Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या नेपाळ दौर्‍याचा वृत्तांत

विविध हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांच्या भेटीत धर्म, संस्कृती आणि सामाजिक स्थिती यांविषयी ऊहापोह

गत आठवड्यात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळ दौर्‍यात हिंदुत्वनिष्ठांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कार्य करण्यासाठी उद्युक्त केले. त्याचा वृत्तांत… 

राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई आणि माजी मंत्री सौ. कांता भट्टराई यांना सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे निमंत्रण !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई आणि नेपाळच्या माजी राज्यमंत्री बाल बालिका आणि महिला समाज कल्याणमंत्री सौ. कांता भट्टराई यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी डॉ. माधव भट्टराई आणि सौ. कांता भट्टराई यांना येत्या जून मासात गोवा येथे होणार्‍या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे निमंत्रण दिले.

डावीकडून डॉ. माधव भट्टराई, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सौ. कांता भट्टराई आणि कु. सानू थापा

क्षणचित्र : या वेळी डॉ. भट्टराई यांनी स्वत: हून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची उपस्थितांना ओळख करून दिली,तसेच समितीच्या वतीने गोवा येथे होणार्‍या पुढीलहिंदू अधिवेशनाचीही माहिती दिली.

क्षेत्री सोसायटी नॅशनल फेडरशनचे अध्यक्ष श्री. विष्णु बहादूर क्षेत्री यांच्या भेटीत दिली हिंदु राष्ट्र स्थापनेची ग्वाही !

श्री. विष्णु बहादूर क्षेत्री यांना ग्रंथ देतांना डावीकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या बाजूला सौ. माला खडका

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी क्षेत्री सोसायटी नॅशनल फेडरशनचे अध्यक्ष श्री. विष्णु बहादूर क्षेत्री यांची १८ मार्च या दिवशी भेट घेतली. याप्रसंगी सौ. माला खडका या उपस्थित होत्या. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘रामायण आधी लिहिले गेले आणि नंतर ते घडले, कंसवधाची आकाशवाणी आधी झाली आणि त्याप्रमाणे नंतर कंसाचा वध झाला. याचप्रमाणे आताही काही द्रष्ट्या पुरुषांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे.’’

या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी श्री. क्षेत्री यांना सनातनचे ग्रंथ भेट दिले.

‘माऊंटन’ दूरचित्रवाहिनीचे महाव्यवस्थापक श्री. जीवनाथ ढकाल यांच्याशी सनातन धर्म आणि संस्कृती यांविषयी चर्चा

डावीकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे , श्री. जीवनाथ ढकाल आणि त्यांच्या डाव्या बाजूला श्री. प्रकाश शेडाय

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘माऊंटन’ दूरचित्रवाहिनीचे महाव्यवस्थापक श्री. जीवनाथ ढकाल आणि मार्केटिंग व्यवस्थापक श्री. प्रकाश शेडाय यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. ढकाल म्हणाले, ‘‘नेपाळी लोकांची धर्मावर श्रद्धा असली, तरी त्यांच्यावर पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्यात जागृती करणे आवश्यक आहे. सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘सनातन धर्माची प्रत्येक गोष्ट शास्त्रसंमत आहे. संस्कृत भाषा बोलल्याने वाणीची शुद्धी होते. आपल्याकडे सात्त्विक स्पंदने आकृष्ट होतात. त्याचा जिवाला लाभ होतो. धर्मपरायण राजा आणि प्रजा असेल, तर जनता सुखी रहाते. त्यामुळे नेपाळ आणि भारत या दोन्ही देशांत हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे.’’

‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी’चे नेपाळचे राजदूत श्री. संतोष सहा यांची भेट

श्री. संतोष सहा (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी’ या संस्थेचे नेपाळ येथील राजदूत तथा ‘लिडरशीप अ‍ॅकॅडमी’चे अध्यक्ष श्री. संतोष सहा यांची भेट घेतली. श्री. सहा हे नेपाळमधील विविध भागांतील युवकांना एकत्र करून त्यांना राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण देतात आणि नेपाळच्या पहाडी, तराई इत्यादी भागात कार्य करण्यासाठी उद्युक्त करतात. या वेळी श्री. सहा म्हणाले, ‘‘अलीकडे केवळ राजकीयच नाही, तर धार्मिक क्षेत्रातील संत-गुरु हेही राष्ट्र, संस्कृती यांना प्राधान्य न देता स्वत:ची प्रसिद्धी, मानसन्मान यांमागे लागलेले आहेत.’’

नेतृत्वाविषयी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘राजा हा कधीच ‘कम्फर्ट झोन’ (सुखी आयुष्य) मधे राहू शकत नाही. त्याला नेहमी आंतरबाह्य सतर्कता ठेवणे आवश्यक आहे. राजामध्ये निरंतर संघर्ष करणे, लढणे, त्यागाची सिद्धता ठेवणे आदी गुण असतील, तर तो इतिहास घडवू शकतो. काही चांगले करण्यासाठी सुखाचा त्याग करणे हाच पुरुषार्थ आहे, असे धर्म सांगतो. सुखी आयुष्यातच रममाण राहिले, तर पुरुषार्थ कसा घडणार ?’’

नेपाळ सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता किवांग राय यांच्याशी चर्चा

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळ सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता किवांग राय यांची १८ मार्च या दिवशी भेट घेतली. या वेळी नेपाळच्या सद्यःस्थितीविषयी सांगतांना अधिवक्ता राय म्हणाले, ‘‘नेपाळमधे ब्राह्मण, क्षत्रिय आणि नेवार समाज यांची लोकसंख्या ३५ टक्के आहे. राजकारण आणि सरकारी क्षेत्रातही त्यांचाच अधिकाधिक सहभाग आहे. याविषयी समाजात भेदाभेद आणि असंतोष आहे.’’ याविषयी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘समाजातील सर्व घटकांना संघटित करणे आवश्यक आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *