Menu Close

मेवातमधील असुरक्षित हिंदू !

संपादकीय

‘गेल्या २५ वर्षांत हरियाणातील मेवात येथील ५० गावे हिंदुविहीन झाली आहेत’, असा हिंदूंवरील अत्याचारांची सत्यता दर्शवणारा अत्यंत गंभीर अहवाल विश्‍व हिंदु परिषदेने सरकारला दिला आहे आणि या अहवालावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. हा अहवाल सिद्ध करण्यार्‍या समितीत सेवानिवृत्त सैन्याधिकारी मेजर जनरल जी.डी. बक्षी यांचाही समावेश आहे. या अहवालानुसार ‘हिंदु महिलांवर अत्याचार, हिंदु मंदिरांवर मालकीहक्क सांगणे, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान, हिंदु साधू, पुजारी, धार्मिक व्यक्ती यांच्यावर अत्याचार’ हीच हिंदूंच्या वंशविच्छेदाची नेहमीची पद्धत गेली अनेक वर्षे धर्मांधांनी येथे अवलंबली आहे’, ‘येथील अधिकार्‍यांना हिंदूंवरील अत्याचारांना उत्तरदायी ठरवून त्यांची चौकशी करा’, ‘येथे अर्धसैनिक दल नेमा, निष्पक्ष अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करा’, ‘अवैध पैसे आणि हत्यारे, तसेच अवैध बांगलादेशी आणि रोहिंगे यांच्या चौकशा करा’, अशा मागण्या या अहवालात करण्यात आल्या आहेत. जवळजवळ ११ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात ७९ टक्क्यांहून अधिक समाज हा मुसलमान आहे.

मेवातींच्या धर्मपरिवर्तनाचा दुर्दैवी इतिहास

ऐतिहासिक काळापासून जुन्या मेवात प्रदेशातील मूळ शिवोपासक ‘मेवा’ लोकांचे सातव्या, दहाव्या आणि अकराव्या शतकात प्रचंड प्रमाणात धर्मपरिवर्तन झाले. यामागे महंमद बीन कासीमपासून बाबरापर्यंत अनेक क्रूर मोगल राज्यकर्त्यांचा सहभाग होता. सततच्या मोगल आक्रमणांमुळे प्राचीन काळापासून मेवात प्रदेश हिंदु संस्कृतीवरील मुसलमान संस्कृतीच्या अतिक्रमणाचे केंद्र बनला. तत्कालीन मूळ मेवात प्रदेशाची सध्या ६०० गावे राजस्थान, तर ५०० हरियाणा आणि ५० गावे उत्तरप्रदेश या राज्यांत आहेत. या तीनही राज्यांत एकूण ४० लाखांवर असलेला मुसलमान समाज म्हणजे ‘धर्मपरिवर्तन केलेला मूळचा हिंदु समाज’ आहे. असे असले, तरीही हे ‘बाटगे’ धर्मांध आता हिंदूंवर आक्रमणे करू लागले आहेत. ‘बाटग्याची बांग मोठी’, अशी म्हण आहे. येथील परिस्थिती पहाता ही म्हण सार्थ ठरते. त्यातही या धर्मांधांना तबलिगींची फूस आहे, असे अलीकडच्या काळातील काही वृत्तांवरून लक्षात येते. एका हिंदूचे धर्मांतर झाल्यावर हिंदु धर्माचा एक शत्रूही वाढतो’, ही म्हण मेवातमधील हिंदूंची दुःस्थिती पहाता तंतोतंत लागू पडते.

धर्मांधांकडून अतिरेकी अत्याचार

गेल्या २ मासांपासून मेवात येथे हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध संघटनांनी महंत ऋषिकुमार दास यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींच्या नावे येथील सचिवालयात निवेदन दिले. बिछौर येथे ६ एप्रिलला एक मुलगा आणि त्याचे वडील यांना मारण्यात आले. चंदेनी येथे १८ एप्रिलला एका सुरक्षारक्षकावर धर्मांधांनी मोठ्या संख्येने आक्रमण करून त्याला मारून धमकावले. उलेटा या गावात २१ एप्रिलला भ्रमणभाषचे पैसे मागितल्यावर धर्मांधांनी हिंदु तरुणाला मारले. बिछौर येथे २८ एप्रिलला गो-तस्करांनी पोलीस ठाणे तोडले आणि गोळीबारही केला. पुन्हाना येथे २९ एप्रिलला एका महंतांवर आक्रमण करून त्यांचे कपडे फाडण्यात आलेे, तर धाधस या गावात एका कुटुंबावर आक्रमण करून त्यांना मारझोड करण्यात आली. भादर गावात एका औषध दुकानदाराला लुटून दुकान बंद करण्याची धमकी देण्यात आली. तर १२ मे या दिवशी एका  मुलाला मारहाण करण्यात आली. वरील सर्व घटनांतील पीडित हे हिंदु आणि आक्रमण करणारे धर्मांध आहेत. विशेष म्हणजे वरीलपैकी एकाही प्रकरणी कारवाई झालेली नाही. त्यामुळे येथील हिंदूंना असुरक्षित वाटले, तर नवल ते काय ? वरील स्थिती पाहून मेवात पाकमध्येच आहे, असे कुणाला वाटले, तर तेही चूक नव्हे.

३ वर्षांपूर्वी ‘मेवात मॉडेल पब्लिक स्कूल’मधील ३ धर्मांध शिक्षकांना काढून टाकण्यात आले होते. विद्यार्थ्यांना नमाज पढण्यासाठी बळजोरी करणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे आदी कृत्ये करून ‘हिंदु धर्म कसा वाईट आहे आणि मुसलमान कसे झाले पाहिजे’, याविषयी मानसिक ताण देऊन ते हिंदु विद्यार्थ्यांवर दबाव आणत होते. विद्यार्थ्यांनी या गोष्टी घरी सांगितल्यावर पालकांनी आवाज उठवला. मागील वर्षी ‘एका हिंदु मुलीने मुसलमान मुलाशी निकाह केल्यानंतर ती आनंदी असते’, अशा आशयाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता, तो याच मेवातमधील होता. या प्रकरणानंतर येथील हिंदुत्वनिष्ठांनी हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे सांगितले होते. सध्या येथील मेवाती मुसलमान पशूधन चोरून नंतर त्याच्या मालकाकडे जाऊन पैसे घेऊन त्याला ते परत देत असल्याचेही समोर येत आहे.

हिंदूंचे स्थलांतर थांबणे आवश्यक !

काश्मीरमधील ४ लक्ष हिंदूंना स्थलांतर करण्यास भाग पाडणार्‍यांवर काहीही कारवाई न झाल्याने धर्मांधासाठी ते ‘आदर्श’ (‘रोल मॉडेल’) बनले आहे. धर्मांधांच्या त्रासाला कंटाळून उत्तरप्रदेशमधील कैराना येथील २५० हिंदूंनी स्थलांतर केले, गुजरातमधील कच्छ येथील हिंदूंनी स्थलांतर केले. इतकेच काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या पुण्यातील एका भागात ५० टक्के धर्मांध झाल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून तेथील हिंदू स्थलांतरित होत आहेत. ‘पोलीस धर्मांधांपुढे काही करू शकत नाहीत’, अशी स्थिती आहे. हिंदु व्यापार्‍यांची दुकाने बंद पडत आहेत. येथील प्राचीन मंदिरेही पाडण्यात आली आहेत. हिंदूंना स्वतःचे स्थलांतर होऊ द्यायचे नसेल, तर ‘हिंदूबहुल प्रदेशात धर्मांधांची संख्या वाढू न देणे’, हाच यावरील पर्याय आहे. यासाठी हिंदूंनी जागरूक राहून धर्मांधांच्या ‘लॅण्ड जिहाद’चा धोका ओळखला पाहिजे. हिंदूंना भयमुक्त आयुष्य जगण्यासाठी, हिंदूंना विनाकारण त्रास देणार्‍यांवर वचक निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ठरते, हेच खरे !

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *