Menu Close

संघाच्या कार्यावर टीका करणार्‍या आव्हाडांचा ठाण्यात विविध मान्यवरांनी घेतला समाचार !

ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक श्री. भैय्याजी जोशी यांनी या देशाचा राष्ट्रध्वज भगवा आणि राष्ट्रगीत वन्दे मातरम् हे असावे असे वक्तव्य एका कार्यक्रमात केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला अस्थिरता आणि धर्मद्वेष पसरवून पुन्हा देशात मनूचे राज्य आणायचे आहे. त्यासाठीच देशाचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र पद्धतशीरपणे राबवले जात आहे, असा आरोप करत ठाण्यात संघाच्या कार्याविषयी तोंडसुख घेतले होते. यावर विविध मान्यवरांनी प्रतिक्रिया देऊन आव्हाडांचा समाचार घेतला.

घोटाळ्यात ज्यांचे नाव आहे, अशांनी देशभक्ती, राष्ट्रप्रेमाची भाषा बोलू नये ! – संजय केळकर, आमदार, भाजप

आव्हाडांनी आधी आपल्या पायाखाली काय चालले आहे ते पहावे. त्यांच्या पक्षातील एकेक भ्रष्टाचार, घोटाळे बाहेर पडत आहेत. वेगवेळ्या घोटाळ्यांत ज्यांचे नाव आहे अशांनी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम यांची भाषा बोलू नये. वन्दे मातरम्ला विरोध म्हणजे या हुतात्म्यांचा अपमान आहे. त्याला विरोध करणार्‍या भामट्यांचे राष्ट्रप्रेम किती बेगडी आहे, हे आपल्याला कळते.

मुसलमानांची मते मिळवण्यासाठी राजकारण करणार्‍यांनी आम्हाला स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम शिकवू नये ! – रविंद्र चव्हाण, आमदार, भाजप

जितेंद्र आव्हाडांनी यापूर्वी कधी तिरंग्यासाठी फेरी काढली होती का ? अनेक वर्षे मुसलमानांची मते मिळवण्यासाठी राजकारण करणार्‍यांनी आम्हाला स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम शिकवू नये. संघाच्या नसानसांत देशभक्ती आहे, हे त्यांनी जाणून घ्यावे.

इशरतजहाँच्या नावाने रुग्णवाहिका चालू करणार्‍यांनी देशभक्ती शिकवू नये ! – नरेंद्र पवार, आमदार, भाजप

भैय्याजींनी मांडलेले विचार योग्य आहेत. जन गण मनपेक्षा वन्दे मातरम्मधून अधिक राष्ट्रभक्ती व्यक्त होते. ज्यांनी आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या इशरतजहाँच्या नावाने रुग्णवाहिका चालू केली त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. अल्पसंख्यांकांच्या मतपेटीवर डोळा ठेवून प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याचा प्रयत्न करणार्‍या आव्हाडांची आम्ही योग्य ती नोंद घेऊ.

आतंकवादी कृत्य करणार्‍यांना प्रोत्साहन देणार्‍या जितेंद्र आव्हाडांनी देशासाठी बलीदान देण्याच्या गोष्टी करू नयेत ! – डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण शहर उपाध्यक्ष, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हाड हे वन्दे मातरम् या गीतातून भारतमातेचे वंदन व्हावे, ही इच्छा ठेवू शकत नाहीत. तसेच हिंदूंचे प्रतीक असलेला भगव्या ध्वजाचा आदर करू शकत नाहीत, ते काय देशासाठी बलीदान करण्याच्या गोष्टी करतात ? राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मुशीत तयार झालेले आणि मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या आव्हाडांकडून आपण वेगळी अपेक्षा तरी काय करणार !

संघाने नेहमी समाजसेवेचे बीज रोवले ! – दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

संघाने नेहमी समाजसेवेचे बीज रोवले आहे. जेव्हा जेव्हा आपत्काळ आला, देशावर संकट आले तेव्हा संघाचे कार्यकर्ते तळमळीने कार्य करतांना दिसतात. त्या वेळी ते तिरंग्याला मानत नाहीत का ? आतंकवादाशी संबंधित असलेल्यांना पाठीशी घालून समाजात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशी माणसे नेतेपदाला योग्य आहेत का, याचे आव्हाडांनी परीक्षण करावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *