त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केलेल्या २० व्या ‘साधना तथा राष्ट्ररक्षा’ शिबिरात शंकराचार्यांचे मार्गदर्शन
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2019/05/Nischalanand_sarswati400.jpg)
त्र्यंबकेश्वर : व्यासपीठ (धर्मसत्ता) हे दिशा देणारे केंद्र आहे. सध्या देशात दिशादर्शन करणारे पुष्कळ अल्प आहेत. इंग्रजांच्या कूटनीतीचा प्रभाव अजूनही देशात जाणवत आहे. गेल्या ७१ वर्षांत हिंदूंची दुर्दशा झाली आहे. जो जनतेशी संवाद साधत नाही, तो जनतेसाठी काही करू शकत नाही आणि नंतर तो संपून जातो. शंकराचार्य हे शासकांवर शासन करण्याचे पद आहे. रामराज्य स्थापित होणारच आहे. त्यासाठी सर्वांनी समवेत येऊन कार्य करणे अपेक्षित आहे. सर्वांनी प्रतिदिन धर्मासाठी १ घंटा देऊन धर्मसेवा केली पाहिजे, असे मार्गदर्शन पुरी पीठाधीश्वर श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. येथे आयोजित केलेल्या २० व्या ‘साधना तथा राष्ट्ररक्षा’ शिबिरात ते बोलत होते.
व्यासपिठाने (धर्मसत्तेने) राजतंत्राला (राजसत्तेला) दिशा दिल्यासच रामराज्याची स्थापना होईल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2019/05/Sadguru-Charudatt-Pingle_clr.jpg)
व्यासपिठाने (धर्मसत्तेने) राजतंत्राला (राजसत्तेला) दिशा दिल्यासच आपल्याला अपेक्षित अशा रामराज्याची स्थापना होईल. सध्याची शिक्षणव्यवस्था आपल्याला धर्मापासून दूर नेणारी आहे. ही स्थिती आपल्याला पालटायची आहे. जसे व्यक्तीचे मन असते, तसे राष्ट्राचे मन असते. जर राष्ट्राचे मन धर्मविरोधी विचारांशी जोडलेले असेल, तर ते राष्ट्र विनाशाकडे जाईल. मन धर्माशी जोडले गेल्यासच आपले रामराज्याकडे मार्गक्रमण होईल. समाजात वाईट वृत्तीचे लोक वाढत असले आणि आपण संख्येने अल्प असलो, तरी पांडवांसारखी वृत्ती ठेवून संतांचे मार्गदर्शन घेणे, धर्माच्या मार्गावर चालणे, धर्माच्या विरोधात संघर्ष करण्याची वृत्ती जागृत ठेवून धर्मरक्षणासाठी योजना सिद्ध करणे आवश्यक आहे. आपल्याला शंकराचार्यांकडून मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे आपण त्यानुसार आचरण केले पाहिजे, हे आपले दायित्व आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘सशक्त भारत’ या विषयावर केले. या वेळी समितीचे महाराष्ट्र, तसेच छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.