Menu Close

‘काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची देशाबाहेर हकालपट्टी करा !’

जळगाव आणि पनवेल येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी हिंदूंची एकमुखी मागणी

पनवेल येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

जळगाव : काश्मीरचे मूलनिवासी असलेल्या लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तर दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृतरित्या काश्मिरमध्ये वसवण्यात आले आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आता केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन करावे आणि घुसखोर रोहिंग्या मुसलमानांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केली. ते १७ ऑगस्ट या दिवशी महागरपालिकेजवळ आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. या वेळी श्री. पिसोळकर यांनी सरकारने काश्मीरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेल्या मंदिरांची पुनर्स्थापना करावी आणि गेल्या ७० वर्षांत जम्मू-काश्मीर विधानसभेने केलेले देशविरोधी कायदे रहित करावेत, अशीही मागणी केली.

मारहाणीचा खोटा आरोप करून देशाची एकता धोक्यात आणणार्‍या अशा धर्मांधांच्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करावी आणि चर्चमधील घोटाळे, अनैतिक व्यवहार लक्षात घेता देशभरातील सर्व चर्चचेही सरकारीकरण करण्यात यावे आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या.

‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या निर्णयानुसार कागदी लगद्याच्या मूर्तींच्या विक्रीवर बंदी आणा !

प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयाची योग्य कार्यवाही न केल्यामुळे आज बाजारात मोठ्या प्रमाणावर कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती विक्रीस येत आहेत. एकीकडे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम हे प्लास्टिकबंदीचा जनहितकारी निर्णय घेतात, तर दुसरीकडे प्रशासन कागदी लगद्याच्या माध्यमातून प्रदूषण वाढवत आहे. हा विरोधाभास दूर करण्यासाठी आता मंत्रीमहोदयांनी जातीने लक्ष घालून कागदी लगद्यापासून मूर्तीची निर्मिती, वितरण आणि विक्री होणार नाही, अशा सक्त सूचना राज्य शासन अन् जिल्हा प्रशासन यांना द्याव्यात, तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाने शाडू मातीच्या आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी गणेशभक्तांनी या आंदोलनात केली.

पनवेल येथेही राष्ट्रीय हिंदू आंदोलन

पनवेल : येथे १७ ऑगस्ट या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने विविध प्रखर राष्ट्रीय मागण्यांसाठी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले. या वेळी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रहित केल्याविषयी भारत सरकारचे अभिनंदन करण्यात आले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी म्हणाले, ‘‘काश्मीर ही कश्यपऋषींची भूमी आहे, ती आता खर्‍या अर्थाने मुक्त झाली. आज हिंदूंना कायदे आहेत; पण इतर धर्मियांना कायद्याची भीती नाही; असेच दिसून येते. हिंदूंच्या मंदिरांवर प्रशासक नेमून तिथे भ्रष्टाचार केला जात आहे. खर्‍या अर्थाने चर्चना शासनाने कह्यात घेऊन त्याचे सरकारीकरण करायला हवे; कारण हिंदूंची फसवणूक करून धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या चर्चच्या भूमी घोटाळ्यांची प्रकरणे, तसेच आर्थिक गैरव्यवहार, ननवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. यासाठी अशा चर्चचे सरकारीकरण करावे, अशी या आंदोलनाच्या माध्यमातून हिंदूंची मागणी आहे.’’

या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. मोहिनी मांढरे, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मुंबईकर आणि दिघाटी गावचे उपसरपंच श्री. रोहिदास शेडगे यांनीही विविध राष्ट्र-धर्मविषयक मागण्यांविषयी सूत्रे मांडली.

या आंदोलनात पनवेल तालुका बजरंग दल संयोजक श्री. संजय उलवेकर आणि नॅशनल प्रोग्रेसिव्ह यूथ संघटनेचे उपाध्यक्ष उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *