Menu Close

(परात्पर गुरु) डॉ. आठवले यांचा अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी संदेश

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !

सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतभूमीचे सुपुत्र एकत्रित होत आहेत. ही सर्वांसाठी आनंददायी घटना आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्यासाठी शारीरिक आणि वैचारिक क्षमतेसह आध्यात्मिक बळही असणे आवश्यक असते. केवळ साधना करूनच स्वतःमधील आध्यात्मिक बळ वाढवता येते.

१. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात साधना म्हणून सहभागी व्हा !

रात्री अंधार असतांना आपण सूर्य लवकर उगवावा; म्हणून कितीही प्रयत्न केले, तरी सूर्य लवकर उगवत नाही. तो ठरलेल्या वेळीच उगवतो. याला कालमाहात्म्य म्हणतात. या कालमाहात्म्यानुसार आपण काही केले नाही, तरी वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. असे आहे, तर आपण त्यासाठी प्रयत्न कशाला करायचे ?, असे कोणाला वाटू शकेल. त्याचे उत्तर आहे, त्यामुळे आपली साधना होऊन आपण जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त होऊ शकतो. श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला. तेव्हा गोप-गोपींनी पर्वताला खालून काठ्या लावल्या. आपले कार्य तेवढेच आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे !

२. साधना केल्यानंतरच भगवंत आपल्याकडून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करवून घेईल

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मी काहीतरी करणार, असा विचार चुकीचा असतो; कारण ती स्वेच्छा असते. या स्वेच्छेत अहंभाव असतो. जेथे आपण आपले प्रारब्ध बदलू शकत नाही, जेथे आपल्या स्वेच्छेने झाडाचे पानही हलत नाही, तेथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य आपण करू शकू का ? ते कार्य केवळ भगवंतच करू शकतो. आपण कार्याच्या जोडीला साधना केली, देवाप्रती भाव निर्माण केला, तर पावलापावलाला भगवंत मार्गदर्शन करून आणि आवश्यक तेवढी शक्ती देऊन आपल्याकडून कार्य करवून घेतो.

धर्मबंधूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील हे साधनेचे महत्त्व लक्षात घ्या आणि स्वतः साधना करून भगवंताची कृपा संपादन करा !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *