Menu Close

पशूवधगृहाला विरोध करण्यासाठी ८ एप्रिलला (हनुमान जयंतीला) सहस्रोंच्या संख्येने संघटित व्हा ! – मंगेश चव्हाण, भाजप आमदार, चाळीसगाव

चाळीसगाव (जळगाव) येथे ‘हिंदु एकता’ सभा !

सभेत भूमिका मांडताना विद्यमान आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव : येथील प्रस्तावित पशूवधगृहास आम्ही प्रारंभीपासून विरोध केला होता आणि करतच राहू. काही प्रशासकीय अधिकार्‍यांनी शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पशूवधगृहास अनुमती मिळवून दिली आहे. हे पशूवधगृह चालू झाल्यास भविष्यात आरोग्यासाठी, तसेच शेतभूमीस पुष्कळ मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याविरोधात संघटितपणे लढावेच लागेल. यासाठी हनुमान जयंतीला म्हणजेच ८ एप्रिलला सहस्रोंच्या संख्येत आपण एकत्रित येऊन ३ लाख स्वाक्षर्‍यांचे निवेदनही शासनाला देऊया, असे आवाहन चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

चाळीसगाव येथील भूषण मंगल कार्यालयात १० फेब्रुवारीला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि देशप्रेमी नागरिक यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता’ सभेत एकवटलेल्या शेकडो जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडेही उपस्थित होत्या.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध होण्याची प्रतिज्ञा घेऊन सभेची सांगता झाली.

चाळीसगावमधील हिंदूंनी संघटितपणे हुंकार दिल्यास पशूवधगृह उभारलेच जाणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट

हिंदूंनी आपसातील सर्व प्रकारचे मतभेद बाजूला करून एक ‘हिंदु’ म्हणून एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. चाळीसगाव येथे उभारण्यात येणारेे पशूवधगृह हे भयानक संकट आहे. रोजगार निर्मितीच्या गोंडस नावाखाली चाळीसगावमध्ये शिरकाव करू पाहणारे हे पशूवधगृह भविष्यात चाळीसगावची परिस्थिती काश्मीरसारखी केल्याविना राहणार नाही, हा धोका ओळखून आजच एकत्र व्हायला हवे. या पशूवधगृहास चाळीसगावच्या भूमीवर येऊ द्यायचे नसल्यास येथील हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.

प्रत्येकाने धर्माचरण करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवलेला ऋषिमुनींनी सांगितलेला एकही विचार किंवा धर्माचरण मागासलेले नाही, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे.

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

स्वत:चे रक्षण करण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिला आहे. महिलांकडे वाईट नजरेने पाहणार्‍यांपासून स्वत:चे रक्षण करण्याचे बळ आपल्यामध्ये असायला हवे. त्यासाठी स्वरक्षण करण्याचे प्रशिक्षण घ्यायला हवे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला आणि पुरुष यांच्यासाठी विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण अन् धर्मशिक्षण दिले जात आहे. यामध्ये सर्व हिंदू भगिनींनी सहभागी व्हावे.

विशेष

१. सभागृहात हिंदु धर्मावरील आघात, धर्मशिक्षण यांविषयी माहिती देणारे फ्लेक्स फलक लावले होते.

२. आपत्कालीन साहाय्य, प्रथमोपचार, स्वरक्षण प्रशिक्षण, आयुर्वेदिक वनस्पती यांची माहिती देणारे कक्ष उभारण्यात आले होते. याचा लाभ शेकडो जिज्ञासूंनी घेतला.

सभेनंतर हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील होण्याचा प्रयत्न

सभेनंतर मान्यवर वक्त्यांसमवेत धर्मकार्यामध्ये सहभागी होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांची बैठक झाली. या वेळी अनेक भागांत धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची, तसेच हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्याची मागणी धर्मप्रेमींनी केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *