Menu Close

‘हिंदु स्त्रियांनो, देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सर्वार्थांनी सक्षम व्हा !’

सावंतवाडी येथे आयोजित रणरागिणी शाखेच्या वर्धापनदिन सोहळ्यात वक्त्यांचे आवाहन

डावीकडून सद्गुरु सत्यवान कदम, श्री. राजेंद्र पाटील, श्री. मनोज खाडये आणि सौ. अनुश्री गावस्कर

सावंतवाडी : सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात आहेत. हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. समाजात विविध माध्यमांतून अश्‍लीलता फोफावत आहे. हे थांबवून आपल्या कुटुंबासह देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी चित्रपट अभिनेत्रींचा नव्हे, तर राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या विरांगनांचा आदर्श घ्या आणि नियमित साधना अन् आत्मरक्षण यांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सर्वार्थांनी सक्षम व्हा, असे आवाहन येथे आयोजित रणरागिणी शाखेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी केले.

हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेचा वर्धापनदिन ६ मार्चला येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालय माजगाव, भटवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी शंखनाद झाल्यानंतर सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये, सनातनचे श्री. राजेंद्र पाटील, रणरागिणी शाखेच्या जिल्हा समन्वयक सौ. अनुश्री गावस्कर उपस्थित होत्या. रणरागिणी शाखेच्या कार्याची ओळख सौ. अनुश्री गावस्कर यांनी करून दिली. सूत्रसंचालन सौ. शिवानी रेडकर यांनी केले.

या वेळी श्री. मनोज खाडये म्हणाले, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदु महिलांनी धर्माचरणी झाले पाहिजे. धर्मावरील आघात रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम झाले पाहिजे. हिंदु धर्मियांवर लव्ह जिहाद, लोकसंख्या जिहाद, लॅण्ड जिहाद, चित्रपट जिहाद यांसारखे विविध प्रकारच्या जिहादच्या माध्यमातून आघात होत आहेत. याचे गांभीर्य आपण लक्षात घेऊन सतर्क झाले पाहिजे. मागील काही वर्षांत महिलांवरील अत्याचारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. लव्ह जिहादनामक षड्यंत्र समाजात मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. या माध्यमातून हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे, त्यांच्याशी निकाह करून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणे, आतंकवादी कारवायांसाठी त्यांचा उपयोग करणे, यांसारखे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. हिंदु महिलांनी धर्माचरण केल्यास अशा प्रकारांना त्या बळी पडणार नाहीत.

सौ. अनुश्री गावस्कर म्हणाल्या, मातेच्या गर्भामध्ये असल्यापासून मुलांवर संस्कार होत असतात. आज हिंदु स्त्री धर्म विसरत असल्याने तिच्याकडून धर्माचा आदर केला जात नाही. आज महिला हीच आपल्या कुटुंबाला संस्कारक्षम बनवू शकते. महिलाच संस्कारहीन झाली, तर ती पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार ? घरातली स्त्री धर्माचरणी असल्यास त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होईल. आजच्या स्त्रिया पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्याने आपल्या संस्कृतीला विसरल्या आहेत. आपणच भारतीय संस्कृतीचा अवमान करत आहोत. इतर देशांतील लोकांनी आपले अनुकरण केलेले नाही; पण आपण त्यांचे अनुकरण करतो.

या वेळी सनातनचे राजेंद्र पाटील म्हणाले, स्वातंत्रपूर्व काळातही अनेक रणरागिणींनी प्राणांचे बलीदान दिले. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर होणारे आघात रोखणे, ही आपली साधनाच आहे.

क्षणचित्रे

  • लव्ह जिहादला हिंदु तरुणी कशा प्रकारे बळी पडतात, याची (झी न्यूज या वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेली बातमी) ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.
  • उपस्थित महिलांनी हात उंचावत वज्रमूठ करून धर्मरक्षणार्थ घोषणा दिल्या.
  • या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.
  • या सोहळ्याला १३० रणरागिणींची उपस्थिती लाभली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *