Menu Close

नालासोपारा प्रकरणी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रातील ‘सनातन’वरील आरोप बिनबुडाचे : सनातन संस्था

‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा उल्लेखही नसल्याने ‘एटीएस्’चे आरोप बिनबुडाचे ! – सनातन संस्था

मुंबई : नालासोपारा येथे कथितरित्या स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (‘एटीएस’ने) आरोपपत्र प्रविष्ट केल्याचे प्रसिद्धीपत्रक अत्यंत हास्यास्पद, सदोष आणि निषेधार्ह आहे. जर प्रसिद्धीपत्रक इतके सदोष आहे, तर प्रत्यक्षात आरोपपत्र किती सदोष असेल, याची कल्पना करता येईल. या आरोपपत्रातील प्रमुख आरोपांविषयी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली.

श्री. राजहंस यांनी सनातन संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, या प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट झाले आहे, असे केवळ प्रसिद्धीपत्रक मिळाले आहे. अद्याप प्रत्यक्ष आरोपपत्र आम्हाला मिळालेले नाही. त्यामध्ये काय आहे, हे पाहून तपशीलवार भूमिका नंतर मांडू; पण या आरोपांतून काँग्रेस शासनाने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने ‘भगव्या आतंकवादा’चे षड्यंत्र रचले; मात्र ते असफल झाल्याचे चित्र आता दिसत आहे. आता पुन्हा एकदा ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना बळीचा बकरा बनवले जात आहे आणि ‘मालेगाव भाग २’ हे कथानक रचले जात आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार तेथील विशेष अन्वेषण पथकाला (एस्.आय.टी.ला) हाताशी धरून आगामी निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा ‘भगव्या आतंकवादा’च्या सूत्रावर वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि कर्नाटक एस्.आय.टी.च्या सूचनांवरूनच महाराष्ट्र ए.टी.एस्.ने ही कारवाई केल्याचे सर्वज्ञात आहे. तरी आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे. ‘न्यायालयात खटला चालवण्याचे धैर्य अन्वेषण यंत्रणांनी दाखवावे. आम्ही आमचे निर्दोषत्व न्यायालयात लवकरच सिद्ध करू’, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे.

आतंकवादविरोधी पथकाच्या प्रसिद्धीपत्रकातील आरोप आणि वस्तूस्थिती

१. आरोप : तपासादरम्यान सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती व काही अन्य तत्सम संघटनांचे सदस्य यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

वस्तूस्थिती : आम्ही या प्रकरणी २६ ऑगस्ट २०१८ या दिवशी पत्रकार परिषद घेऊन, तसेच त्याआधीही ४ प्रसिद्धीपत्रकांद्वारे ‘अटक केलेल्या आरोपींपैकी कोणीही सनातन संस्थेचे साधक नाहीत’, हे स्पष्ट केले होते. यातील सर्वश्री वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार यांच्या स्वतंत्र संघटना असून ते संस्थेच्या हिंदूसंघटनविषयक कार्यक्रमांत किंवा आंदोलनांत कधी कधी सहभागी झाले होते; मात्र ते सनातन संस्थेचे साधक म्हणजेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे नाहीत. उर्वरित ५ जणांची नावे तर आम्ही त्यांना अटक झाल्यानंतर प्रथमच ऐकली. ‘यामध्ये काही अन्य संघटनांचे सदस्य आहेत’, हे अन्वेषण यंत्रणांना ठाऊक आहे. असे असूनही जाणीवपूर्वक त्या संघटनांची नावे न घेता केवळ ‘हिंदु धर्माचा प्रचार आणि हिंदु राष्ट्रासाठी जागृती यांसाठी कार्य करतो’, म्हणून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची नावे घोषित केली जातात ! यातूनच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सूडबुद्धीने लक्ष्य करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. यापूर्वीच्या प्रकरणांत जे जे सनातन संस्थेचे साधक होते, त्यांना आम्ही कधीही नाकारले नाही; कारण ते आमचेच होते; मात्र या प्रकरणात जे आमचे साधक नाहीत, त्यांचे नाव घेऊन सनातन संस्थेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे.

२. आरोप : या सदस्यांनी सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात नमूद केल्यानुसार हिंदु राष्ट्राच्या उद्देशाने प्रेरित होऊन आपापसांत संगनमत करून समविचारी युवकांची दहशतवादी टोळी निर्माण केली.

वस्तूस्थिती : सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात मुळात ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दच नाही. त्यामुळे ‘हा ग्रंथ वाचून हिंदु राष्ट्राच्या उद्देशाने हिंदुत्वनिष्ठ प्रेरित होते’, असे म्हणणे हे धादांत खोटे आहे. यातूनच आरोपपत्र किती सदोष आहे, हेच लक्षात येते. ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात हिंदु धर्मातील श्रीमद्भगवद्गीता, महाभारत, रामायण आदी अनेक महान धर्मग्रंथांतील वचने, श्‍लोक आदींचे संदर्भ दिले आहेत. तसेच हा ग्रंथ साधारण २० वर्षांपूर्वी प्रकाशित केला असून गेली १० वर्षे मागणीअभावी पुनर्मुद्रित केला गेला नाही; मात्र अन्वेषण यंत्रणांचा खोटारडेपणा सिद्ध करण्यासाठी आम्ही या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तो सर्वांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

‘क्षात्रधर्म साधना’ हा ग्रंथ वाचून जर कोणी हत्या वा आतंकवादी कृत्य करत होते’, असे एटीएस् म्हणते, तर लाखो हत्या आणि शेकडो बॉम्बस्फोट करणारे जिहादी आतंकवादी आणि सहस्रोंची निर्घृण हत्या करणारे नक्षलवादी कोणते ग्रंथ वाचून ही कृत्ये करतात, हे सांगण्याचे धाडस ‘एटीएस्’ दाखवील का ?

३. आरोप : पुणे येथे डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध करण्यासाठी गावठी बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब, अग्नीशस्त्रे, दगडफेक आदींद्वारे घातपात घडवायचा होता.

वस्तूस्थिती : या प्रकरणी काही हिंदुत्वनिष्ठांना ऑगस्ट २०१८ मध्ये अटक केली. ‘सनबर्न फेस्टिव्हल’ डिसेंबर २०१७ मध्ये झाला. प्रत्यक्षात या फेस्टिव्हलला आम्ही गेली ३ वर्षे वैध मार्गाने विरोध करत आहोत. यामध्ये सनबर्नच्या आयोजकांनी कायदा धाब्यावर कसा बसवला, शासनाचा किती कोटी कर बुडवला, किती वनसंपदा अवैधरित्या नष्ट केली, दारूबंदी असलेल्या गावात कशी दारू रिचवली गेली, अमली पदार्थांच्या सेवनामुळे किती युवक मृत्यूमुखी पडले, ध्वनीमर्यादा असूनही किती ‘डेसिबल’ आवाज केला गेला आदींविषयी मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन केले. यांसह सांस्कृतिक र्‍हास झाला, तो वेगळाच ! या आंदोलनात ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. या ३ वर्षांच्या वैध आंदोलनांत कुठेही घातपात सोडा, अपकृत्यही घडले नाही. असे असतांना थेट बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचा आरोप करणे, हा धादांत खोटारडेपणा आहे. कट रचल्याचा आरोप करणारे, प्रत्यक्षात काही घडले का, याविषयी काही बोलतील का ?

४. मराठी प्रसिद्धीपत्रकात आरंभी १२ पैकी ९ जणांना अटक आणि ३ जण फरार असे म्हटले आहे; पण शेवटी १२ जणांची नावे दिली असून त्यांना अटक केली असल्याचे म्हटले आहे. सदोष प्रसिद्धीपत्रक, सदोष आरोपपत्र आणि सदोष अन्वेषण कसे असते, याचे हे उदाहरण आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *