Menu Close

रामंदिरासाठी आमरण उपोषणाला बसलेले महंत परमहंस दास यांना पोलिसांनी बलपूर्वक रुग्णालयात भरती केले

भाजपच्या राज्यात महंतांना राममंदिरासाठी उपोषण करावे लागते आणि त्यांचे उपोषण बलपूर्वक तोडले जाते, हे भाजपला लज्जास्पद !

अयोध्या : गेल्या ७ दिवसांपासून राममंदिर उभारण्यासाठी आमरण उपोषणास बसलेले येथील तपस्वी छावणी मंदिराचे महंत परमहंस दास यांना पोलिसांनी बलपूर्वक ७ ऑक्टोबरच्या रात्री कह्यात घेऊन त्यांना रुग्णालयात भरती केले.

राममंदिराच्या नावावर सत्ता मिळवणारे भाजपचे सरकार आता राममंदिर उभारण्याचे दायित्व टाळत आहे. जर राममंदिराविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठोस आश्‍वासन देणार असतील, तरच उपोषण सोडण्याचा विचार करू शकतो, असे सांगत महंत परमहंस दास यांनी उपोषण प्रारंभ केला होता. या कालावधीत उपोषण सोडण्यासाठी प्रशासन दबाव आणत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने आमरण उपोषण : महंत परमहंस दास

आॅक्टोबर ३, २०१८

अयोध्या : येथील रामघाटस्थित तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी यांचा त्याग केला आहे. भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. ‘भाजप सरकारने राममंदिर उभारण्याची घोषणा केल्याविना उपोषण थांबणार नाही’, असे त्यांनी घोषित केले आहे. माझ्या उपोषणाची माहिती राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांना देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महंत परमहंस दास म्हणाले की,

१. प्रभु रामचंद्र यांच्या नावावर मते मिळवून सत्ता मिळवणारे भाजपचे सरकार आता राममंदिर उभारण्याचे दायित्व टाळत आहे.

२. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी राममंदिर हा भाजपचा प्रमुख विषय होता; पण नंतर मंदिराच्या उभारणीसाठी भाजप सरकारने जराही हालचाल केलेली नाही. त्यामुळे साधूसंतांमध्ये असंतोष आहे.

३. आमची लढाई मुसलमानांशी नाही, तर भाजपच्या विचारांशी आहे. जर भाजप अ‍ॅट्रॉसिटीवर कायदा बनवू शकतो, तर राममंदिर उभारण्यासाठी कायदा का बनवत नाही ?

४. पुढील वर्षी निवडणूक असून सत्तेत मोदी सरकारचे काही मासच शिल्लक आहेत. तरीही अजून ते यावर निर्णय घेत नाहीत.

५. मोदी सर्व मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात; मात्र अजून ते रामलल्लाच्या दर्शनासाठी आलेले नाहीत.

६. तपस्वी छावणी महत्यागी साधूंचे आचार्य पीठ आहे. याच्या देशभरात १२ लाख शाखा आहेत. याच्याशी संबंधित लक्षावधी साधू आणि भाविक आहेत. त्या सर्वांचे प्रतिनिधित्व करत हे उपोषण केले जात आहे.

संघ आणि भाजप राममंदिर बांधण्यास कटीबद्ध; मात्र काही गोष्टींना वेळ लागतो ! – सरसंघचालक मोहन भागवत

‘राममंदिरासाठी वेळ का लागतो ?’, हे सरसंघचालकांनी स्पष्ट करायला हवे !

हरिद्वार : विरोधी पक्ष अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला उघडपणे विरोध करू शकत नाहीत; कारण देशातील बहुसंख्य समाज भगवान रामाची पूजा करतो, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे पतंजलि योगपिठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. ‘संघ आणि भाजप अयोध्येत राममंदिर बांधण्यास कटीबद्ध आहे; मात्र काही गोष्टींना वेळ लागतो’, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी योगऋषी रामदेवबाबा उपस्थित होते. रामदेवबाबा म्हणाले की, मंत्री आणि श्रीमंत व्यक्ती यांनी लक्षात घ्यायला हवे की, संत आणि साधू हे त्यांच्यापेक्षा अधिक सक्षम आहेत. ते जेथे यशस्वी होतात, तेथे मंत्री आणि श्रीमंत अयशस्वी होतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *