Menu Close

आम्ही शेवटपर्यंत धर्म, श्रद्धा आणि परंपरा यांचे रक्षण करणारच : सौ. नयना भगत, सनातन संस्था

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश करण्याच्या विषयावर टी.व्ही. ९ या वृत्तवाहिनीवर चर्चासत्राचे आयोजन

मुंबई : आम्ही धर्मपरंपरांचे रक्षण करणारच. तृप्ती देसाईंना चौथर्‍यावर मुळीच जाऊ देणार नाही. राज्यघटनेने आम्हाला कलम २६ नुसार धर्मविषयक गोष्टींची व्यवस्था पहाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही त्यांचा वापर करू. धर्म, श्रद्धा, परंपरा यांच्या रक्षणाच्या लढ्यात ईश्‍वरीय सत्ता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. १ एप्रिलला टी.व्ही. ९ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यामध्ये सारा फाऊंडेशनच्या सारंगी महाजन आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालन निखिला म्हात्रे यांनी केले.

सौ. नयना भगत पुढे म्हणाल्या,

Nayana-Bhagat1१. धर्मशास्त्र जे सांगते, ते आम्ही मांडले. आम्ही न्यायालयाचा अनादर करत नाही. आम्ही लोकशाहीचाही आदर करतो.

२. धर्मशास्त्र, परंपरा, श्रद्धा यांसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेकांची दिशाभूल झाली आहे. एक मोठी यंत्रणा श्रद्धा आणि कर्मकांड यांना मोडीत काढण्यास निघाली आहे. न्यायालयाचा निर्णयही विस्मयचकित आहे. इतक्या तडकाफडकीने हा निर्णय का घेण्यात आला ?

३. उच्च न्यायालयाचा निकाल अंतिम नाही. त्यामुळे आम्ही अजून सर्वोच्च न्यायालयातही अपील करणार आहोत.

४. आतापर्यंत आम्ही अनेकदा धर्माची बाजू मांडली. शास्त्र सांगितले. कर्मकांडानुसार नीतीनियम पाळावेच लागतात. जसे एखादी व्याधी झाल्यास आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतो, त्याप्रमाणे धर्माच्या संदर्भातही धर्मशास्त्र जाणकारांचे मत घ्यायला हवे.

५. धर्मशास्त्र जे सांगते, त्यावर विश्‍वास ठेवल्यास चांगले अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागते.

६. धर्मशास्त्राचा अभ्यास आणि महिलांचा सन्मानही करायला हवा.

तृप्ती देसाई यांच्यासारख्या विकृत महिला समाजाला संभ्रमित करत आहेत ! – सारंगी महाजन, सारा फाऊंडेशन

१. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो; मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी देवस्थानला किंवा धर्मशास्त्र जाणकारांना विचारणा झालेली नाही.

२. तृप्ती देसाई यांनीच महाराष्ट्राला गोंधळून टाकले आहे. हा एकप्रकारे देवाची विटंबना करण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे अशा महिलांना का वाव द्यायचा ? त्यांना कुणाचे किती पाठबळ आहे, त्याचा शोध घ्यायला हवा ! (सारंगी महाजन यांच्या या विधानाविषयी शासन गांभीर्याने विचार करील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. शनिचौथर्‍यावर पुरुषांनाही जाण्यास बंदी होती. असे असतांना तृप्ती देसाई बंदी आता घातली आहे, असे सांगतात; मात्र त्या खोटे बोलत आहेत.

४. मंदिर प्रवेशाचा वारंवार आग्रह म्हणजे धर्म आणि संस्कृती यांचा अपमान आहे. जर हिंदु स्त्रियाच आपल्या विरोधात जाऊ लागल्या, तर मग आपण काय म्हणायचे ?

५. तृप्ती देसाई यांचा हा एकप्रकारे आततायीपणा आहे. तो परंपरने चालत आलेल्या नियमांना धरून नाही. आम्ही प्रत्येक वेळी देवस्थानच्या बाजूने आहोत.

६. तृप्ती देसाई यांनी खुशाल चौथर्‍यावर जावे. शनीची चांगली-वाईट कृपा त्या भोगतीलच ! बाकीचे लोक मूर्ख महिला दर्शन घेऊन आल्या, असे म्हणतील !

७. जेव्हा आपण देवस्थानचे ऐकू, तेव्हा पावित्र्य जपले जाते.

तृप्ती देसाई यांचा उद्दामपणा ! (म्हणे) आमचे अभिनंदन करायची हिंमत आहे का ?

१. तृप्ती देसाई म्हणाल्या, आम्ही आतापर्यंत रस्त्यावरची लढाई लढली. त्यात आम्हाला पुष्कळ मोठे यश मिळाले. त्यामुळे आता आम्हाला चौथर्‍यावर दर्शन मिळायलाच हवे. आम्ही तेथे पूर्ण सिद्धतेनिशी जाणार आहोत.

२. ही धर्माच्या बाजूने लढाई नव्हतीच. आम्ही कायम धर्माचीच भूमिका घेतली आहे. (धर्माची भूमिका घेतली असती, तर चौथर्‍यावर जाण्याचा अट्टाहास केला नसता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. आमची लढाई राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. आता पुढची लढाई संघर्षाची आहे.

४. कायदा झाल्यामुळे सर्वच महिलांनी शनिचौथर्‍यावर यावे. मीही त्यांचे स्वागत करीन.

५. आमची नेहमीच सामंजस्याची भूमिका राहिली आहे.

६. आता तुम्ही सगळे हरले आहात. माझे यश तुम्हाला पहावत नाही.

चर्चासत्राच्या शेवटी सौ. तृप्ती देसाई या जराही ऐकण्याच्या भूमिकेत नव्हत्या. त्या सौ. नयना भगत आणि सारंगी महाजन यांचे बोलणे ऐकूनच न घेता आपलीच भूमिका दामटवत होत्या. (अशा हटवादी स्त्रिया कधीतरी धर्माचा विचार करू शकतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

केवळ एकांगी बाजूने विचार करणारी टी.व्ही. ९ वृत्तवाहिनी !

चर्चासत्र चालू असतांना पुढील स्वरूपाची प्रश्‍नार्थक वाक्ये वाहिनीकडून वारंवार दाखवण्यात आली. ते प्रश्‍न पहाता वाहिनीची मंदिर प्रवेशाच्या संदर्भात असलेली एकांगी भूमिकाच उघड होते.

१. महिलांना मिळणार का त्यांचा अधिकार ?
२. देवाच्या दरबारातील भेदभावाची चौकट मोडली जाणार का ?
३. जुनाट रितींना किती काळ कवटाळणार ?
४. स्त्री शक्तीला चौथर्‍यावर प्रवेश मिळणार का ?
५. पुरोगामी महाराष्ट्र नवा इतिहास लिहिणार का ?

हा टी.व्ही. ९ वृत्तवाहिनीचा हिंदुद्वेष नव्हे का ?

चर्चासत्राच्या कालावधीत या वृत्तवाहिनीकडून मध्येमध्ये प्रवेशाय नमः । असे दाखवले जात होते. प्रत्यक्षात हा कोणत्याही देवतेचा नामजप नाही. असे असतांनाही वाहिनीकडून मंदिरात प्रवेश मिळण्याच्या घटनेला पुढे नमः। असे जोडून एकप्रकारे हिंदु धर्मातील नामजपाचाही अवमान करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *