Menu Close

ख्रिस्त्यांची वाढती धर्मांधता !

देशात भारत सरकारच्या पाठोपाठ सर्वाधिक भूखंड असलेली कोणती संस्था असेल, तर ती म्हणजे चर्च ! यात आता भर म्हणून कि काय चर्चच्या संख्येतही भरमसाठ वाढ होत आहे. २.१ टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या पनवेलमध्ये १६ चर्च आहेत, हे एक त्यातील उदाहरण. अंबरनाथ, कल्याण या परिसरातही ख्रिस्ती मिशनर्‍यांनी उच्छाद मांडला आहे. या ठिकाणीही चर्च वाढत आहेत आणि धर्मांतरही झपाट्याने होत आहे. भारत ख्रिस्तमय करण्याची पोपची महत्त्वाकांक्षा लवकरच पूर्ण होणार, अशी सध्या स्थिती आहे. गोव्यात तर पोर्तुगीज पुन्हा गोव्यात आले कि काय, असे वाटावे अशी घटना नुकतीच शंखवाळी येथे घडली; पण पोर्तुगीज आले त्या वेळी गोमंतकीय जनता जशी निद्रिस्त आणि बेफिकीर होती, तशीच ती आताही आहे, असे आढळते.

धर्मांतरामागे विदेशी निधी, हे उघड सत्य !

पनवेलमधील जागरूक हिंदू ते अल्पसंख्य होणार या भीतीने भयग्रस्त आहेत. कोणी म्हणेल की, हिंदूच धर्मांतर करत आहेत, तर ख्रिस्त्यांना दोषी कशाला धरायचे ? एका अर्थी हे बरोबर आहे; पण अधिक व्याजदराचे आमीष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन नंतर पोबारा करणार्‍या आर्थिक संस्था असतात, त्या वेळी आपण गुंतवणूकदारांना ‘तेथे गुंतवणूक का केलीत ? आता भोगा फळे’, असे न म्हणता त्या आर्थिक संस्थेवर कारवाई करतो. या निकषावरच आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी.

एखाद्या बाबाबुवाच्या नादी जसा अंधश्रद्धाळू हिंदु समाज लागतो, तसा आता तो ख्रिस्त्यांच्या नादी लागत आहे. जे कोणी धर्मांतर करत आहेत, त्यांपैकी किती जण त्यांना आध्यात्मिक अनुभूती आल्या म्हणून धर्मांतर करत आहेत आणि किती जण त्यांचा आर्थिक स्तर वाढण्यासाठी धर्मांतर करत आहेत, हे पहायला हवे. पनवेलमधील हिंदूंनी ‘चर्चला एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठी मोठी चर्च बांधायला निधी कुठून उपलब्ध होतो ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. चर्चला निधीची कमतरता नसते. भारताला ख्रिस्तमय करण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी येतो. या निधीची आतापर्यंत कधी चौकशी झालेली नाही. आताही विदेशी निधीचे विवरण न देणार्‍या संस्थांची सूची प्रसिद्ध झाली आहे; पण अद्याप कारवाई झालेली नाही.

पैसा म्हटले की, बहुतांश भारतियांच्या तोंडातून लाळ गळू लागते. याच पैशांच्या मोहापायी देशात भ्रष्टाचार ठायी ठायी पहायला मिळतो, तसेच देशद्रोहही पैशांपायीच होतो. गुणी व्यक्तीला नव्हे, तर पैसा असलेल्या व्यक्तीला आपल्या देशात मान मिळतो. त्यामुळे पैशांच्या लालसेपोटी लाळघोटे हिंदू धर्मांतरही करायला सिद्ध झाले, तर आश्‍चर्य नाही.

गोव्यात इन्क्विझिशनची आठवण !

गोव्यात नुकतीच इन्क्विझिशनचे स्मरण करून देणारी घटना घडली. शंखवाळी तीर्थक्षेत्रातील श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर पाडून पोर्तुगिजांनी तेथे चर्च बांधले होते; पण नियतीला हे मान्य नव्हते. हे चर्च काही वर्षांनी ढगफुटीत कोसळले. चर्चचा केवळ समोरील भाग उभा राहिला. तो अजूनही तेथे आहे. आजूबाजूच्या ख्रिस्त्यांना काही वर्षांपूर्वी त्याविषयी समजले. त्यांनी आता त्या ठिकाणी मोठी चर्च उभारण्याचे नियोजन अवैधरित्याच चालू केले आहे. चर्चचे अवशेष असलेली ही जागा पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असून ते संरक्षित क्षेत्र आहे; पण या देशात कायदे केवळ हिंदूंसाठीच आहेत ना ? त्यामुळे त्यांनी यंत्राद्वारे सपाटीकरण करणे, जत्राही भरवणे, असे चालू केले आहे. हे सर्व कायदे पायदळी तुडवून पुरातत्व खाते, पोलीस यांच्या सहकार्याने होत आहे. याला विरोध करील त्याला जिवे मारण्याचे फर्मानच जणू तेथील फादरनी काढले आहे. चर्चचे फादर सेर्मान देऊन ख्रिस्त्यांना एकत्र बोलावतात आणि तेथील हिंदूंच्या झाडांना आग लावण्यास प्रवृत्त करतात आणि चर्च संस्था याविषयी गप्प बसते. आर्च बिशप वर्षातून एकदा बिशप पॅलेसवर राजकारणी, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांना बोलावतात आणि भाषणातून देशात अशांती असल्याचे, अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचे सांगतात; पण शंखवाळी येथील घटनेविषयी ते एका शब्दानेही बोलत नाहीत. ‘आपण स्वतंत्र गोव्यात आहोत कि पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीत ?’, असा प्रश्‍न पडावा, एवढी शंखवाळी येथे भयानक परिस्थिती आहे.

पोर्तुगीज काळात पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकियांवर अत्याचार केले असले, तरी त्यामागे पोर्तुगालमधील चर्च संस्थेचा मोठा हात होता. सर्व आदेश चर्चकडून यायचे आणि त्यानुसार त्याची कार्यवाही व्हायची. हा इतिहास आतापर्यंत पाठ्यपुस्तकातून न शिकवण्यामागेही मोठे षड्यंत्र आहे. वर्ष २००४ मध्ये पर्रीकर यांचे सरकार सत्तेवर आले , त्या वेळी त्यांनी पोर्तुगिजांच्या इन्क्विझिशनच्या इतिहासावर एक ध्वनीचित्रचकती काढली होती. त्यातून ख्रिस्ती धर्माचा अपमान होत असल्याचा कांगावा करण्यात आला. सत्य इतिहास पचवायची चर्चमध्ये सहनशक्ती नाही. त्यानंतर पर्रीकर सरकार गडगडले आणि पुन्हा काँग्रेस आली; कारण धर्माचा अपमान झाल्याच्या समजुतीतून ख्रिस्त्यांनी भाजपला मतदान केले नाही. एका निवडणुकीत वेळ्ळी येथील चर्चच्या फादरच्या सांगण्यावरून ख्रिस्त्यांनी पोलिसांवर आक्रमण केले. या प्रकरणात फादरवर आणि अन्य ख्रिस्त्यांवर गुन्हा नोंद झाला होता; पण पोलिसांवर दबाव आणला गेला आणि सरकारनेही हे प्रकरण न्यायालयात न चालवण्याचा निर्णय घेतला. एवढा चर्चचा राजकारणात दबदबा आहे. ही वाढती धर्मांधता गोव्यातील धार्मिक सलोख्याला तडा देणारी आहे. खर्‍या धार्मिक सलोख्यासाठी आणि धर्मांतराची वावटळे रोखण्यासाठी हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *