![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2018/03/Sonipat_Baithak_Sadguru_kaka_photo_clr-p.jpg)
सोनपत (हरियाणा) : धर्माची स्थापना अधर्माच्या माध्यमातून नाही, तर धर्माच्या मार्गानेच होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी धर्मशिक्षण घेऊन संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे धर्मप्रेमींच्या बैठकीत केले. समितीच्या वतीने येथील जीवननगरमध्ये हिंदूसंघटनाच्या उद्देशाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या संकेतस्थळाशी जुळलेले, तसेच हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होणारे धर्मप्रेमी या बैठकीला उपस्थित होते.
हरियाणामध्ये हिंदु जनजागृती समितीला सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध असलेले संत गोपाल दास महाराज !
गोरक्षण करणे आणि गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, यासाठी ९ मासांपासून उपोषण करणारे संत गोपाल दास महाराज यांना जेव्हा कळले की, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि समितीचे कार्यकर्ते हिंदूसंघटनासाठी हरियाणा राज्यात येणार आहेत, तेव्हा त्यांनी राज्यात कुठेही गेल्यास मुक्काम आणि जेवण यांची व्यवस्था ते विनामूल्य करतील, असे सांगून आश्वस्त केले, तसेच कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांना संपर्क करण्यासही त्यांनी सांगितले.
क्षणचित्र : या बैठकीला उपस्थित सोनपत येथील गोरक्षक श्री. योगेश यांनी या बैठकीची बातमी बनवून स्थानिक वृत्तपत्रांना पाठवली. त्यांनी हिंदु राष्ट्राशी संबंधित एका कार्यशाळेचे आयोजन करण्याचा मानसही सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्या मार्गदर्शनानंतर व्यक्त केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात