Menu Close

मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथे ‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेसाठी श्रीरामनामाचा उत्स्फूर्त उद्घोष !

‘रामनाम संकीर्तन अभियाना’च्या माध्यमातून नामजपामुळे घराघरांतून हिंदूंचे संघटन !

मुंबई : रामराज्यासम ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरे, सनातन संस्थेचे साधक, सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, धर्मप्रेमी आदींच्या घरी रामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा जप करतांना अत्यंत समाधानी वाटत असून नामजपात मन एकाग्र होत असल्याने परमोच्च आनंद अनुभवता आला’, असे जपामध्ये सहभागी असलेल्यांनी सांगितले. सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी हे अभियान राबवण्यास आरंभ केला आहे.

मध्य मुंबई

भांडुप : येथे ९ ठिकाणी नामजप करण्यात आला. या वेळी एकूण ८९ जण उपस्थित होते.

नामजपाविषयी पूर्वसूचना मिळून चैतन्याची अनुभूती येणे !

सौ. जान्हवी महाडिक यांच्या घरी श्रीरामाचा जप करण्यात आला. २ महिलांना  ‘या वास्तूत आध्यात्मिक कार्य व्हावे’, असे आधीपासूनच वाटत होते. सौ. श्रेया रावराणे यांच्या निवासस्थानी केलेल्या नामजपानंतर महिलांनी स्वतःहून एका लयीत रामरक्षास्तोत्र म्हटले. नामजप एका लयीत होऊन त्यातून चैतन्य मिळत असल्याचे उपस्थितांना जाणवले. वाचक श्री. कमलाकर तांबे यांच्या घरी जप करतांना उपस्थितांना आनंद मिळून मनाला शांत वाटले. वाचक श्री. महेंद्र पवार यांच्या घरी नामजप केल्यानंतर वास्तूमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. ‘या ठिकाणी पुन्हा जप घ्यावा’, असे उपस्थितांनी सांगितले.

मुलुंड : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धर्मसत्संगातील महिलांनी जपाचे आयोजन केले होते. तसेच गांधीनगर येथील श्रीराम मंदिरात मंदिराच्या पुजार्‍यांनी जप करण्याचे आयोजन केले होते. येथे काही महिला स्वत:च्या बाळांना घेऊन नामजप करत होत्या. अन्य २ ठिकाणीही नामजप करण्यात आला. मुलुंड येथे एकूण ४७ जण या अभियानात सहभागी झाले होते.

घाटकोपर : येथे १० ठिकाणी केलेल्या नामजपामध्ये ८१ जण सहभागी झाले होते. नामजप आवडल्याने एका जिज्ञासू महिलेने स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये त्याचे ध्वनीमुद्रण (ऑडिओ) घेतले.

नामजप भावपूर्ण होऊन शांतीची अनुभूती येणे !

धर्मप्रेमी वैशाली जाधव यांच्या घरी नामजप केल्यावर ‘आधी २ वेळा करण्यात आलेल्या जपापेक्षा या वेळीचा जप भावपूर्ण झाला’, असे उपस्थितांनी सांगितले. ‘नामजप केल्याने मन शांत झाले, अनावश्यक विचार गळून पडले’, अशी अनुभूतीही काही जणांनी घेतली.

कुर्ला : येथे ४ ठिकाणी नामजप करण्यात आला. ३४ जण यात सहभागी झाले होते. जप करतांना उपस्थितांनी मनाची प्रसन्नता आणि चैतन्य अनुभवले.

पश्‍चिम मुंबई

सांताक्रूझ : येथे ८ ठिकाणी करण्यात आलेल्या नामजपात १२० जण सहभागी झाले होते. जप भावपूर्ण, एकाग्रतेने आणि एका लयीत होत असल्याचे उपस्थितांनी अनुभवले. कृष्णनगरातील जिज्ञासू सौ. प्राची परब यांच्या घरी नामजपाचे आयोजन केले असता त्यांनीच आवश्यक ती सिद्धता केली होती.

मीरारोड : येथे ३ ठिकाणी नामजप करण्यात आला. काशीगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २९ जणांनी जप केला. या वेळी भाजपचे नगरसेवक आणि धर्माभिमानी श्री. केसरीनाथ म्हात्रेही उपस्थित होते. ‘आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जप करवून घेऊ’, असे त्यांनी सांगितले. श्री. म्हात्रे या शाळेचे अध्यक्ष आहेत. आत्माराम नगर येथील मिथिला सोसायटीतील वाचक उत्तरकर यांच्या घरी जप करण्यात आला. त्यांनी २१ रांगोळी ग्रंथ प्रायोजित केले. त्यांची ६ वर्षांची नातही जपामध्ये सहभागी झाली होती.

बोरीवली : येथे २ ठिकाणी नामजप करण्यात आला. ‘रामराज्याची स्थापना होणार असल्याची निश्‍चिती वाटली’, असे उपस्थितांनी सांगितले.

पालघर

डहाणू : येथे ३ ठिकाणी नामजप करण्यात आला. ‘प्रत्येक आठवड्याला एकाच्या घरी नामजप घेऊया’, असे भजनी मंडळातील महिलांनी सांगितले, तर एका ठिकाणी  उपस्थितांना नागपंचमीची माहितीही सांगण्यात आली.

बोईसर : येथे ४ ठिकाणी नामजप करण्यात आला.

वैशिष्ट्यपूर्ण : पास्थळ येथील साईबाबा मंदिरात जपासाठी मंदिराचे विश्‍वस्त श्री. राजेंद्र मिस्त्री उपस्थित होते. श्रीरामाचा जप चालू केल्यानंतर कु. धैर्य गायकवाड (वय ३ वर्षे) बोटांची मुद्रा करून नामजप करत होता.

२. स्नेहनगर चित्रालय येथे ‘जप करतांना प्रभु श्रीरामाला अनुभवता आले’, असे उपस्थितांनी सांगितले, तर भैयावाडा येथील नामजपाला उपस्थित असलेल्यांनी ‘नामजप करतांना पुष्कळ आनंद मिळाला’, असे सांगितले. त्यांनी आठवड्यातून २ वेळा नामजप करण्याचे नियोजन केले.

३. ‘एम्एस्ईबी’ संकुलातील हनुमान मंदिरात झालेल्या जपामध्ये सहभागी झालेल्या महिला म्हणाल्या, ‘‘रामराज्य यावे, सर्वांचे चांगले व्हावे, यासाठी तुम्ही आमच्याकडून नामजप करवून घेतला. आम्हाला यात सहभागी करून घेतले’, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.’’  नालासोपारा : मनवेल पाडा येथील सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू संप्रदायाच्या सत्संगातील ६५ जणांनी एकाग्रतेने जप केला. पश्‍चिमेकडील पंचमुखी हनुमान मंदिरात जप करण्यात आला. वसई येथील दिवानेश्‍वर महादेव मंदिरात मारवाडी समाज भजनी मंडळाने जपाचे आयोजन केले होते. त्यांनीच जपासाठी पूर्वसिद्धता केली होती.

नवी मुंबई

सानपाडा : येथे ३ ठिकाणी नामजप करण्यात आला. ३१ जण या वेळी उपस्थित होते. एके ठिकाणी नामजप झाल्यावर उपस्थितांनी प्रत्येक आठवड्याला जप घेण्यास सांगितले.

कोपरखैरणे : वाचक श्रीमती चव्हाण यांच्या घरी जप करण्यात आला.

नेरूळ : येथेही ठिकठिकाणी नामजप करण्यात आला. नामजप केल्याने उपस्थितांना अनुभूती आल्या, तसेच काही जणांनी प्रतिदिन नामजप करणार असल्याचे सांगितले.

नामजपाच्या आयोजनात जिज्ञासूंचा उत्स्फूर्त सहभाग !

श्री गणेश मंदिराच्या अध्यक्षांनीच जपाचे आयोजन केले होते. खारघर येथील वाचक सौ. शुभांगी भावसार यांच्या घरी नामजपाला उपस्थित असलेल्या एका जिज्ञासूने हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात जपासाठी बोलवले.

अनुभूती आल्याने नामजपासाठी अधिक वेळ देणे !

हनुमान मंदिरातील हरिपाठामध्ये जप करण्यात आला. आरंभी १५ मिनिटे जप करण्यासाठी नकारात्मक प्रतिसाद होता; मात्र तो केल्यावर चांगले वाटल्याने ३० मिनिटे जप करण्यात आला. प्रतिदिन १५ मिनिटे जप करणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. जिज्ञासू सौ. शोभा आरोटे यांच्या निवासस्थानी १५ मिनिटे जप करण्याचे ठरले होते; मात्र जप करतांना उत्साह वाटत असल्याने ४५ मिनिटे करण्यात आला. सौ. आरोटे यांच्या मुलाला बरे वाटत नव्हते; मात्र जप केल्यावर त्याला चांगले वाटले. जप करतांना शांत वाटल्याचेही एका ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई

शीव (सायन) येथील प्रतीक्षा नगरातील गणेश मंदिरात जप करतांना भक्तगण

वडाळा : शीव येथील प्रतीक्षानगरातील श्री गणेश मंदिरात १२ जणांनी जप केला.

परळ : येथे ३ ठिकाणी नामजप करण्यात आला. या वेळी ३८ जण उपस्थित होते. एके ठिकाणी नामजप करतांना चांगले वाटल्याने १० मिनिटे अधिक नामजप करण्यात आला. वाचक सौ. राधिका केरकर यांच्या घरी नामजप झाल्यावर धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *