Menu Close

आगरतळा (त्रिपुरा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूसंघटन बैठका

धर्मशिक्षण आणि हिंदूसंघटन या दोन्हींची हिंदु समाजाला अत्यंत आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती


आगरतळा (त्रिपुरा) : इंग्रजांनी षड्यंत्र रचून देशातील गुरुकुल शिक्षणपद्धत बंद पाडली. त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे बंद झाले. आज हिंदूंना लव्ह जिहाद, धर्मांतर, अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. धर्मशिक्षण आणि हिंदूसंघटन या दोन्हींची हिंदु समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. हिंदु जनजागृती समितीने हेच कार्य हाती घेतले आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे केले. येथील रामनगर येथे नुकतीच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूसंघटन बैठक आयोजित करण्यात आली होती. स्थानिक हिंदु धर्माभिमानी श्री. देबज्योती दत्त गुप्ता यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री. रमेश शिंदे आणि धुबरी (आसाम) येथील समितीचे कार्यकर्ते श्री. विश्‍वनाथ कुंडू यांनी मार्गदर्शन केले.

श्री. विश्‍वनाथ कुंडू यांनी ‘धर्मशिक्षण’ आणि ‘जीवनात साधनेचे महत्त्व’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या बैठकीत धर्मप्रेमींनी विचारलेल्या शंकांचे श्री. शिंदे यांनी निरसन केले. मार्गदर्शन आवडल्याचे सर्वांनी सांगितले आणि धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

काशीपूर (आगरतळा) येथे हिंदूसंघटन बैठक

धर्मनिरपेक्ष लोकशाहीने हिंदूंचे सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक शोषण केले ! – रमेश शिंदे

आगरतळा : शहरातील काशीपूर येथे ३० ऑक्टोबर २०१८ या दिवशी हिंदु धर्माभिमानी श्री. सुमन घोष यांच्या पुढाकाराने हिंदूसंघटन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे अपयश आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, ‘‘एवढ्या वर्षांत धर्मनिरपेक्ष लोकशाहीने हिंदूंची एकही मागणी पूर्ण केली नाही; मात्र हिंदूंचे सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक शोषण केले. हिंदूंच्या सर्व समस्यांचे समाधान हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्येच आहे. त्यासाठी सर्व हिंदू आणि हिंदु संघटना यांनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे.’’

या वेळी धर्मप्रेमींनी विचारलेल्या शंकांचे श्री. शिंदे यांनी निरसन केले. उपस्थितांनी धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

हिंदु राष्ट्रासाठी गुरु-शिष्य परंपरेचे आचरण करणे आवश्यक ! – विश्‍वनाथ कुंडू

या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे धुबरी येथील कार्यकर्ते श्री. विश्‍वनाथ कुंडू यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती सांगितली. श्री. कुंडू पुढे म्हणाले, ‘‘इतिहासातून आपण बोध घेतला पाहिजे. जेव्हा जेव्हा धर्मावर आघात झाले, तेव्हा तेव्हा गुरु-शिष्य परंपरेने धर्मस्थापनेचे कार्य केले आहे. भगवान श्रीकृष्ण-अर्जुन, आर्य चाणक्य- चंद्रगुप्त मौर्य, समर्थ रामदासस्वामी-छत्रपती शिवाजी महाराज, आसामचे महापुरुष शंकरदेव-माधवदेव इत्यादी आदर्श उदाहरणे आहेत. हिंदु राष्ट्रासाठी गुरु-शिष्य परंपरेचे आचरण करणे आवश्यक आहे.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *