![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2019/02/ramakant_goswami.jpg)
प्रयागराज (कुंभनगरी) : आपल्यासारख्या धर्मप्रसार करणार्या संस्थेची देशाला पुष्कळ आवश्यकता आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संस्थेने शाखा उघडली पाहिजे. वृंदावन येथील संस्थेच्या प्रसाराचे उत्तरदायित्व मी घेण्यास सिद्ध असून सनातनच्या धर्मप्रसार कार्यासाठी आमचा वृंदावन येथील आश्रम समर्पित करतो, असे प्रतिपादन श्रीजीबाबा गोधामचे अध्यक्ष ब्रजभक्त तथा कथावाचक आचार्य रमाकांत गोस्वामी यांनी १ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरीत आयोजित ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना त्यांनी भेट दिली. त्यांनतर ते बोलत होते. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा ‘श्री गंगाजी की महिमा’ हा हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
याप्रसंगी आचार्य रमाकांत गोस्वामी म्हणाले की, संस्कृतीच्या आचरणासंदर्भात हिंदूंची स्थिती ही ‘ना घर का, ना घाट का’, अशी झाली आहे. या युगात पावला-पावलाला मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. आपल्या या प्रदर्शनातून ‘धर्माचरण कसे करावे’, ‘जन्मदिवस कसा साजरा करावा’, यांसह अनेक प्रकारची माहिती उत्तम प्रकारे दिली आहे. सध्या विवाहामध्ये लोक पाणीग्रहण विधीला अल्प वेळ देतात; मात्र छायाचित्रे काढण्यात अधिक वेळ दवडतात. ही खेदाची गोष्ट आहे. ‘धर्माचरण कसे करावे’, या सदंर्भातील प्रचाराचे आपले कार्य कौतुकास्पद आहे.