवाई करण्यास पोलीस अपयशी ठरले. गुप्तचर खाते काय करत होते ? पोलीस आणि शासन यांनी दंगल रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. शासनाच्या पाठिंब्यामुळेच भिडे, एकबोटे यांच्यासारख्या समाज आणि राष्ट्र विघातक प्रवृत्ती फोफावत आहेत. (राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍यांवर असे आरोप करणार्‍यांनी कधी धर्मांधांच्या दंगलींविषयी अन् जिहादी आतंकवादाविषयी कधी ‘ब्र’ तरी काढला आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

(म्हणे) ‘हिंदुत्वाचे असे कटकारस्थान खपवून घेतले जाणार नाही !’ – आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस

कोरेगाव भीमा दंगल म्हणजे हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. मिलिंद एकबोटे हे ही दंगल घडवण्यासाठी सक्रीय होते. मिलिंद एकबोटे आणि भिडे यांनी या दंगलीचे कटकारस्थान रचले. हिंदुत्वाचे हे कटकारस्थान खपवून घेतले जाणार नाही. एकबोटे आणि भिडे यांना अटक न करता पोलिसांनी निरपराध दलितांना अटक केली आहे. त्यांच्यावर टाकलेले गुन्हे जोपर्यंत शासन मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही अधिवेशन चालू देणार नाही. (हिंदुत्वाचा व्यापक अर्थ जाणून न घेताच केवळ जातीय राजकारण करण्यासाठी हिंदुत्वावर नाहक टीका करणारे कधीतरी देशसंध ठेवतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *